‘संघाच्या दृष्टीकोनातून भविष्यातील भारत’ व्याख्यानमालेत सरसंघचालकांचे मुक्तचिंतन
आज पंतप्रधान, राष्ट्रपती हे संघस्वयंसेवक आहेत, त्यामुळे कित्येक लोक म्हणतात की नागपूरहून सरकार चालते. परंतु, एकतर राज्यव्यवस्थेत व राजकारणात काम करत असलेल्या या सर्व व्यक्ती एकतर माझ्या वयाच्या किंवा माझ्याहून अधिक वयाच्या आहेत. मी संघात जेवढी वर्षे आहे, त्याहीपेक्षा जास्त वर्षे ते राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांना राजकारणात कुणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही. राजकारण, सरकारी ध्येयधोरणे यांवर आमचा प्रभाव नाही, असे डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले. राज्यव्यवस्थेत नियमानुसार जे सत्ताकेंद्र आहे तेच कायम राहिले पाहिजे, तिथे दुसरे केंद्र निर्माण होता कामा नये. त्यामुळे आम्ही ते करत नाही. आमचे कोणत्याही राजकीय पक्षाशी वैर वा अधिक मैत्री नाही. व्यक्तीनिर्माण हेच आमचे काम आहे, आणि आम्ही ते करतो, असे सरसंघचालक म्हणाले.
भारत हे स्वभावाचे नाव : भारत हे कोणत्याही भौगोलिक प्रदेशाचे नाव नसून ते स्वभावाचे नाव असल्याचे डॉ. मोहनजी भागवत यावेळी म्हणाले. या स्वभावाचा आशय ‘हिंदू’ शब्द स्पष्ट करतो आणि म्हणूनच संघाने आग्रहपूर्वक या शब्दावर भर दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, याचा अर्थ असा नाही की जे भारत म्हणतात, इंडिक म्हणतात, आर्य म्हणतात, त्यांच्याशी आमचे काही भांडण आहे. कारण, आम्हाला जे म्हणायचे आहे, तेच त्यांनाही म्हणायचे आहे, असेही ते म्हणाले. रिलीजन आणि धर्म या भिन्न गोष्टी आहेत. हिंदूंचा धर्म हा ‘मानवधर्म’ आहे. तो फक्त हिंदूंसाठी नाही तर सर्वांसाठी आहे. कारण आम्ही कधीच विश्वमानवतेपासून स्वतःला वेगळे मानले नसल्याचे भागवत यांनी सांगितले. या विचारांतूनच घडलेले हे प्राचीन राष्ट्र असून पाश्चात्यांच्या राष्ट्र-राज्य संकल्पनेतून या राष्ट्राचा विचार करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘स्टेट्स’ बदलत राहतील परंतु, राष्ट्र हे सांस्कृतिक आहे, ते शाश्वत असल्याचे भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले.
