मुंबई : अजित पवारांचे ट्विटर हॅंडल सक्रीय झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजवून देणारी सर्वात मोठी उलाढाल घडली आहे. "मी शरद पवारांसोबतच आहे, राष्ट्रवादीतच आहे, पवारांच्या नेतृत्वात राज्याला स्थिर सरकार देऊ", असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे भाजपने सत्तास्थापनेच्या दाव्याला आणखी एक बळ मिळाले आहे. शरद पवार हेच माझे नेते आहेत. आपले सरकार पुढील पाच वर्षे एक प्रामाणिक काम करेल. काळजी करण्याचे काहीच कारण नाही, सारंकाही ठिक होणार आहे, तुमच्याकडून काही संयमाची गरज आहे, असेही अजित पवारांनी ट्विट केले आहे.
I am in the NCP and shall always be in the NCP and @PawarSpeaks Saheb is our leader.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Our BJP-NCP alliance shall provide a stable Government in Maharashtra for the next five years which will work sincerely for the welfare of the State and its people.
आपल्या ट्विटद्वारे त्यांनी मी राष्ट्रवादीतच आहे, असे स्पष्टीकरण देत त्यांनी शरद पवारांच्या गोटात चेंडू टाकला आहे. भाजपसोबत येऊन राज्याला स्थिर सरकार देऊ, असेही ते म्हणाले. अजित पवारांची नेमकी भूमीका काय, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी केल्यानंतर अजित पवार काय निर्णय घेतात याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. मात्र, अजित पवारांनी स्थिर सरकारच्या पारड्यात आपला निर्णय दिला असून घेतलेल्या भूमीकेवर ते ठाम असल्याचे त्यांनी केलेल्या ट्विटमधून दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद दिले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याबद्दलची शक्यता आता धूसर झाली आहे.
There is absolutely no need to worry, all is well. However a little patience is required. Thank you very much for all your support.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
अजित पवार यांनी केलेल्या ट्विटमुळे राष्ट्रवादीचा एक गट त्यांच्या पाठीशी अद्याप कायम असल्याची शक्यता अजूनही नाकाराता येत नाही. अजित पवारांनी भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना आपल्या ट्विटद्वारे धन्यवाद दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, निर्मला सितारामण, स्मृती इराणी, राजनाथ सिंह, पीयुष गोयल, सदानंद गौडा, मुख्तार अब्बास नक्वी, गजेंद्र सिंह शेखावत, खासदार गिरीश बापट, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारणी अध्यक्ष जे.पी.नड्डा आदी नेत्यांना धन्यवाद दिले आहे.