‘कोरोना’ काळातील सामाजिक बांधिलकीचा ‘कणेरी पॅटर्न’

    22-May-2021
Total Views | 157

kolhapur_1  H x


सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटात आपल्या सर्वांचे आशास्थान असणारी आपली मंदिरं, सनातनी मठ, धार्मिक संस्था आपापल्या परीने पुढाकार घेऊन मदतकार्य राबवित आहेत. पण, तरीही ‘मंदिर बांधण्यापेक्षा, मंदिरांना दान करण्यापेक्षा दवाखाने बांधा, दवाखान्यांना दान करा’ असे उपदेशाचे डोस पाजणारे पुरोगामी मंडळी कमी नाहीत. पण, त्यांना कोण सांगणार की हिंदू धर्म व मंदिरं ही या अडचणीतदेखील ‘देव आहे’ याची जाणीव करून देत आहेत. असेच सत्कार्य हाती घेतले आहे कोल्हापूरच्या कणेरी मठाने. या लेखातून मठाच्या मदतकार्याबरोबरच तेथील सिद्धगिरी म्युझियमचा आढावा घेतला आहे.


कोल्हापूरपासून साधारणत: १५-१६ किलोमीटर अंतरावर कणेरी या गावात सिद्धगिरी येथे एक अतिशय सुंंदर ‘म्युझियम’ उभारण्यात आले आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पाहत असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचा एक नमुनाच इथे पाहायला मिळतो. इथे पोहोचल्यानंतर तुमच्या स्वागतासाठी सज्ज असतात ती मेष, सिंह, कन्या अशी १२ राशींची शिल्पे. त्यानंतर एका गुहासदृश भागातून आत जाताच प्राचीन काळात भारतामध्ये होऊन गेलेल्या ऋषी-मुनींचे पुतळे इथे उभारण्यात आल्याचे दिसतात. प्रत्येक ऋषीचे नाव, त्यांची विद्या, त्यांचे योगदान यासह आवश्यक ती, तसेच सर्वसामान्यांना माहीत नसलेली माहितीही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शिल्पांचा कोरीवपणा आणि सुबकता यामुळे हे पाहताना अर्धा ते पाऊण तास कसा निघून जातो हे कळतदेखील नाही. १२ बलुतेदार ही समाजव्यवस्था खेड्यांमधून आज लुप्त होत चालली आहे. बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे येथे पाहावयास मिळतात. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांसह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पेही त्या-त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात. ग्रामीण भागांत असलेल्या घरांचे विविध नमुने येथे पाहावयास मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब त्रिमिती प्रतिमा येथे ठेवल्या आहेत.

या गुहेतून बाहेर पडताच दोन्ही बाजूला समोर दिसतं ते हिरवंगार शेत आणि या शेतात काम करणारी माणसं. इथूनच सुरू होतो तो खरा ग्रामीण जीवनशैलीचा प्रवास. हळूहळू या माणसांच्या जवळ जाताच आपल्या लक्षात येतं की, ही माणसं नसून माणसांच्या हुबेहूब प्रतिकृती आहेत. धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतची प्रत्येक प्रक्रिया या प्रतिकृतींमधून दाखविण्यात आली आहे. याचसोबत शेतांमध्ये बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर, लगोर, लंगडी, सूरपारंब्या हे खेळ यांचे प्रत्यक्ष दर्शन घडविणार्‍या या प्रतिकृती जीवंत वाटाव्यात, इतके बारकावे यामध्ये टिपले आहेत.


सिद्धगिरी प्रॉडक्ट


मठाकडूनही जवळपास 40हून अधिक उत्पादनांची निर्मिती केली जाते आणि त्यासाठी मुंबई, पुणे यांसारख्या अनेक शहरांत विक्री केंद्रेही काढलेली आहेत. देशी गाईचे दूध १०० रुपये लीटरने, तर ३०० रुपये किलोने तूप विकले जाते. पंचगव्य उत्पादनांवर मठाचा भर आहे. लोकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. ४० गोशाळा आहेत. याशिवाय शेतकरी कुटुंबातील महिलांसाठीही विविध व्यवसाय सुरू आहेत. यामध्ये २५ प्रकारचे पापड, आठ प्रकारच्या चटण्या यांचा समावेश आहे. भविष्यात ६०० प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे.

