दुर्दैवी पूजा चव्हाणला न्याय कसा मिळणार?

    21-Feb-2021
Total Views | 139

pooja chavan_1  


सुशांत प्रकरणी जसा ‘एफआयआर’ नोंदवायला विलंब झाला तसाच विलंब पूजाच्या आत्महत्येबाबतीतही होत आहे. त्यामुळे संशय निर्माणच होत नाही तर वाढतही आहे. तो व्यक्त होणेही स्वाभाविकच होते. कारण, संशय कुणा सामान्य माणसाबद्दल नव्हे तर मंत्री महोदयांनीच निर्माण केला.



आत्महत्या मग ती पूजा चव्हाण या तरुणीची असो की, सुशांतसिंह राजपूतसारख्या गुणी अभिनेत्याची असो, दुर्दैवीच आहे. अशा घटनांचे राजकारण करणे तर त्याहून दुर्दैवी आहे. मात्र, राजकारणाचा एक भाग म्हणून या दुर्दैवी घटनांवर पांघरूण घालण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होत असेल, कायद्याचे राज्य या संकल्पनेला सुरुंग लावण्याच्या कारवाया होत असतील, तर ते केवळ दुर्दैवीच नव्हे तर निषेधार्ह ठरते. पूजा चव्हाण बंजारा समाजाची असल्याने त्या समाजाला तिच्याविषयी सहानुभूती वाटत असेल वा दु:ख होत असेल, तर तेही स्वाभाविकच आहे. ते दु:ख त्या समाजापुरतेही राहायला नको. संपूर्ण भारतीय समाजासाठीच ती दु:खाची बाब आहे. खरेतर अशा वेळी कथित आत्महत्येच्या चौकशीवर लक्ष केंद्रित व्हायला हवे. पण आणखी एक दुर्दैवाची बाब म्हणजे आज पोलिसांपासून तर राज्यकर्त्यांपर्यंत सगळे लक्ष एका संशयित मंत्र्याला वाचविण्यावर केंद्रित होत आहे. त्या मंत्र्याला मी अद्याप ‘संशयित’ म्हणत नाही. कारण, त्या संदर्भात अद्याप कुणीच तक्रार केलेली नाही. विरोधी पक्षही अद्याप त्याचे नाव घेऊ इच्छित नाही. पण घटनेनंतर १२-१३ दिवस ते स्वत:च लपून राहणार असतील, अज्ञातवासात तोंड लपवित असतील, तर त्यांनी स्वत:च स्वत:ला संशयित घोषित केले आहे, असे म्हणावे लागेल आणि त्वरित प्रकट होऊन आपली भूमिकाही त्यांनाच मांडावी लागेल.


दुर्दैवाचा फेरा इथेच संपत नाही. पूजाने खरोखरच आत्महत्या केली की, तिचा अपघात वा घातपात झाला, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुणी म्हणतात, तिचा अपघात झाला. ती वरच्या मजल्यावरून तोल जाऊन पडली. पण पहिल्या की, दुसर्‍या हा प्रश्न अद्याप सुटला नाही. कुणी म्हणतात तिने आत्महत्या केली पण तिची ‘सुसाईड नोट’ कुठेही सापडलेली नाही. त्यामुळे तिची हत्या झाली असावी, असाही संशय येतो. किंबहुना त्यामुळेच बहुधा उच्च पातळीवरून झाकपाक तर होत नाही ना, असा संशय बळावतो. अशा घटनेचे प्रत्यक्ष पुरावे मिळायला पोलिसांना प्रचंड प्रयत्न करावे लागतात. पण जेव्हा ते उपलब्ध होत नाहीत तेव्हा न्यायालयेही परिस्थितिजन्य पुराव्यांचा आधार घेऊन निर्णय देतात. या प्रकरणातील परिस्थितिजन्य पुरावेही तसेच सूचित करतात. पूजाच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणात अगदी विरोधी नेत्यांनीही राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतलेले नाही. त्यांच्यावर कुठलाही आरोप केला नाही. तरीही जर ते १२-१३ दिवस गायब राहत असतील, मंत्रिमंडळाच्या बैठकीसही गैरहजर राहत असतील तर लोकांनी काय निष्कर्ष काढावा? प्रारंभी पोहरादेवी येथील महंतांनी जाहीर केले की, ते दि. १८ फेब्रुवारीला पोहरादेवी येथील मठात येतील, सेवालाल महाराजांचे दर्शन घेतील व आपली भूमिका माध्यमांसमोर मांडतील. पण, दि. १७ फेब्रुवारीलाच जाहीर करण्यात आले की, ते दि. १८ फेब्रुवारीला येणार नाहीत. केव्हा येतील ते आम्ही दोन दिवस आधी जाहीर करू, त्या दिवशी लोकांनी पोहरादेवीला यावे. मुळात घडणार्‍या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवीला येण्याचे प्रयोजनच नाही. खरेतर सर्वप्रथम त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटले पाहिजे. आपण इतके दिवस कुठे होतो, हे सांगितले पाहिजे. अज्ञातवासाचेही पटण्यासारखे कारण सांगितले पाहिजे. तसे काही न करताच जर ते पोहरादेवीला येणार असतील, तर त्याचे फार वेगवेगळे अर्थ निघू शकतात. वास्तविक इतके दिवस गायब राहण्याचे कोणतेही कारण असू शकत नाही. कारण, ते जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असले तरी पूजाच्या कथित आत्महत्येची आणि त्यांच्या संशयित अज्ञातवासाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. एकाच स्थितीत ते शक्य नाही, जेव्हा कुणीतरी अज्ञात ठिकाणी त्यांच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवले असेल तर. पण तशी शंकाही कुणी व्यक्त करीत नाही. तसे असते तर पोहरादेवीच्या महंतांनी तरी तसे म्हटले असते. पण ते तर राठोडसाहेब आपल्या संपर्कात असल्यासारख्या विश्वासाने त्यांच्या कार्यक्रमांसंबंधी घोषणा करतात. त्यामुळे त्यांच्या अज्ञातवासाचे गूढ अधिकच वाढते.


