काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमातून जनतेशी थेट संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आसपास नागरिकांना कुठल्याही यंत्रणेतील त्रुटी, धोका जाणवत असेल तर त्याची त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले होते. कारण, शासकीय यंत्रणांच्या मर्यादा आता मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आल्या असून त्यांची हतबलताच यातून प्रकट झाली. पण, नागरिकांनीही ‘मी, माझे’ या पलीकडे जाऊन आणि यंत्रणांवर, नेत्यांवर तोंडसुख घेण्यापेक्षा या यंत्रणाचे तटस्थ ऑडिटर म्हणून भूमिका पार पाडायला हवी.
इमारतीचे प्रत्यक्ष काम चालू असताना ती इमारत बांधणारा स्वार्थी हेतूने योग्य प्रमाणात सिमेंट-वाळू वापरत नाही हे उघड-उघड दिसत असताना त्याकडे जबाबदार व्यक्तीने/यंत्रणेने ‘अर्थ’पूर्ण हेतूने दुर्लक्ष करायचे आणि ती इमारत कोसळल्यावर ती का पडली, त्यात जीवितहानी झाली की आसवे गाळायची, प्राणहानी झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना मदत करण्याचे नाटक करायचे, हा प्रकार ज्याप्रमाणे शुद्ध मूर्खपणा ठरतो, तसेच काहीसे वर्तमानात आपल्या प्रशासकीय-राजकीय यंत्रणेच्या बाबतीत होताना दिसते आहे. ‘उच्चस्तरीय चौकशीची घोषणा’ केवळ धूळफेक ठरते.
आपण नागरिकदेखील या गोष्टींसाठी तितकेच दोषी आहोत. आपणदेखील समोर सर्व गैरप्रकार घडत असताना गप्प बसतो. इमारतीचे बांधकाम समोर ‘चालू’ असताना डोळे बंद करून घेतो आणि त्याच इमारत दुर्घटनेत बळी गेल्यावर व्यवस्थेला प्रश्न विचारण्यास सुरू करतो. तेदेखील केवळ दोन टक्के नागरिकच प्रश्न विचारताना दिसतात. ९८ टक्के नागरिक ‘हे असेच चालणार’ असे गृहीत धरून सर्व काही तटस्थ नजरेने पाहत राहतात.
वर म्हटल्याप्रमाणे जी गोष्ट उघड उघड माहीत आहे, त्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची गरजच काय? आपल्या लोकशाहीतील सर्वच्या सर्व यंत्रणा या गैरकारभाराने, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत. ज्यांच्यावर गुणवत्ता-दर्जा राखण्याचे उत्तरदायित्व असते, तीच यंत्रणा जर स्वार्थातून दर्जाकडे दुर्लक्ष करत असेल, तर त्याच यंत्रणेच्या अन्य घटकांनी कितीही उच्च चौकशी केली, तर त्यातून समोर येणारे निष्कर्ष हे कधीही उच्च असू शकत नाहीत, आजवर उच्च असू शकलेले नाहीत. हेच आजवरच्या चौकशी नाटकांतून दिसून आलेले आहे. मग आता त्यातून काही सत्य बाहेर येईल, या आशेवर राहणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे होय!
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक दुर्घटना घडत आहेत. त्यामध्ये ज्यांनी अजून डोळे उघडून नीट जगाकडे पाहिले नाही, अशी बालके आहेत तर आज ना उद्या बरे होऊन बाहेर येतील, या आशेवर डोळे लावून बसलेल्या नातेवाइकांचे आई-वडील, आजी-आजोबा, आत्या-मामा, बहीण-भाऊ या सम रक्ताच्या माणसांचे बळी जात आहेत.
घटना घडली की, नेतेमंडळींकडून घटनास्थळाला भेट, गेलेल्या जीवाची किंमत ठरवत ‘लाख-दोन लाखांची’ नातेवाइकांना मदतीची घोषणा, तथाकथित उच्च चौकशीचे आदेश, त्या चौकशीतून आपल्याच भाऊबंधांना वाचवण्यासाठीचा खटाटोप आणि वास्तवाला नाकारत जाहीर केले जाणारे निष्कर्ष.... प्रतिबंधात्मक उपाय मात्र शून्य आणि पर्यायाने त्याच त्या घटनांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती आणि पुन्हा नांदीपासून, वगापर्यंत तोच तो तमाशा आणि या तमाशाचे कायमचे प्रेक्षक म्हणजे आपण निद्रिस्त नागरिक.
