
भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दि. २६ डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. एकूण तीन सामन्यांची ही मालिका होणार आहे. मात्र, या दौऱ्यात भारतीय संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंची खरी कसोटी लागणार आहे. भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, भरोसेमंद कसोटीपटू म्हणून ओळखल्या जाणारा चेतेश्वर पुजारा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या खेळाडूंना आपला ‘फॉर्म’ सिद्ध करण्यासाठी ही अखेरची संधी असल्याचे बोलले जात आहे. या मालिकेत आपले कर्तृत्व सिद्ध करण्यात जर हे वरिष्ठ खेळाडू अपयशी ठरले, तर आगामी काळात भारतीय संघात या खेळाडूंना स्थान मिळणे, कठीण असल्याचे कळते. त्यामुळे या मालिकेत आपला ‘फॉर्म’ सिद्ध करण्याखेरीज इतर कोणताही पर्याय या खेळाडूंकडे नाही. केवळ हे दोन खेळाडूच नव्हे, तर मधल्या फळीतदेखील अनेक खेळाडूंचे कौशल्य पणाला लागणार आहे. खुद्द कर्णधार विराट कोहलीपुढे आपल्या शतकांचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान असणार आहे. कोहलीच नव्हे, तर उपकर्णधार म्हणून जबाबदारी मिळालेल्या लोकेश राहुलच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा असणार आहेत. मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी, श्रेयस अय्यर आदी खेळाडूही कशा प्रकारे कामगिरी करतात, यावर निवड समितीचा ‘वॉच’ राहणार असून आगामी काळात संधी कुणाला मिळणार, याचेही उत्तर या दौऱ्यातून मिळणार आहे. केवळ फलंदाजच नव्हे, तर वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंसाठी देखील हा दौरा म्हणजे एक मोठी परीक्षाच असणार आहे. परदेशांतील खेळपट्ट्या या फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजांसाठी पोषक मानल्या जातात. त्यामुळे संघात किती वेगवान गोलंदाजांना आणि फिरकीपटूंना स्थान मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, उमेश यादव यांपैकी कोणत्या प्रमुख वेगवान गोलंदाजांना संघात स्थान मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अष्टपैलू खेळाडू म्हणून रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर या तिघांपैकी कुणाला संधी मिळणार, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, संघातील प्रत्येक खेळाडूसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा कसोटीचा ठरणार, यात शंका नाही.
कबड्डी कबड्डी...
बुधवार, दि. २२ डिसेंबरपासून ‘प्रो कबड्डी लीग’च्या स्पर्धांना सुरुवात होणार असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. तब्बल दोन वर्षांनंतर ‘प्रो कबड्डी लीग’चे सामने पुन्हा एकदा क्रीडारसिकांना पाहायला मिळणार आहेत. कोरोना महामारीच्या संकटामुळे जवळपास गेल्या दोन वर्षांपासून ‘प्रो कबड्डी लीग’चे आयोजित करता आले नाही. यंदाच्या वर्षी उशिरा का होईना, सुरक्षेच्या ठोस उपाययोजना करत अखेर ‘प्रो कबड्डी लीग’च्या सामन्यांचे आयोजन करण्यात आयोजकांना यश आल्याने क्रीडारसिकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. आत्तापर्यंत ‘प्रो कबड्डी लीग’चे सात हंगाम पार पडले असून, भारतासह जगभरातील क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘इंडियन प्रीमियर लीग’प्रमाणेच (आयपीएल) कबड्डीच्या खेळाचेही व्यावसायिक सामन्यांचे आयोजन करत भारतात सर्वात प्रथम २०१४ साली ‘प्रो कबड्डी लीग’ सुरू करण्यात आली. आत्तापर्यंत एकूण सात हंगाम ‘प्रो कबड्डी लीग’स्पर्धेचे यशस्वीरीत्या पार पडले असून,अनेक कबडीपट्टू या स्पर्धेमुळे मालामाल झाल्याचा इतिहास आहे. २०१४ साली या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला ‘प्रो कबड्डी लीग’मध्ये आठ संघांचा समावेश करण्यात आला होता. परंतु, आता ‘प्रो कबड्डी लीग’ची व्याप्ती वाढली असून, या स्पर्धेत आता एकूण १२ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक हंगामात क्रीडरसिकांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्यानेच ‘प्रो कबड्डी लीग’मध्ये १२ संघांचा समावेश करण्यात आल्याचे आयोजक सांगतात. २०१६ साली तर या स्पर्धेचे एकाच वर्षात तब्बल दोन हंगाम आयोजित करण्यात आले होते. रसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, स्पर्धेची व्याप्ती वाढल्यानंतर दरवर्षी दोन हंगाम भरविणे कठीण होऊ लागले. त्यामुळे वर्षाला एकच हंगामाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रिकेटची ‘आयपीएल’, फुटबॉलची ‘आयएसएल’ त्याचप्रमाणे दरवर्षी आता कबड्डीची ‘प्रो कबड्डी लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात येते. क्रिकेट आणि फुटबॉलच्या खेळामध्ये लीग स्पर्धांचे आयोजन अनेक देशांकडून करण्यात येते. मात्र, कबड्डीच्या खेळामध्ये लीग स्पर्धांचे आयोजन करण्यात आत्तापर्यंत केवळ भारत हा एकमेव देश यशस्वी ठरला आहे, हे विशेष.
- रामचंद्र नाईक