तलासरी हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर एका प्रदीर्घ संघर्षाचा जीवनपट उभा राहतो. १९६४ साली विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेनंतर सेवाकार्य सुरू करण्याचा निर्णय होतो आणि तलासरी येथे प्रकल्प सुरू करण्याचे ठरते. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला, लाल बावट्याचा रक्तरंजित दहशतवाद, ख्रिश्चन मिशनर्यांचे जुने काम अशा प्रतिकूल परिस्थितीत अयोध्येच्या रामरायाप्रमाणे स्वतःचे राजकीय पद सोडून माधवराव काणे तलासरीत दाखल होतात. सात मुलांना घेऊन एका झोपडीवजा घरात वसतिगृहाची सुरुवात होते. अनंत अडचणी, स्थानिक विरोध, प्रकल्पावर झालेले हल्ले, कार्यकर्त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न अशा संकटांच्या मालिकांवर मात करत उत्तुंग ध्येयासक्तीच्या जोरावर प्रकल्प उभा राहातो.
संपर्क - संस्कार - संघटन या संघ कार्यपद्धतीच्या त्रिसूत्रीनुसार समाजमान्यता मिळवत दीपस्तंभाप्रमाणे झळकू लागतो. त्या अनुभव आणि प्रेरणेतून 'वनवासी कल्याण आश्रम', 'हिंदू सेवा संघ' अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून चालतवड, बेरीस्ते, खानवेल, आम्भाण, देवबांध येथेही वसतिगृहे सुरू होतात. सूत्रकार, दापचेरी, चिंचले इथे शाळा सुरू झाल्या. डहाणू आणि भिवंडी येथे कॉलेज विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू झाली. असंख्य प्रकल्पांचे जाळे आजूबाजूस हळूहळू उभे राहिले. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, बचतगट, स्वयंरोजगार, धर्मजागरण अशा अनेक विषयांत नेत्रदीपक काम उभे राहिले. या प्रवासास यावर्षी ५२ वर्षे पूर्ण होत आहेत.
गत ५० वर्षांत म्हटलं तर कामाचा डोंगर उभा राहिला. तलासरीत २५० मुला-मुलींचे वसतिगृह, ७५० मुलांची शाळा, १५० गायींची गोशाळा उभी राहिली. ३००० हून अधिक मुलेमुली शिकून बाहेर पडली, ७०० हून अधिक जण कामाला लागले. राजकीय ताकद उभी राहिली. आरोग्य शिबिरे, मोबाईल डिस्पेंसरी, दवाखाना, गणेशोत्सव, सामुदायिक विवाह, परावर्तन, वनवासी पर्यटन या माध्यमातून आजूबाजूच्या पाड्यांवर संपर्क प्रस्थापित झाला. डहाणू केंद्राद्वारे ४५० महिला बचतगट, गर्भवती महिला, एड्स, टी.बी, पोलिओ लसीकरण या विषयात संपूर्ण ठाणे जिल्हा स्तरावर केलेले आरोग्य विषयातले कार्य, पाळणाघरे, कम्युनिटी पॉलिटेक्निक अंतर्गत दिलेले टेलरिंग, संगणक, ब्युटीशियनचे प्रशिक्षण, असे अनेक खासगी आणि सरकारी प्रकल्प यशस्वीपणे राबवत असताना आपण खरंच वनवासी समाजाचा विकास साधत आहोत का, हा प्रश्न मनाला सतत पडत होता. यातूनच वनवासी समाजाच्या समस्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रवास सुरू झाला.