आरोग्यक्षेत्र


धर्म, शिक्षण, कृषी या क्षेत्रांबरोबरच आरोग्यक्षेत्रातही मठाने मोेठे काम उभारले आहे. 200 खाटांचे ‘अ‍ॅलोपॅथी’ आणि १०० खाटांचे ‘होमियोपॅथी’चा समावेश असलेले ‘सिद्धगिरी धर्मादाय हॉस्पिटल’ आणि ‘रिसर्च सेंटर’ मठाच्याच अधिपत्याखाली चालते. गेल्या दहा वर्षांपासून गरिबांना अल्पदरात उपचार देण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये तरुण आणि तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. अनेक प्रलोभने टाळून सातत्याने याच हॉस्पिटलसाठी सेवा देणार्‍या या डॉक्टरांच्या पथकामुळे अनेक गरीब रुग्णांवर योग्य उपचार झाले आहेत. न्यूरो विभाग, हृदयरोग विभाग यासाठी माजी महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नाने साडेतीन कोटी रुपयांची अद्ययावत यंत्रणा हॉस्पिटलसाठी मिळवून दिली आहे. भविष्यात ५० हजारांत ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सध्या ‘बायपास’साठी ‘अ‍ॅन्जिओग्राफी’ही मोफत केली जाते. अनेक आरोग्यविषयक शिबिरांचेही आयोजन सातत्याने केले जाते.महाराष्ट्राच्या संतभूमीत भारतीय संस्कृती, वारसा जपणारा आणि लोप पावत चालणार्‍या कला यांचे माहेरघर म्हणून हा श्री सिद्धगिरी मठ, कणेरी प्रसिद्ध आहे. मठ म्हटले की, आपल्या डोळ्यांपुढे येतात ते धार्मिक विधी, पूजा-अर्चा आदी प्रकार. परंतु, कणेरी मठ हा मठाच्या प्रचलित व्याख्येपासून खूपच वेगळा आहे. अध्यात्मासोबतच या मठात भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. आपल्या देशास एक सांस्कृतिक वारसा, संस्कृती आणि इतिहास आहे तो जतन करण्याचे आणि संकटकाळात धावून जाण्याचे काम या तीर्थस्थान स्वरूपी मठात होते.



kolhapur_1  H x

वारंवार जेव्हा राज्य अडचणीत येत, तेव्हा-तेव्हा कणेरी मठाने पुढाकार घेतलेला दिसतो. कोणतीही आपदा आली, संकट आलं की, त्या खडतर काळात आपद्ग्रस्तांंच्या मदतीला धावतो तो कणेरी मठ.कोल्हापूरमधील महापूर किती भयानक होता हे तर सर्वांना माहिती आहेच, प्रत्येक वेळी श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या अभ्यासू मार्गदर्शनाखाली शेकडो स्वयंसेवकांची टीम या मदतकार्यात सदैव धैर्याने पुढे सरसावली होती. धर्मशिक्षण, कृषिक्षेत्र याबरोबरच आरोग्य विभागातदेखील कणेरी मठाने मोेठे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रामदेव बाबा, श्री रविशंकर स्वामी यांच्यासारख्या अनेक सनातनी लोकांनी कणेरी मठाचे व स्वामींचे वेळोवेळी कौतुक केले आहे. अनेक मोठे-मोठे नेते, दिग्गज मंत्री हे कधीही आले की, स्वामी काडसिद्धेश्वर महाराज यांचे आशीर्वाद घेऊनच पुढे कार्यरत होतात.
गरीब आणि निराधार शेतकरी, मजुरांना मोफत घरे बांधून देण्याची जबाबदारीही कणेरी मठाने स्वीकारली आहे. आजही हा मदतीचा ओघ सुरूच आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या कोल्हापूर पोलीस कुटुंबांना दररोज मठाच्या वतीने अन्न पुरविण्यात येत होते. याशिवाय मुंबईतही जवळपास चार महिने सातत्याने गरीब कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यात आली होती. तांदूळ, मीठ, डाळ, साखर, तेल या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे. ‘म्युझियम’जवळच काडसिद्धेश्वराचा मठ आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कणेरीच्या या मठात ईशान्येतून आलेल्या १० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. तिसरी-चौथीपासून अकरावी-बारावीपर्यंतचे हे विद्यार्थी आहेत. मठाच्या परिसरातील दहा शाळांमध्ये शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक हे मठाचे आहेत. जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावणारे ४० पैकी २५ खेळाडू मठाच्या माध्यमातून चमकतात, हे अभिमानास्पद आहे. याशिवाय सरकारी ३३५ शाळा मठाकडून दत्तक घेतल्या आहेत.


कृषिविज्ञान केंद्र


धर्म व शिक्षण याबरोबरच कृषिक्षेत्रातही मठाचे मोेठे काम चालते. नैसर्गिक पद्धतीने शेती करणे, सेंद्रिय उत्पादने घेणे याविषयी शेतकर्‍यांसाठी सातत्याने देशपातळीवरील शिबिरांचे तसेच कार्यशाळांचे आयोजन मठात केले जाते. शेतकर्‍यांसाठी खास कृषिविज्ञान केंद्राची स्थापना मठाकडून झाली आहे. शेतकर्‍याने पिकविलेल्या सर्व प्रकारच्या मालाला हमीभाव देणारे सिद्धगिरी मठ हे एकमेव आहे. धान्य, फळ, भाजीपाला या शेतमालासाठी मठाकडून बाजारपेठही तयार केली आहे. सध्या हक्काचे असे १०० ग्राहक आहेत. ४० रुपयांना घेतलेला शेतमाल ६० रुपयांना विकला जातो. सध्या १५० एकरांत शेतीप्रयोग केले जातात. भविष्यात तो एक हजार एकरांपर्यंत जाईल, अशी आशा आहे. येत्या वर्षभरात यासाठी स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. ‘कृषी नवोत्थान’ शिबिरासारखे शिबीर मठाच्या लौकिकात भर टाकते. राष्ट्रीय कृषिसंमेलनात अनेक प्रयोगशील शेतकर्‍यांसह देशातील विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित राहिले. देशी गाईचे शेणखत आणि गांडूळ खत हे मठाचे वैशिष्ट्य राहिले आहे.