अशा घटना घडल्या की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व म्हणतात ‘ऑडिट’ करणे गरजेचे आहे. आग लागली की, ‘फायर ऑडिट’. ‘ऑक्सिजन गळती’ झाली की, ‘ऑक्सिजन यंत्रणेचे ऑडिट’. इमारत पडली की, ‘स्ट्रक्चरल ऑडिट’. आता परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, लोकशाहीचेच ‘तटस्थ’ ऑडिट करण्याची वेळ आलेली आहे. लोकशाहीतील सर्वच यंत्रणांचे ‘तटस्थ’ ऑडिट करण्याची गरज आहे. पण, प्रश्न हा आहे की, कोण करणार ‘तटस्थ’ ऑडिट? कुठलीच यंत्रणा गैरकारभार, लाचखोरी, भ्रष्टाचारापासून तटस्थ नाहीत. मग कोण करणार तटस्थ ऑडिट? ज्यांचे हात बरबटलेले आहेत ते काय स्वच्छता करणार? ग्लोव्हज घालून बरबटलेले हात झाकण्याचा प्रयत्न केला तर ग्लोव्हज खरेदी करताना लाचखोरी केल्यामुळे तेच जर हातात घालताना फाटणार असतील, तर मग बरबटलेले हात झाकणार तर कसे?
जोपर्यंत या देशातील नागरिक राजकारण्यांनी दिशाभूल करण्यासाठी डोळ्यावर बांधलेली जात, धर्म, वंश, मंदिर, मशीद, चर्च अशी झापडे उतरवून जमिनीवरील वास्तवाकडे ‘डोळे उघडे’ ठेवून तटस्थपणे पाहत नाही, तोवर वर्तमान परिस्थितीत काही बदल संभवत नाही. प्रशासकीय-राजकीय उच्चस्तरीय चौकशीवर विसंबून न राहता, जोपर्यंत या देशातील नागरिक सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्यक्ष इमारतीचे बांधकाम चालू असताना त्यावर लक्ष ठेवत नाहीत, म्हणजेच प्रत्येक क्षणी सतर्क राहत नाहीत? व्यवस्थेला वेळोवेळी जाब विचारणार नाहीत, तोवर कुठल्याच यंत्रणेत फारसा काही फरक पडणार नाही. घटना-दुर्घटना घडत राहणार आणि आपण त्या घटनांवर आश्रू गाळणार! उपयोग शून्य. परिणाम शून्य!
ढिसाळ पाया असणार्या यंत्रणांकडून गुणवत्ता-दर्जाचा कळस ही अपेक्षाच गैर!!!
मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्यास मागे पुढे पाहिले जात नाही, अशा आपल्या यंत्रणा आहेत. लोकांना सारखे ‘हात धुण्याचा’ सल्ला देणार्या यंत्रणांनी कोरोना आपत्तीतदेखील ‘आपले हात धुऊन घेतले’ आहेत. राज्यातील पालिकांनी तात्पुरते कोरोना केंद्र उभारण्यासाठी केलेला खर्च आणि त्यातून उभा केलेल्या कामाचा दर्जा ज्या ब्रिटिशांनी आपल्याला लुटले असे म्हटले जाते, त्यांच्याकडून केला त्या ब्रिटिश यंत्रणेमार्फत केला, तर सर्व भारतीयांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे वास्तव समोर येईल. पण, असे समोर वास्तव कोणालाही पुढे येऊ देण्यात स्वारस्य नाही. प्रत्येकाचा हेतू आहे तो वास्तव दडपण्यात. सत्य दडपण्यात.
पुढे जाण्याआधी एक गोष्ट अगदी देशप्रेम मनात जागृत ठेवत मान्य करावी लागेल की, ब्रिटिश शासन कामाच्या गुणवत्ता, दर्जाच्या बाबतीत आपल्यापेक्षा कितीतरी उजवे होते. दर्जाच्या बाबतीत प्रामाणिक होते. आज मात्र स्वातंत्र्य भारतात प्रामाणिकता, गुणवत्ता आणि दर्जा मात्र पारतंत्र्यात गेले आहेत.
अशा भ्रष्ट यंत्रणांकडून गुणवत्ता आणि दर्जाची अपेक्षा करण्यात कुठलाच ‘अर्थ’ असत नाही.
सजग-सक्रिय नागरिकच तटस्थ ऑडिट करू शकतात
या देशातील प्रत्येक काम, प्रत्येक यंत्रणा, प्रत्येक कार्यालय हे आपल्या स्वतःच्या पैशातून चालते. या देशातील प्रत्येक नोकरदाराला आपल्या पैशातून पगार मिळतो ते काम व्यवस्थित करण्यासाठी, जनतेला लुटण्यासाठी नव्हे, देशाला लुटण्यासाठी नाही. या देशात केल्या जाणार्या प्रत्येक कामावर सर्वप्रथम माझा हक्क आहे, या भावनेतून नागरिक प्रत्यक्ष काम होत असतानाच लक्ष ठेवेल, दर्जाच्या बाबतीत आग्रही राहील, वेळप्रसंगी त्यासाठी हव्या त्या पातळीवर जाऊन लढा द्यायला तयार होईल. तेव्हाच देशातील व्यवस्था जागेवर येतील. तेव्हाच प्रत्येक कामाचा दर्जा आणि गुणवत्ता राखली जाईल, तेव्हाच रुग्णालयांना आगी लागून आपली माणसे जळून खाक होण्याचे प्रकार बंद होतील. तेव्हाच इमारती कोसळून लाखो रुपये खर्च करून फ्लॅट घेणार्यांचे ढिगार्याखाली दबून होणारे मृत्यू थांबतील. तेव्हाच करोडो रुपये खर्च करून बांधल्या जाणार्या रस्त्यांवरील खड्डे पडणे बंद होईल. तेव्हाच जनतेच्या पैशातून वाटप केल्या जाणार्या रेशनच्या धान्याची गळती बंद होऊ शकेल.