स्वातंत्र्यानंतरही प्रामुख्याने दुर्गमता, निरक्षरता, कमालीच्या न्यूनगंडातून आलेला जन्मजात बुजरेपणा आणि प्रामुख्याने सुशिक्षित हिंदू समाजाच्या दुर्लक्षामुळे वनवासी समाज मुख्य धारेत जुळू शकला नाही. कुपोषण, महिला आरोग्य, दारिद्य्र, निरक्षरता अशा समस्यांमध्ये तो 'ठेविले अनंते, तैसेची राहावे' या न्यायाने पिचत राहिला. निसर्गाशी एकरूप जीवनशैलीमुळे त्यानेही स्वतःला तथाकथित शहरी विकास आणि कोलाहलापासून दूरच ठेवले. याच सुमारास शहरीकरणाचा विस्तार, धरणांमुळे होणारे विस्थापन, सरपण यामुळे प्रचंड जंगलतोड सुरूच होती.
वनवासी समाज आज संक्रमणातून जात आहे. दुसरी किंवा तिसरी पिढी शिक्षण घेत आहे. तो आता नोकरी, व्यवसाय करू लागला आहे. मुंबई शहरीकरणाची लोकल थेट डहाणूपर्यंत येऊन धडकली आहे. मोबाईल, टीव्ही, केबल थेट पाड्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे. तारपा मागे पडून डिस्को दांडिया प्रचलित होत आहे. ताडी आणि दारू कमी होतेय, पण त्याची जागा महागड्या कोक, पेप्सीचा 'थंडा' घेत आहे. इंटरनेट आणि व्हॉट्सअॅपचा वापर वाढतो आहे. शासकीय आरोग्य सेवा पाड्यापर्यंत बर्यापैकी पोहोचू लागली आहे, पण त्याचबरोबर भयानक विदारक स्थितीतही निराश न होणारा वनवासी आता आत्महत्या करू लागला आहे. शिक्षणाची गंगा तर आली, पण केवळ पुस्तकी शिक्षणामुळे 'ना घर का ना घाट का' राहिलेल्या तरुण पिढीपुढे भविष्य आ वासून उभे आहे.
सुसंस्कृत समाजासही लाजवेल, असे वनवासींचे समृद्ध पारंपरिक ज्ञान, कौशल्य, तंत्रज्ञान, कला, संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तरुण आणि शाळेत शिकणारी वर्तमान पिढी शेतीपासून पूर्णपणे तुटलेली आहे. विज्ञानयुगाच्या रेट्यामध्ये निसर्गनियमाने जगणारा निरागस वनवासी हतबल होऊन पाड्यावरून उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
या समस्येवर आपण हिंदू चिंतनावर आधारित परंतु कालसुसंगत मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. पूज्य विनोबांनी दिलेले सूत्र-समृद्ध गावांचा समृद्ध देश साकारण्याचा प्रयत्न करत आहोत. गेली ४ वर्ष आपण तलासरीजवळील गंभीर गडाच्या पायथ्याजवळील एका ग्रामसमूहात ग्रामविकासाचा प्रयत्न करत आहोत. यात प्रामुख्याने खालील विषयांवर काम सुरू आहे.
· स्थलांतर थांबवून जल, जमीन, कृषी, जंगल, पशुधन या स्थानिक संसाधनांवर आधारित ग्रामविकास
· नैसर्गिक संसाधनांचा विकास आणि सुदृढीकरण तसेच ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधार
· पारंपरिक ज्ञान आणि आधुनिकतेचा सुयोग्य मेळ साधत कृषिजीवन समृद्ध करणे
गेल्या काही वर्षांत शासनस्तरावरही वनवासी समाजाच्या उत्कर्षासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. काही कायदे की जे वनवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल करू शकतात, असे पारित झाले आहेत. सामूहिक वनहक्क कायदा, जैवविविधता कायदा, पेसा कायदा, रोजगार हमीचा कायदा. या सर्व कायद्यांचा वापर करून आपण वनवासींचे जीवन आणि पाड्यावरील राहणीमान सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. आपला विकास आपणच शिक्षित होऊन केला पाहिजे, हे त्यास पटवून देण्याचे कार्य आपण करत आहोत.