आपत्कालीन विभाग


सिद्धगिरी मठाकडून आपत्कालीन विभाग कार्यरत आहे. यामध्ये सुमारे १५०हून अधिक स्वयंसेवक सदैव सज्ज असतात. नेपाळ, केरळ, कोल्हापूर येथील आपत्तीनंतर आता कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या स्थितीमध्ये आणि ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसाठी हा आपत्कालीन विभाग मदतीला धावला आहे. वादळग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गवंडी, लोहार, सुतार, प्लंबर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन यांचा समावेश असलेल्या सुमारे १५०लोकांची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली होती. त्यांच्याबरोबर सिमेंट, पत्रे, संसारोपयोगी साहित्य, कौले अशा साहित्यांचे अनेक ट्रक भरून सामान घेऊन दस्तुरखुद्द स्वामी लोकांचे अश्रू पुसण्यासाठी तळकोकणात उतरलेले होते. कोकणातील पाजपंढरी, खरसई, खेड, दापोली, चिपळूणसह रायगड जिल्ह्यातील काही भागांत त्यांनी हे मदतकार्य केले होते. केवळ स्वामींच्या मार्गदर्शनाखाली मठाच्या वतीने घरांच्या छताची मापे घेऊन छत उभारण्याचे काम पहिल्या काही तासांतच सुरू झाले होते. ग्रामस्थांकडून स्वामींच्या या अचूक नियोजनाचे कौतुकही झाले. पुनर्वसनासाठी ‘सिद्धगिरी निसर्ग वादळ मदतकक्ष’ स्थापन करण्यात आला होता. सर्वच आपद्ग्रस्तांना लाभ मिळावा म्हणून समाजातील दानशूर दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले होते, त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला. घरबांधणीसाठी, दुरुस्तीसाठी विटा, सिमेंट, पत्रे, वाळू, लोखंडी सळई, बांधकाम साहित्य, दरवाजे, खिडक्या, इलेक्ट्रिकल साहित्य, संडास-बाथरूमसाठी लागणारे प्लम्बिंग साहित्य, कौले, मेणबत्ती, काडेपेटी, शैक्षणिक साहित्य - वह्या, कंपास, पेन, स्कूल बॅग अशा एक ना अनेक स्वरूपांत आणि अर्थातच, आर्थिक स्वरूपात अनेकांनी मदत दिली. भिक्षू, भटके, हातावर ज्यांचे पोट आहे, अशा अनेक जणांना मठाकडून मदत पोहोचविली गेली. गरीब आणि निराधार व्यक्तींना मोफत घरे बांधून देण्याची जबाबदारी मठाने घेतली आहे. दुर्गम भागात पाणवठ्याकडे जाणारे, गावात जाणारे रस्ते, गटारी यावर पडलेली अजस्र झाडे कटरच्या साहाय्याने कापून ते मोकळे केले आहेत. याशिवाय मुंबईतही जवळपास चार महिने सातत्याने गरीब कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यात आली होती.

कोरोनाकाळात मदतीसाठी पुढे सरसवला कणेरी मठ...


विविध ऋषी-मुनींच्या विचाराचे जागृत मूर्ती, तसेच हजारो गौमातांचे पालन-पोषण करणारा श्री काडसिद्धेश्वर स्वामी यांचा कणेरी मठ आता कोरोनाकाळातदेखील सामान्य लोकांसाठी पुढे सरसावला आहे. अदृश्य स्वामी काडसिद्धेश्वर यांच्या सूचनेनुसार मठावर प्रशस्त आयुर्वेदिक, शैल्यचिकित्सक यांची मोठी टीम पुढे उभी राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे व प्रशस्त असे १०० बेड्सचे ‘कोविड केअर सेंटर’ उभे राहत आहे. या ‘कोविड सेंटर’मुळे कणेरी मठ धार्मिक व कृषिक्षेत्रात अग्रेसर तर आहेच. मात्र, सहकार्यक्षेत्रातही कणेरी मठ सदैव पुढे आहे.बाकी जे कार्य आज कणेरी मठ पुढाकाराने करतो आहे, तेच कार्य प्रत्येक मंदिरांनी व मठांनी आदर्श घेऊन करावं, तेव्हाच आपली हिंदूराष्ट्रच्या दिशेने वेगाने वाटचाल असेल.


- तुषार पुजारी
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121