जेव्हा या देशातील नागरिक यंत्रणांचे तटस्थ ऑडिट सुरू करण्यास प्रारंभ करेल, तेव्हाच करोडो रुपये खर्च करून उभ्या केल्या जाणार्या शाळा-कॉलेजातून दर्जेदार शिक्षण मिळू शकेल. तेव्हाच लाखो रुपये खर्च करून वर्षानुवर्षे बंद असणारी आरोग्य केंद्रे सुरू होऊ शकतील. तेव्हाच ग्रामसेवक-तलाठी ज्या नागरिकांच्या करातून पगार मिळतो, त्यांच्या सेवेसाठी नियुक्त केलेल्या नोकरीच्या गावात निवासास राहणे सुरू करतील.
जेव्हा या देशातील नागरिक सरपंचाला प्रश्न विचारू लागतील, तेव्हाच ग्रामपंचायतीतून प्राप्त होणार्या निधीची गळती रोखली जाऊ शकेल. जेव्हा नागरिक नगरसेवक, वार्ड ऑफिसर, आयुक्तांना प्रश्न विचारू लागतील, तेव्हाच महानगरपालिकांना लागलेली गळती रोखली जाऊ शकेल. जेव्हा नागरिक आमदार -खासदारांना प्रश्न विचारू लागतील, तेव्हाच आमदार-खासदार निधीला लागलेली गळती रोखली जाऊ शकेल.
जेव्हा या देशातील नागरिक मंत्री-मुख्यमंत्र्यांना, केंद्रीय मंत्री-पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवू शकतील, तेव्हाच राज्याराज्यांना-देशाला लागलेली गळती रोखली जाऊ शकेल. जेव्हा या देशातील नागरिक प्रसारमाध्यमांना प्रश्न विचारणे सुरू करतील, तेव्हाच ते प्रामाणिकपणे ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ म्हणून भूमिका पार पाडण्यास सुरुवात करतील. तेव्हा आणि तेव्हाच या देशातील अनेक प्रश्न-समस्यांचे समूळ उच्चाटन शक्य होईल.
देशातील सर्व प्रश्नांचे जन्मदाते हे या देशातील नागरिकच आहेत आणि म्हणूनच देशातील सर्व समस्या-प्रश्नांवरील उत्तरदेखील नागरिकांकडेच आहे. पण, लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही यांच्याकडून वारंवार दिल्या जाणार्या कुठल्या नि कुठल्या तरी ‘अफूच्या गोळी’मुळे त्यांची अवस्था ‘काखेत कळसा, गावाला वळसा’ अशी झालेली आहे.
आपणच व्यवस्था परिवर्तन घडवू शकतो, हे त्यांच्या ध्यानात येण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वार्थासाठी विविध मंडळींकडून दिल्या जाणार्या अफूच्या गोळीला नकार द्यायचा आणि शुद्धीवर यायचे. एकदा का या देशातील नागरिक सजग झाला, आपल्या हक्क आणि कर्तव्याच्या बाबतीत जागरूक झाला, व्यवस्थेकडे डोळस नजरेतून पाहू लागला की, आपापसातील जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या भिंती ढासळून जातील, नागरिकांना एकत्र येणे अशक्य होणार नाही आणि पर्यायाने व्यवस्था परिवर्तनाचे शिवधनुष्य उचलणे सहज शक्य होईल!!!
बंधू-भगिनींनो! एकदा या गोष्टींचा विचार करा आणि मत पटतंय का ते पाहा. पटत असेल तर मग आचरणात आणायला सुरुवात करा!! आणि त्याची सुरुवात अन्य कोणी करेल याची वाट न पाहता स्वतःपासून सुरुवात करा!!! एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी-संभाजी महाराज, फुले-आंबेडकर, टिळक-आगरकर, सुखदेव-भगतसिंग ही आपल्यातीलच माणसे होती. आपल्या सारखीच माणसे होती. फरक एवढाच की, ती आपापल्या ध्येयाने पेटलेली माणसे होती, आजदेखील अशी अनेक मंडळी आपल्यातच असणार हे नक्की. एक ठिणगी पडण्याची गरज आहे इतकेच!!!
आपण मात्र कशानेच पेटत नाहीत. अगदी डोळ्यासमोर आपली माणसे तडफडून मेली, तरी आपण शांतच राहतो. मग व्यवस्था परिवर्तन कसे शक्य होईल? क्रांती तर खूप दूरची गोष्ट झाली.
- सुधीर दाणी