प्रत्येक समाजाचे स्वतःचे असे एक समृद्ध कलाजीवन असते. निसर्गाच्या समीप राहण्यामुळे वनवासी समाजात अभिजात निरागसता असते, जी त्यांच्या कला आणि संस्कृतीत उतरते. याचमुळे वारली चित्रकला जगात सुप्रसिद्ध आहे. या प्राचीन वनवासी परंपरा, मूल्य आणि संस्कारांचे दृढीकरण व्हावे यासाठी प्रकल्प वनवासी जीवनाचा सर्वांगीण अभ्यास करणारे परिसर अध्ययन केंद्र स्थापणार आहे. या माध्यमातून वनवासींच्या प्राचीन परंपरा, देवदेवता, चालीरीती, बोलीभाषा, साहित्य, नृत्य, संगीत, चित्रकला, मूर्तीकला इत्यादींचा अभ्यास, संग्रहण आणि संवर्धन करण्यात येईल. वनवासी संस्कार आणि पूजा पद्धतींचे पुस्तक, ऑडिओ आणि व्हिडीओ रूपात डॉक्युमेंटेशन करण्यात येईल. वैदू आणि भगतांकडील परंपरागत गूढ ज्ञान, तत्त्वज्ञान, औषधी वनस्पतींचे ज्ञान पुढील पिढीकडे संक्रमित करण्यासाठी वनवासी समाजाच्या मान्यतांच्या आधीन राहून रचना उभ्या करण्यात येतील.
आपला मूळ प्रकल्प वसतिगृह-इयत्ता ५ वी ते १० सलग सहा वर्ष आपण मुलांना घडवतो, संस्कारित करतो. माणूस म्हणून उभा करतो. राष्ट्रभक्तीने प्रेरित करतो.वसतिगृहाच्या कार्यपद्धतीवरही आपण मूलभूत चिंतन करून आमूलाग्र बदल करत आहोत. जागतिकीकरणाच्या आणि आधुनिकतेच्या वावटळीत वनवासी समाजाचा तरुण भविष्यात कसा टिकेल? संस्कारांच्या भक्कम पायाबरोबरच नव्या युगाची कौशल्येही आपण त्याला आत्मसात करावयास लावणार आहोत.आधुनिक कृषी, प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती, इंजिनिअरिंग स्किल्स, टेक्निकल कोर्सेस, मार्केटिंग अशा नव्या युगाच्या आयुधांनी आपण त्याला सुसज्ज करणार आहोत. या विषयातील Hands on अनुभव त्यांना मिळावा म्हणून काही मॉडेल आपण वसतिगृहात उभी करणार आहोत. ग्रीन हाऊस, शेड नेट, ठिबक सिंचन, फुलशेती, भाजीपाला लागवड, बीजनिर्मिती, जलसंधारण, पशुवैद्यकीय अशा अनेक विषयांत आपण त्याला वसतिगृहाच्या रोजच्या दिनचर्येत काम करायला लावणार आहोत.
अर्थात हा जगन्नाथाचा रथ आपणा सर्वांच्या सहभागामुळेच आणि सहकार्यामुळेच पन्नाशीनंतरही दुप्पट गतीने मार्गस्थ राहणार आहे. मोरोपंत, दामुआण्णा टोकेकर आणि माधवराव काणे एकदा वनवासी समाजाच्या भविष्यावर चर्चा करत असताना मोरोपंत म्हणाले होते की, "वनवासी समाजाचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते आपण नक्की उभे केले, आता संपूर्ण समाजाचे नेतृत्व करू शकेल, असे वनवासी कार्यकर्ते निर्माण करणे, हे आपले लक्ष्य असले पाहिजे." आपले सहकार्य आणि सदिच्छांच्या बळावर तलासरी प्रकल्प हेच लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून अतूट आत्मविश्वासाने मार्गक्रमणा करणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क - माधव बर्वे - 9223300350, वसंतु भुसारा 9673663827