दुसरा प्रश्न पूजा पुण्याला ज्या घरात ज्यांच्यासोबत राहत होती त्या अरुण राठोड यांच्या काही दिवस गायब राहण्याचा. आता त्यांना पोलिसांनी अटक केली आहे, पण तेही बरेच दिवस अज्ञातवासातच होते. ते पूजाचे भाऊ असल्याचे सांगितले जाते, पण त्याबद्दलही प्रश्नच आहे. कारण, पूजाच्या कथित आत्महत्येच्या एक दिवस अगोदर यवतमाळच्या हॉस्पिटलमध्ये पूजा अरुण राठोड या नावाच्या एका तरुणीने गर्भपात करून घेतल्याची नोंद झाली आहे. ती पूजा अरुण राठोड दुसरी कुणीतरी असेल असे म्हणावे, तर गर्भपात करवून घेणारे ते दाम्पत्य अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे आणखी एक प्रश्न निर्माण होऊन गूढ वाढले. संजय राठोड यांनी स्वत:ला या पद्धतीने संशयित घोषित केले नसते तर काय झाले असते? पूजाच्या आत्महत्येची अपघाती मृत्यू म्हणून पोलिसात नोंद झाली असती. त्या आत्महत्येबद्दल एवढा गलबला झाल्यानंतर कदाचित ‘एफआयआर’ही नोंदविण्यात आला असता व पोलीस चौकशी सुरू झाली असती. पण तसे घडलेले दिसत नाही. सुशांत प्रकरणी जसा ‘एफआयआर’ नोंदवायला विलंब झाला तसाच विलंब पूजाच्या आत्महत्येच्या बाबतीतही होत आहे. त्यामुळे संशय निर्माणच होत नाही तर वाढतही आहे. तो व्यक्त होणेही स्वाभाविकच होते. कारण, संशय कुणा सामान्य माणसाच्या संदर्भात निर्माण झाला नाही. तो स्वत: मंत्री महोदयांनीच निर्माण केला. त्यामुळे विरोधी पक्ष जर त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असतील, तर तेही तेवढेच स्वाभाविक आहे. कारण, प्रश्न पूजा कोणत्या समाजाची आहे हा नाहीच. पूजा कोणत्याही समाजाची असो, ती त्या समाजाची नसती तरीही तिच्या दुर्दैवी आत्महत्येला आपल्या संशयास्पद व्यवहारामुळे बळ देणार्‍या व्यक्तीचा प्रश्न निश्चितच आहे आणि ती व्यक्ती जर राज्याची मंत्री असेल तर या विषयाचे महत्त्व शतपटींनी वाढते.


