कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे इतर अनेक कंपन्यांप्रमाणे ‘अमोघ केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनीदेखील दोन महिने पूर्णपणे बंद होती. कारभार ठप्प होता. कंपनीत उत्पादनाची चक्रे पुन्हा कधी फिरतील, हे निश्चितपणे सांगताही येत नव्हते. पण, तरीही ‘अमोघ केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक साहिल श्रीपाद खेर यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला नाही. सर्व कर्मचार्यांना वेळेत वेतन देऊ केले. त्यामुळे कर्मचारी वर्गाचीही या संकटसमयी उत्तम साथ खेर यांना लाभली. तेव्हा, ‘कोविड’ काळातील खेर यांच्या उद्योजकीय प्रवासाची गाथा सांगणारा हा लेख...
‘अमोघ केमिकल्स’कंपनीची स्थापना १९९९ साली झाली. पुढे एक ते दोन वर्षांनी संपूर्ण क्षमतेने कंपनी कार्यान्वित झाली. विश्वजीत नामजोशी, संजय नेरकर आणि श्रीपाद खेर या तीन संचालकांनी एकत्रितपणे कंपनीला यशोशिखरावर नेण्यासाठी प्रारंभीपासूनच तन, मन, धन समर्पित करुन अथक मेहनत घेतली. तिघांपैकी विश्वजीत नामजोशी यांच्याकडे कंपनीत अकाऊंट्स आणि प्रशासकीय विभागाची सर्वस्वी जबाबदारी होती. संजय नेरकर हे कंपनीचे मार्केटिंग आणि खरेदीचे व्यवहार, याशिवाय ‘रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट’ याकडे लक्ष देत असे. श्रीपाद खेरसुद्धा कंपनीचे उत्पादन आणि सुरुवातीला थोडेफार ‘रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट’ संबंधित कामांमध्ये लक्ष देत होते.
खेर यांनी कंपनीसाठी त्याअंतर्गत अशी नवनवीन उत्पादनेही विकसित केली. पुढे नेरकर यांनी ‘रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट’ची संपूर्ण जबाबदारी खेर यांच्याकडे सोपविली. खेर यांनी या कंपनीत १३ पेटंट प्रकाशित केले, त्यापैकी सात पेटंट ग्रँट झाली, तर सहा अद्याप बाकी आहेत. श्रीपाद खेर यांनी त्यांच्या कार्यकाळात कंपनीसाठी आपल्याला भविष्यात उपयोगी पडतील म्हणून काही उत्पादने तयार करून ठेवली होती. आज श्रीपाद खेर यांचे चिरंजीव साहिल खेर हे संचालक म्हणून ‘अमोघ केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.
‘सोडियम पिक्रामेंट’ या एकमेव उत्पादनापासून कंपनीची सुरुवात झाली. त्यानंतर पुढील काळात कंपनीने अनेक नवनवीन उत्पादने विकसित केली. कपड्यावरील रंग, ‘एलईडी’मधील रंग, गाड्यांच्या लाईटच्या काचेवरील रंग इत्यादींची निर्मिती कंपनीतर्फे केली जाते. शिवाय ‘डाईज’ तयार करण्याचे कामही सध्या कंपनीत केले जाते. यातील बर्याच उत्पादनांचे ‘पेटंट’ही कंपनीने घेतले आहेत. ‘सोसायटी ऑफ डाईज’ यांच्या अनुक्रमांक असलेल्या यादीत ‘अमोघ’ कंपनीच्या नावाने एका उत्पादनाचीही नोंद आहे.
‘अमोघ’ कंपनीने उत्पादनाच्या बाबतीत गाठलेले हे यश मैलाचा दगड ठरले आहे. ‘अमोघ’ कंपनीने आपल्या आजवरच्या वाटचालीत आपल्या कार्यक्षेत्रात विश्वासार्हता संपादित केली आहे. तसेच इतरत्र उपलब्ध होणार नाहीत, अशीही काही उत्पादने फक्त ‘अमोघ’मध्येच मिळतील, अशी आपली वेगळी ओळख कंपनीने प्रस्थापित केली आहे. तसेच ‘अमोघ’ कंपनीने कधी चुकीचा माल विकला, किंमत वाढवून सांगितली किंवा कधी कुणा ग्राहकाची फसवणूक केली, असे कधीही घडले नसल्याचे आणि भविष्यातही कधी घडणार नसल्याचे खेर आवर्जून अधोरेखित करतात.