हिंदुत्व म्हणजे काय... : सरसंघचालक डॉ. भागवत यावेळी म्हणाले की, धर्मात जो शाश्वत मुल्यांचा भाग आहे, तो शाश्वतच आहे. आचारधर्म बदलायला हवा. म्हणूनच हिंदू परंपरांमध्ये इतक्या वर्षांत इतके असंख्य बदल झाले आहेत. हिंदुत्वाची संकल्पना ही विशिष्ट भाषा, आहारविहार, प्रदेश, संप्रदाय, उपासना-पूजाअर्चा पद्धती यापुरती मर्यादित नाही. सर्व विविधतांचा आम्ही स्वीकारच करतो. सर्व उपासनापद्धती सत्य आहेत, असे मानतो, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतातील सर्व संप्रदायांचा सामुहिक मूल्यबोध म्हणजे हिंदुत्व. देशभक्ती, पूर्वजगौरव आणि संस्कृती हे हिंदुत्वाचे तीन अंग असल्याचे ते म्हणाले. संघ जेव्हा ‘हिंदुराष्ट्र’ म्हणतो, तेव्हा त्यामध्ये मुसलमान किंवा इतर समाज नकोत असे अजिबात नाही. ज्याक्षणी कोणी म्हणेल की या देशात मुसलमान नकोत, तेव्हा ते हिंदुत्व राहणार नाही. कारण हिंदुत्व हे मुळातच ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्व सांगणारे असल्याचे भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘वी हॅव कम टू फुलफील, नॉट टू डीस्ट्रॉय’, अशा शब्दांत भागवत यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. या देशाचे संविधान हे आपल्या लोकांनीच निर्माण केले आहे. त्याचे पालन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून हीच संघाची प्रारंभीपासूनची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भारत - संघाच्या दृष्टीकोनातून : भारताच्या भविष्याबद्दल चिंतन करताना सरसंघचालक म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सामर्थ्यसंपन्न भारत देश हवा आहे. ते सामर्थ्य दुसऱ्याला खाली खेचण्यासाठी निश्चितच नसेल. परंतु, ज्याच्याकडे सामर्थ्य नाही, त्याची चांगली गोष्टही कोणी ऐकत नाही, म्हणून हे सामर्थ्य हवे. आर्थिक, नैतिक, सामरिक सामर्थ्य हवे. हे सामर्थ्य कशासाठी तर वैश्विक मानवतेसाठी हवे असल्याचे सांगत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी रा. स्व. संघाला ज्ञान, शील आणि सामर्थ्यसंपन्न भारत हवा असल्याचे स्पष्ट केले. तसेच, समतायुक्त आणि शोषणमुक्त त्याचसोबत विश्वप्रती सद्भावना असणारा देश संघाला हवा आहे, असे डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरसंघचालक उवाच..
Ø संघ राजकारणापासून अलिप्त आहे याचा अर्थ असा नाही की संघ परकीय घुसखोरीबद्दल काहीच बोलणार नाही. संघाला राष्ट्रीय प्रश्नांवर मते आहेत आणि ती तो मांडतो.
Ø राजकारण, सरकारी ध्येयधोरणे यांवर आमचा प्रभाव नाही. राज्यव्यवस्थेत नियमानुसार जे सत्ताकेंद्र आहे तेच कायम राहिले पाहिजे, तिथे दुसरे केंद्र निर्माण होता कामा नये.
Ø व्यक्तीनिर्माण हेच आमचे काम आहे, आणि आम्ही ते करतो.
Ø भारत हे कोणत्याही भौगोलिक प्रदेशाचे नाव नसून ते स्वभावाचे नाव आहे. या स्वभावाचा आशय ‘हिंदू’ शब्द स्पष्ट करतो.
Ø हिंदूंचा धर्म हा ‘मानवधर्म’ आहे. तो फक्त हिंदूंसाठी नाही तर सर्वांसाठी आहे. कारण आम्ही कधीच विश्वमानवतेपासून स्वतःला वेगळे मानलेले नाही.
Ø भारत हे प्राचीन राष्ट्र असून पाश्चात्यांच्या राष्ट्र-राज्य संकल्पनेतून या राष्ट्राचा विचार करता येणार नाही. ‘स्टेट्स’ बदलत राहतील परंतु, राष्ट्र हे सांस्कृतिक आहे, शाश्वत आहे.
Ø भारतातील सर्व संप्रदायांचा सामुहिक मूल्यबोध म्हणजे हिंदुत्व. देशभक्ती, पूर्वजगौरव आणि संस्कृती हे हिंदुत्वाचे तीन अंग आहेत.
Ø संघ जेव्हा ‘हिंदुराष्ट्र’ म्हणतो, तेव्हा त्यामध्ये मुसलमान नकोत असे अजिबात नाही. ज्याक्षणी कोणी म्हणेल की या देशात मुसलमान नकोत, तेव्हा ते हिंदुत्व राहणार नाही.
Ø रा. स्व. संघाला ज्ञान, शील आणि सामर्थ्यसंपन्न भारत हवा, समतायुक्त आणि शोषणमुक्त त्याचसोबत विश्वप्रती सद्भावना असणारा भारत हवा.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/