बंजारा समाजाच्या मान्यवर नेत्यांनीही हा प्रश्न संशयिताला समोर करून समाजाचा बनवावा, हे एक आश्चर्यच आहे. खरेतर आपल्या समाजातील एका सुविद्य तरुणीवर आत्महत्या करण्याची पाळी यावी याची त्यांना चिंता वाटायला हवी होती. तिच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी समाजधुरिणांनी करायला हवी होती. त्यांच्या सहानुभूतीची दिशा जर पूजाच्या बाजूने वळली असती, तर ते स्वाभाविकच ठरले असते. कारण, बंजारा समाज हा अद्यापही वंचित म्हणूनच ओळखला जातो. पूजासारख्या त्याच्या घटकावर अन्याय होणे अशक्य नाही. पण दुर्दैवाने हे मान्यवर नेते पूजाबद्दल बोलत नाहीत. तिच्यावर अन्याय होऊ शकतो हे सूचितही करीत नाहीत. पण स्वत:च संशयित बनलेल्या मंत्र्याच्या संदर्भात जेव्हा प्रश्न उपस्थित होतात तेव्हा मात्र त्यांना हा विषय समाजाच्या अपमानाचा आणि बदनामीचा वाटतो आणि ते त्याच्या बचावासाठी आपली तपश्चर्या पणाला लावतात, हा पूजावरील फार मोठा अन्याय ठरतो. वास्तविक पूजाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणार्‍या व्यक्तीचा शोध घेण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे होते. पण ते आज संशयितांच्याच बचावासाठी धडपडत आहेत, या पद्धतीने ते संशयितापेक्षाही पूजावर जास्त अन्याय करीत आहेत, असे वाटते. या ठिकाणी हे उल्लेखनीय आहे की, पूजाला कुणीही दोष दिलेला नाही. तिच्यावर कुणीही आरोप केलेला नाही. मग तिची वा तिच्या कुटुंबाची बदनामी कशी काय होऊ शकते? व त्या कथित बदनामीबद्दल गळे का काढले जात आहेत? संबंधित मंत्रिमहोदयांच्या लोकप्रियतेचा वा समाजसेवेचाही प्रश्न कुणी उपस्थित केलेला नाही. समाजाचा त्यांच्यावर विश्वास नाही, असेही कुणी म्हटलेले नाही. एवढेच काय, पण या प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचा आरोपदेखील कुणीही नाव घेऊन केला नाही. सर्वांचा आग्रह एकच आहे व तो म्हणजे या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी. जे काही पुरावे हाती आहेत, त्यांची कायद्यातील तरतुदीनुसार छाननी व्हावी. पण तेही जेव्हा घडत नाही तेव्हा प्रश्नांचे मोहोळ उठणे अपरिहार्य आहे. ते उठविणार्‍यांना धमक्या देणे तर संशयाला पुष्टी देणारेच आहे.


गृहमंत्री म्हणतात, “नियमानुसार चौकशी होईल.” पण नियमांची व्याख्याही त्यांनी स्पष्ट केली असती तर बरे झाले असते. १२-१३ दिवस ‘एफआयआर’ही न नोंदविणे, हा नियम कायद्यात केव्हा समाविष्ट झाला, हे त्यांनी सांगायला हवे. संशयिताच्या ठावठिकाण्याबाबत तर ते कानावर हात ठेवून मोकळे होतात. नियमाची ही कोणती पद्धत आहे? खरेतर पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई केली असती, तर हा विवादच निर्माण झाला नसता. पण सरकार स्वत:च संशयितांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा संशय बळावला तेव्हा पूजाची आत्महत्या ऐरणीवर येणे अपरिहार्य आहे. नशीब धनंजय मुंडेंसारखे मंत्री पूजाची आत्महत्याच आहे, असे ठासून सांगू लागले आहेत. अन्यथा तिचा मृत्यू अपघाती आहे, त्यात कोणताच घातपात नाही, अशी भावना निर्माण करण्याच्या प्रयत्नाने जोर धरला असता. या आत्महत्येचे संभाव्य पुरावेच समोर आले नसते, तर प्रश्न वेगळा ठरला असता. पण अनेक पुरावे समोर आले आहेत. ते पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. त्यांची शहानिशा तर शास्त्रीय पद्धतीने व्हायला हवी होती. पण त्याबाबतीतही पोलीस ढिम्मच आहेत. संबंधित ध्वनिफितीतील आवाज कुणाचा आहे, हे ठरविण्यासाठी जर त्यांच्या नातेवाईकांचा वापर होत असेल तर मग राज्यात न्यायसाहाय्यक प्रयोगशाळा हव्यातच कशाला, असा प्रश्न समोर येतो. आज सहानुभूतीची खरी गरज आहे पूजाला. पण आपल्या राजकारणासाठी ती वळविली जात आहे संशयितांकडे. हा दिवंगत पूजावरील सर्वात मोठा अन्याय आहे व त्याबद्दल किमान ती तरी संबंधितांना माफ करणार नाही.

-ल. त्र्यं. जोशी
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121