भविष्यातील वाढत्या कचर्याचा धोका आणि त्याचा गोव्यात येणार्या पर्यटकांच्या संख्येवर होणारा दुष्परिणाम ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दूरदृष्टीतून आणि ’एसएफसी एन्व्हायर्नमेंट टेक्नोलॉजी’च्या उच्च गुणवत्ता आधारित तंत्रज्ञानातून उत्तर गोव्यात ’एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर’च्या माध्यमातून भारतातील पहिला एकात्मिक घनकचरा प्रकल्प उभा राहिला. त्याविषयी माहिती देणारा हा लेख...
गाव म्हणजे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असणारे आणि महाराष्ट्राचे शेजारी राज्य. चहुबाजूंनी निसर्गाने भरभरून दिलेले सौंदर्य अनुभवण्यासाठी लाखो पर्यटक वर्षभर गोव्याला भेट देत असतात. केवळ सागरी किनारेच नाहीत, तर इथली संस्कृती, वास्तुकला पर्यटकांना खुणावते. मात्र, जगभरात उद्भवलेल्या आणि चर्चिल्या जाणार्या वाढत्या कचर्याची समस्या वर्षभर पर्यटकांनी गजबलेल्या या निसर्गरम्य राज्यातही डोकं वर काढू लागली होती आणि हं, कचर्याचा आणि दुर्गंधीचा सर्वाधिक त्रास स्थानिकांसोबतच देशी आणि परदेशी पर्यटकांना जाणवू लागला. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच होती. भविष्यातील वाढत्या कचर्याचा धोका आणि त्याचा गोव्यात येणार्या पर्यटकांच्या संख्येवर होणारा दुष्परिणाम ओळखून, दूरदृष्टी असणार्या तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट पद्धती आणि जगभरातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या. यासाठी सात सदस्यांची एक कमिटी स्थापन करण्यात आली. या कमिटीने इटलीसह काही देशांतील प्रकल्पांचा अभ्यास केला.
यासाठी, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभागाला नोडल म्हणून नियुक्त करण्यात आले. ‘गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा’ला व्यवस्थापकीय सहयोगी म्हणून नियुक्त करण्यात आले. ‘गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा’ने योग्य निविदा प्रक्रियेनंतर साळीगाव येथे 100 ढझऊ घनकचरा व्यवस्थापन सुविधा स्थापन करण्यासाठी ‘मेसर्स एस. एम. सी इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड’ला 145.95 कोटी रुपयांच्या प्रकल्पखर्चासह डिझाईन, वित्तपुरवठा, बांधणी, ऑपरेट आणि हस्तांतरण या आधारावर दहा वर्षांच्या संचालन आणि देखभाल कालावधीसह काम देण्यात आले. या प्रकल्पासाठी अद्ययावत तंत्रज्ञान पुरविण्याची जबाबदारी ’एसएफसी एन्व्हायर्नमेंट टेक्नोलॉजी’ या कंपनीवर सोपविण्यात आली. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आणि दहा वर्षांच्या ऑपरेशनसाठी मेसर्स ’हिंदुस्तान वेस्ट ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ (कथढझङ) या विशेष उद्देश वाहनाची स्थापना करण्यात आली. अशा रितीने उत्तर गोव्यात भारतातील पहिला एकात्मिक घनकचरा प्रकल्प ’साळीगाव पठार’ येथे उभारण्यात आला.
’एसएफसी एन्व्हायर्नमेंट टेक्नोलॉजी’कडे घनकचरा व्यवस्थापनातील सर्वोत्तम तंत्रज्ञान असल्यानेच गोवा सरकारने या प्रकल्पासाठी ‘एसएफसी’ची निवड केली. ‘एसएफसी एन्व्हायर्नमेंट’ने या प्रकल्पासाठी तंत्रज्ञान पुरविले तर ‘एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ने या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची बांधणी केली. साळीगाव येथील या प्रकल्पासाठी देण्यात आलेली जमीन हे पूर्णतः डम्पिंग यार्ड होते. हे प्रकल्पस्थळ सुरुवातीला बंद पडलेले एक खाणकामस्थळ होते. नंतर 25 वर्षांहून अधिक काळ कचरा टाकण्याचे ठिकाण म्हणून वापरात होते, जे पूर्णपणे दुषित आणि खराब झाले होते. एकीकडे प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू होती, तर दुसरीकडे या डम्पिंगमधील कचरा काढून त्यावर प्रक्रिया केली जात होती. संपूर्ण टीमने आश्चर्यकारकरित्या केवळ 45 दिवसांत 50 टनांहून अधिक कचरा खोदून तो कम्पोस्ट आणि ‘आरडीएफ’ या दोन प्रकारांत वेगळा केला.
