एकेकाळी निम्म्यापेक्षा जास्त जगावर बकिंगहम पॅलेसमध्ये राहणारे ब्रिटिश राजघराणे राज्य करीत असे. एरवी मानवतेचा, आधुनिकतेचा आव आणणारे हे राजघराणे भारतासारख्या देशाविषयी कशी भूमिका ठेवत असे, हे भारतीयांनी अगदी चांगल्या प्रकारे अनुभवले आहे. मात्र, तरीदेखील राजघराण्याने स्वत:चा खरा चेहरा बाहेर येणार नाही, याची अगदी चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे. नाही म्हटले तरी ‘नेटफ्लिक्स’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर प्रदर्शित झालेल्या ‘द क्राऊन’ या ‘वेबसीरिज’मध्ये ब्रिटिश राजघराण्याची कथा अगदी सविस्तरपणे कोणताही आडपडदा न ठेवता मांडली. त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा खुलासाही झाला. त्यामुळे आपण आजपर्यंत समजत होतो, तसे काहीही नव्हते हेदेखील जगात अनेकांना लक्षात आले. अर्थात, त्या ‘बेवसीरिज’वर बंदी आणावी, अशी मागणी राजघराण्याकडून झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र, आता राजघराण्यातील सुनेनेच बकिंगहम पॅलेसला जोरदार हादरा देऊन राजघराण्याचा वंशभेदी चेहरा चव्हाट्यावर आणला आहे. अर्थात, आजवरच्या प्रथेप्रमाणे याविषयी कोणत्याही प्रकारे स्पष्टीकरण राणी एलिझाबेथ यांच्याकडून येण्याची शक्यता धुसरच आहे. मात्र, या सुनेच्या मुलाखतीचे पडसाद ब्रिटिश समाजात दीर्घकाळपर्यंत उमटत राहणार, यात कोणतीही शंका नाही.
तर झाले असे की, राजघराण्याचे प्रिन्स हॅरी यांनी राजघराण्याच्या परंपरेच्या विपरीत जाऊन मेगन मर्केल या कृष्णवर्णीय मुलीसोबत विवाह केला. त्यांचा निर्णय राजघराण्यासह अत्यंत कर्मठ परंपरावादी असलेल्या ब्रिटिश नागरिकांनाही मोठा धक्का होता. राजघराण्याने लग्न लावून दिले तरीही काही काळानंतर हॅरी आणि मेगन यांनी राजवाडा सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार ते वेगळे राहू लागले आणि त्यांनी देशही सोडला. आता हॅरी आणि मेगन यांनी जगप्रसिद्ध मुलाखतकार ऑप्रा विन्फ्रे यांना एक मुलाखत दिली आणि त्यात ब्रिटिश राजघराण्याच्या वंशभेदी चेहऱ्याची लक्तरे बकिंगहम पॅलेसच्या वेशीवर टांगली. राजघराण्यामध्ये आल्यानंतर मला कोणीही मनापासून स्वीकारले नाही, आमच्या होणाऱ्या अपत्याचा रंग कसा असेल याचीच काळजी राजघराण्यातील अन्य व्यक्तींना असायची. त्यामुळे अशा वंशभेदामुळे त्या कुटुंबात राहणे आम्हाला शक्य नव्हते. अखेरीस देश सोडण्याशिवाय अन्य पर्याय आमच्याकडे नव्हता. त्याचप्रमाणे गतवर्षीच राजघराण्याने आमच्यासोबतचे आर्थिक व्यवहारही पूर्णपणे तोडून टाकले आहेत. त्याचवेळी राणी एलिझाबेथ यांच्या मनात असे कोणतेही विचार नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
मुलाखतीमध्ये दाम्पत्याने केवळ राजघराणेच नव्हे तर ब्रिटिश प्रसारमाध्यमे आणि त्यांचे मुखंडही वंशभेदी असल्याचा धक्कादायक आरोप केला. त्यामुळे जगातील प्रसारमाध्यमांना अनेकदा नैतिकता शिकविणाऱ्या ब्रिटिश प्रसारमाध्यम विश्वाचीही नाचक्की झाली आहे. हॅरी यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच प्रसारमाध्यमांनी मला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. माझ्याविषयी मनाला येईल ते छापायला प्रारंभ झाला. अनेकांनी तर मला ‘गोल्डडिगर’ (आर्थिक फायद्यासाठी लग्न करणारी) असेही म्हटले होते. ‘सोशल मीडिया’वर तर या गोष्टींचा अतिरेक झाला होता. त्यामुळे माझ्या मानसिक स्वास्थ्यावरही त्याचा परिणाम झाला होता. सर्वांत दुर्दैवी बाब म्हणजे, राजघराण्याची प्रसारमाध्यम यंत्रणाही आमच्याविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवांना रोखण्यात अपयशी ठरली. ब्रिटिश प्रसारमाध्यमे ही अतिशय दांभिक आहेत. असाही आरोप दोघांनी मुलाखतीमध्ये केला आहे. या मुलाखतीमुळे ब्रिटनमध्ये खळबळ माजली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र, जगातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी हॅरी आणि मेगन यांच्या मुलाखतीचे कौतुक केले. दुसरीकडे राजघराण्यात यामुळे मोठे वादळ निर्माण झाले असून, मुलाखतीविषयी स्पष्टीकरण देणारे प्रसिद्धीपत्रक काढण्याची तयारी केली आहे. राणी एलिझाबेथ, प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम यांच्यासोबत सल्लामसलत करूनच आता राजघराणे आपली भूमिका स्पष्ट करेल. मात्र, यामुळे पुन्हा एकदा प्रिन्सेस डायना यांच्या अशाच सनसनाटी मुलाखतीच्या स्मृती जाग्या झाल्या आहेत. कारण प्रिन्सेस डायना यांनीदेखील राजघराण्याच्या विक्षिप्त वागणुकीविषयी जाहीरपणे सांगितले होते. अर्थात, राजघराण्याचा इतिहास पाहता अशी अनेक वादळे त्यांनी अलगदपणे पचविली आहेत. त्यामुळे हॅरी आणि मेगन यांनी निर्माण केलेल्या वादळाचे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.