...म्हणून घेतली संजय शिरसाटांची भेट! मंत्री चंद्रशेखर बावकुळेंची प्रतिक्रिया
11-Jun-2025
Total Views | 10
मुंबई : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, ११ जून रोजी संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. दरम्यान, आता त्यांनी या भेटीमागचे कारण स्पष्ट केले आहे. तसेच सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी कल्याण विभागाचा निधी कुणीही पळवू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "माझ्या मतदारसंघातील कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेच्या विस्तारीकरणाला परवानगी मिळाली आहे. २४० कोटींच्या प्रकल्पाच्या कामाचे भूमीपूजन करणे आणि तातडीने काम सुरू करणे या विकास कामांसाठी मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली. तसेच सुलेखा कुंभारे यांनी माझ्या मतदारसंघात चांगला प्रकल्प राबविला आहे. आताच्या प्रकल्पामध्ये थीम पार्क असून मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट आहे. राज्य शासनाने २४० कोटी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होईल," असे त्यांनी सांगितले.
सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाच्या निधी पळवू शकत नाही!
ते पुढे म्हणाले की, "अजितदादा नेहमी संबंधित विभागाच्या मंत्र्यांना बोलवून निधीसंदर्भात चर्चा करतात. मागच्या वेळीसुद्धा प्रत्येक मंत्र्याला बोलवूनच त्यांनी निधीचे वाटप केले होते. सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी कल्याण विभागाचा निधी कुठलेही सरकार कधीही पळवू शकत नाही. या दोन्ही विभागांचा निधी राखीव आहे. कधीकधी तो निधी देण्याकरिता विलंब होतो, पण निधीला कात्री लावता येत नाही. सामाजिक न्याय विभागावर आणि आदिवासी विभागावर अन्याय करता येत नाही. देवेंद्र फडणवीस सरकार कधीही सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाचा निधी काढू शकत नाही," असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बच्चू कडूंनी केलेल्या विधानावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मी बच्चू कडू यांना मुंबईमध्ये बैठक लावण्याची विनंती केली. मी स्वत: आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि आमच्या एसपींना तिकडे पाठवले. बच्चू कडू यांनी वेगवेगळ्या विभागाचे प्रश्न मांडले आहेत. मी कधीही कुणाशी सन्मानानेच बोलतो. त्यामुळे बच्चू कडूंनी चुकीच्या पद्धतीने बोलू नये. मंत्रालयाला तातडीने एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण समाजात असा संभ्रम निर्माण करणे योग्य नाही," असेही ते म्हणाले.
संपूर्ण निवडणुका महायुतीच!
"महाराष्ट्रातील संपूर्ण निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे. तसे आदेश पक्षाला आम्ही दिले आहेत. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी वाद निर्माण झाला तर तिथे मैत्रीपूर्ण लढू. पण बाकी सरसकट महायूती असून कुठलाही संभ्रम बाळगण्याची आवश्यकता नाही," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.