सर्व काही सुरळीत असताना अचानक मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीने अख्ख्या जगाला एकाएकी ठप्प करुन टाकले. चीनमध्येच कोरोनाचा सर्वप्रथम प्रादुर्भाव आढळल्याने चिनी बाजारपेठेलाही मोठा फटका बसला. त्यामुळे साहजिकच चीनमधून आयात केली जाणारी अनेक उत्पादने, सामग्री भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होत नव्हती. पण, ‘अमोघ’ कंपनीने नेमकी हीच संधी साधून, त्याच चिनी उत्पादनांची ‘मेड इन इंडिया’ निर्मिती आपल्या कंपनीत करण्याचा धाडसी निर्णय घेतला व त्यात कंपनी यशस्वीही झाली. ‘अमोघ’बरोबरच इतरही काही कंपन्या त्याच प्रकारच्या उत्पादनांची भारतातही निर्मिती करीत होत्या. म्हणूनच या सगळ्या कंपन्यांमध्ये सर्वात कमी किमतीत उत्पादनाची जणू रस्सीखेच सुरु होती. याविषयी बोलताना खेर सांगतात की, “आम्ही उत्पादन करताना त्याच्या दर्जात कोणतीच कसूर ठेवत नाही. अनेक उत्पादने आम्ही कमी किमतीत तयार करतो.”

‘अमोघ’ कंपनीचा व्यवसाय-व्यापाराचा पसारा केवळ भारतापुरता मर्यादित नसून कंपनीची उत्पादने युके, जपान, मेक्सिको, थायलंड, स्वित्झर्लंड, स्पेन यांसारख्या देशांमध्येदेखील निर्यात केली जातात. काही ठरावीक उत्पादनांबरोबरच नवनवीन उत्पादनांच्या जगभरातील मागण्यांचीही कंपनीकडून पूर्तता केली जाते. पण, कोरोना आणि ‘लॉकडाऊन’ काळात सर्वत्रच अनिश्चिततेचे वातावरण होते. अशा स्थितीत कर्मचार्यांना वेतन कसे द्यायचे? आपला माल विकला जाईल किंवा नाही, याची चिंता खेर यांनाही सतावत होती. पण, या संकटकाळात खेर यांनी एकाही कर्मचार्याची पगारकपात केली नाही अथवा कुणाला नोकरीवरुन कमीही केले नाही.
त्यामुळे कालांतराने कंपनी पुन्हा जोमाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितल्यावर लगेचच कर्मचार्यांनी कामावर रुजू होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. जे कर्मचारी ‘लॉकडाऊन’च्या काळात भीतीपोटी आपल्या मूळ गावी परतले होते, ज्यांना पुन्हा शहरांत येण्यासाठी कुठलीही वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती, त्यांनीही फोन करून, “वाहतूक व्यवस्था पूर्ववत होताच आम्ही कंपनीत रुजू होऊ,” असे कंपनीला आश्वासन दिले आणि झालेही तसेच. यावर साहिल खेर उद्योजकांना उद्देशून म्हणतात की, “तुम्ही कंपनीचे मालक आहातच. पण, केवळ तुमच्यामुळेच कंपनी सुरु आहे, असे समजू नका. कर्मचार्यांमुळे तुम्ही आहात आणि तुमच्यामुळे कर्मचारी आहेत. कर्मचारी आणि मालक हे दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून चालत असतात. त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे चालून उपयोग नाही,” असा महत्त्वाचा सल्ला खेर खासकरुन नवउद्योजकांना देतात.
काही कर्मचार्यांच्या मनात साहजिकच ‘कंपनीत जायला लागल्यावर कोरोना झाला तर काय,’ अशी भीतीची भावना होती. यादरम्यान कंपनीतील एका सुपरवायझरला कोरोनाची बाधा झाली. पण, खेर यांनी त्या संबंधित सुपरवायझरला आराम करण्याचा, काळजी करण्याचा आपुलकीचा सल्ला तर दिलाच, पण त्या सुपरवायझरच्या पगारातून एक पैशाचीही कपात केली नाही. याच दरम्यान, साहिल यांचे वडील श्रीपाद यांनादेखील कोरोनाची लागण झाली. त्यांना कोरोना झाला आहे, हे सुरुवातीला त्यांना समजलेही नाही. जेव्हा त्यांची ‘कोविड’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली, तेव्हा त्यांच्या फुप्फुसात मात्र २५ टक्के संसर्ग पसरला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. हे सर्व गणेशोत्सवाच्या तोंडावरच घडले.
सुदैवाने त्यांचे वडील गणेशोत्सवाच्या एक दिवस आधीच घरी आले. कंपनीतील कामे इतर काही कर्मचार्यांसारखीच खेर यांनीही घरातूनच केली. गणेशोत्सवही साजरा केला. साहिल प्रामाणिकपणे कबूल करताना सांगतात की, “माझ्या मागे वडील खंबीरपणे उभे होते, म्हणून मी या संकटकाळात प्रगती करु शकलो. त्यामुळे माझे वडीलच माझी खरी प्रेरणा आहेत.
”संकटसमयी नोकरकपात करणे अजिबात योग्य नाही. कर्मचारी आणि मालक या दोघांच्या मेहनतीवर कंपनी उभी राहत असते. त्यामुळे कठीण प्रसंगात कर्मचार्यांना साथ देणे गरजेचे आहे. मालक कर्मचार्यांच्या मागे ठाम उभे राहिल्यास कर्मचारीदेखील ठामपणे उभे राहतील.