नुकतेच सुजात आंबेडकर म्हणाले की, “भूषण गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत आले नाहीत.” त्यांचे हे विधान ऐकून अनेक प्रश्न उभे राहिले. सर्वप्रथम आंबेडकरांच्या विचारांवर म्हणजे कसे, हे सुजात यांनी स्पष्ट करावे. ‘बुद्धाने जातीअंतासाठी काम केले नाही,’ असे म्हणणारे आनंद तेलतुंबडे हे सुजात आंबेडकरांचे नातेवाईक आहेत. मग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालतात का? याबद्दल सुजात यांचे मत काय? असो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला शिक्षणाचा वसा दिला. तो वसा, ते व्रत भूषण गवई यांनी अंगीकारले. उच्चशिक्षित झाले. डॉ. बाबासाहेब समाजाला म्हणत असत की, तुम्ही सत्ताधारी व्हा. आज न्यायदानाच्या क्षेत्रात सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई सर्वोच्च पदावर आहेत. मात्र, भूषण गवई यांनी आरक्षणाअंतर्गत आरक्षणाचे समर्थन केले, म्हणून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालत नाहीत, अशा अर्थाचे विधान सुजात आंबेडकर यांनी केले. सुजात यांना डॉ. आंबेडकरांचा शोषित-वंचित समाजाचा न्यायहक्काचा लढा नव्याने समजून घेण्याची गरज आहे. आज जर डॉ. बाबासाहेब असते आणि त्यांना आढळले असते की, आरक्षणप्राप्त समाजगटांमध्येही सामाजिक न्यायहक्क संधी मिळण्याबाबत विषमता आहे, तर त्यांनी नक्कीच आजच्या काळातील खर्या अर्थाने मागास समाजाला न्याय मिळावा, यासाठी विचारकार्य केले असते. हे सुजात यांना मान्य आहे की नाही? आणि हो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घराणेशाहीचे कट्टर विरोधक होते. व्यक्तिपूजेलाही त्यांचा विरोध होता. मात्र, दुर्दैव असे की, त्यांच्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि आता सुजात आंबेडकर हे विसरले. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून सगळ्या समाजाचे आपणच काय ते मसिहा, असे यांना वाटते. सुदैव असे की, डॉ. बाबासाहेबांना मानणारी जनता खरेच सुजाण आहे. त्यामुळे जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणार्या लोकांना डोक्यावर आणि हृदयामध्येही स्थान दिले. त्यामुळेच तर रामदास आठवले असू देत, रा. सु. गवई असू देत, कांशीराम आणि मायावतीही असू देत की, आता पंतप्रधान मोदी असोत. या सगळ्यांना जनतेने त्या त्या काळात भरभरून प्रेम आणि सन्मान दिला. जनतेला माहिती आहे, कोण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार चालतो आणि कोण नाही!
सरन्यायाधीशांचे मोठेपण!
सरन्यायाधीश भूषण गवई मुंबईमध्ये आले असता, त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्य सचिव किंवा पोलीस महासंचालक तसेच मुंबई पोलीस आयुक्त उपस्थित नव्हते. माकडाच्या हातात कोलीत यावे, तसे या घटनेचे भांडवल करत राज्यातील समाजविघातक शक्तींनी लगोलग या घटनेवरुन अपप्रचार आरंभला. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आता जाहीर आवाहन केले आहे की, संबंधितांनी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे शुल्लक मुद्द्याला जास्त महत्त्व देऊ नये.
सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव किंवा पोलीस महासंचालक तसेच मुंबई पोलीस आयुक्त उपस्थित नव्हते. मात्र, पुढे सरन्यायाधीश चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीस्थळी वंदन करायला गेले, तेव्हा हे तिघेही अधिकारी उपस्थित होतेे. मात्र, विरोधी पक्षासह काही जातीपातीवरून समाज तोडणार्या लोकांनी तत्काळ मुक्ताफळे उधळायला सुरुवात केली की, सरन्यायाधीश अमूक एक जातीचे आहेत, म्हणून मुद्दाम त्यांचा अपमान केला. सरन्यायाधीशांनी मात्र या घटनेचे योग्य पद्धतीने मूल्यमापन केले. असो. आता सरन्यायाधीश हे आता कायमस्वरूपी राज्य अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांचा जेव्हा राज्यात दौरा असेल, तेव्हा त्यांच्या स्वागताला मुख्य सचिव अथवा त्यांचे प्रतिनिधी, पोलीस महासंचालक अथवा त्यांचे प्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतील. तसेच, सरन्यायाधीशांच्या भेटीवेळी समन्वयासाठी क्लास-1 अधिकारी नेमणे बंधनकारक असेल. तसेच, राज्यात त्यांचा दौरा असेल, तेव्हा त्यांना निवास, वाहन आणि सुरक्षा दिली जाणार आहे. सरन्यायाधीशांना कायमस्वरूपी राज्य अतिथी म्हणून घोषित केल्यामुळे राज्य सरकारचे अभिनंदन! या परिक्षेपात वाटते की, माणूस मोठा आहे याचे मोजमाप काय? पैसे, अधिकार की सत्ता? तर त्याही पलीकडे जाऊन या सगळ्यांचे धनी असतानाही चुकलेल्यांना क्षमा करण्याची आणि न्यायासह देशसमाजाच्या एकतेसाठी जी व्यक्ती विचार कार्य करते, तिच व्यक्ती सर्वार्थाने मोठी असते. यानुसार, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मोठेपण सर्वमान्य असायलाच हवे.