पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक समीकरण

    11-Jun-2025   
Total Views |

India

मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून, मोदी सरकारच्या कारकिर्दीमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे. गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब, महिला, युवक, दलित, वंचित आणि समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. देशाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याबद्दल मी मोदी सरकारचे आणि व्यक्तिशः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो व आभारही मानतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विशेष पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबई अध्यक्ष व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल भातखळकर, आ. संजय कुटे, आ. सीमा हीरे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील जनहिताच्या योजनांची संपूर्ण तपशीलवार माहिती सादर केली. याच काळात देशातील विविध विकास योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासास गती मिळाली असून महाराष्ट्र मोदी सरकारचा आभारी आहे, असे ते म्हणाले. राज्यात रेल्वेचे पावणेदोन लाख कोटींचे प्रकल्प सुरू आहेत, असे सांगून ते म्हणाले की, युपीए सरकारच्या काळात दहा वर्षांत राज्याला रेल्वेकरिता मिळाले होते त्याहूनही अधिक निधी मोदी सरकारने एका वर्षात दिला.

मोदी सरकारच्या सहकार्यातून राज्यात पायाभूत सुविधांची सहा लाख कोटींची कामे सुरू आहेत. एकाच वर्षात राज्यातील गरीब लाभार्थींकरिता ३० लाख घरे मंजूर करण्याचा विक्रम मोदी सरकारने केला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील लाभार्थींची सर्व यादी पूर्ण झाली असून नवी यादी तयार करण्याचे केंद्राने सुचविले आहे. 'प्रत्येकाला घर' हा मोदी सरकारचा संकल्प आहे. गरीब कल्याणाचा ध्यास घेऊन देशात मोदींनी विविध योजना राबविल्या. कोविडच्या काळापासून देशातील ८१ कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले, १२ कोटी शौचालये झाली, मुद्रा योजना, स्टँडअप इंडिया अंतर्गत अनुसूचित जातिजमातींच्या लाभार्थींना १४ हजार ७०० कोटींचे कर्ज देऊन आत्मनिर्भरतेचा आधार दिल्यामुळे या वर्गाचे जीवनमान उंचावले आहे. मोदी सरकारच्या काळात ५५ कोटी जनधन खाती उघडली गेली, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा ५१ कोटी लोकांना लाभ मिळाला, आयुष्मान भारत योजनेत ७७ कोटी खाती नोंदविली गेली असून यातून कोट्यवधी गरीबांना मोफत आरोग्य सेवा मिळत आहेत. मोदी सरकाने आतापर्यंत थेट खात्यात दिलेल्या एकत्रित लाभांची किंमत ४२ लाख कोटींची आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

स्वाभिमानी भारताचे नवे रूप


आरोग्य सेवा क्षेत्रातही मोदी सरकारच्या कारकिर्दीत लक्षणीय प्रगती झाली असून एमबीबीएस, पीजीच्या जागा वाढल्याने मोठ्या प्रमाणात डॉक्टर तयार होत आहेत. मोदी सरकारने केलेल्या कामातून स्वाभिमानी भारताचे नवे रूप ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे जगाला दिसले असून ही कारवाई ऐतिहासिक म्हणून इतिहासात नोंदविली जाईल, असेही श्री. फडणवीस म्हणाले. संरक्षण उपकरणांत भारत स्वयंपूर्ण झाला असून आता आपण संरक्षण सामग्रीची निर्यात करत आहोत. शस्त्रनिर्माणच्या क्षेत्रात खाजगी क्षेत्रामुळे निर्यात वाढ झाली असून ७४ टक्के एफडीआय झाली आहे. भारतीयांचे जगाच्या मंचावर महत्व वाढले आहे. चांद्रयान -३ मोहिमेने भारताच्या अंतराळ क्षेत्रात आपले जागतिक महत्व अधोरेखित केले आहे. जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला भारत पुढच्या तीन वर्षांत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील विदेशी गुंतवणुकीचा वेगही वाढला असून महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे, याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

‘विकास भी और विरासत भी’


मोदीजींनी सातत्याने 'विकास भी और विरासत भी' हा विचार मांडत सांस्कृतिक व धार्मिक स्थळांच्या सुधारणेकरिता मोठा निधी वितरित केला आहे. मोदी सरकारच्या काळात देशाबाहेर गेलेल्या अनेक मौल्यवान प्राचीन वस्तू परत आणण्यात आल्या, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. कार्यसंस्कृतीतील हा बदल मोदी सरकारच्या काळात देश अनुभवत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात दिसणाऱ्या परिवर्तनाचे श्रेयदेखील मोदी सरकारच्या सहकार्यालाच दिले. राज्यातील अनेक रखडलेले प्रकल्प मोदी सरकारमुळे गतिमान झाले. परिवर्तनाचे हे पर्व सुरू करून विकासाला वेग देत सामान्य माणसाच्या जीवनात नवा आनंद निर्माण केला, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.