यातील ‘आरडीएफ’ म्हणजे ‘रिफ्यूज डेरिव्ह्ड फ्युएल’ हे कागद, प्लास्टिक आणि कार्डबोर्डसारख्या पुनर्वापर न करता येणार्या कचर्यापासून तयार होते. हे सिमेंटभट्ट्या, वीजप्रकल्प आणि औद्योगिक बॉयलरसह विविध उद्योगांमध्ये पर्यायी इंधन म्हणून वापरले जाते. साळीगाव डम्पिंग ग्राऊंडवरून मिळालेले ‘एडीएफ’ हे सिमेंट कंपन्यांना पाठविण्यात आले, तर कंपोस्ट कचरा हा प्रकल्पातील हरित पट्ट्यांच्या विकासासाठी वापरात आणण्यात आला. हा प्रकल्प सर्वोत्तम तंत्रज्ञानासह जगभरातील तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीत उभारण्यात आला आहे. 15 महिन्यांच्या कठोर परिश्रम आणि टीमच्या रात्रंदिवस मेहनतीतून साळीगाव येथे भारतातील पहिल्या एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाने आकार घेतला. पूर्वीची डम्पिंगची जागाही संपूर्ण मूळ नैसर्गिक स्थितीत पुनर्संचयित करण्यात आली. ही सुविधा देशातील अशा प्रकारचा एक ‘ब्राऊन-फील्ड प्रकल्प’ आहे.
ऑगस्ट, 2016 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. पर्यटन हंगामात दरडोई कचरानिर्मितीत होणारी वाढ आणि अतिरिक्त कचरा यांमुळे या सुविधेचा विस्तार करणे अत्यंत आवश्यक होते. ‘गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळा’च्या अंतर्गत नाबार्डच्या अर्थसाहाय्याने हे अपग्रेडेशनचे काम करण्यात आले. दि. 29 ऑगस्ट 2020 रोजी हे काम सुरू झाले आणि डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण झाले. विस्तारीकरणानंतर, आजही सुविधा 150 मेट्रिक टन प्रतिदिनवरून 250-300 मेट्रिक टन प्रतिदिन कचरा हाताळते.
पहिल्यांदा कचरा गोळा करतानाच सुका कचरा आणि ओला कचरा ग्रामपंचायत परिसरातून जमा केला जातो. हा कचरा ट्रकच्या माध्यमातून प्रकल्पापर्यंत आणला जातो. प्रकल्पाच्या गेटवर कचर्याचे वजन होते आणि गाडी पुढे प्रक्रिया केंद्राकडे रिकामी केली जाते. येथून कचरा मोठ्या मशीनच्या आधारे तीन प्रकारांत वेगळा करण्यासाठी नेला जातो. यात जड, मध्यम आणि हलका कचरा असे वर्गीकरण होते. हा कचरा पुढे वेगळा होताच मानवी हस्तक्षेपाने वेगळा केला जातो. पुनर्वापर करण्यायोग्य कचरा वेगळा काढला जातो. यातील ‘आरडीएफ’ पुन्हा एकदा सिमेंट कंपन्यांना पाठविले जाते. तीन हजार ते 3 हजार, 500 किलो कॅलरी-किलो कॅलरीफिक मूल्य असलेला सुका कचरा किंवा ’रिफ्यूज डेरिव्हेड फ्युएल’हा वीज निर्मितीसाठी किंवा सिमेंट प्लांटमध्ये कोळशाच्या जागी वापरण्यासाठी ऊर्जा-कार्यक्षम पर्यायी इंधन म्हणून काम करतो.
जठएद या प्रगत तंत्रज्ञानासह हा घनकचरा प्रक्रियेद्वारे पुनर्वापर करण्यायोग्य होतो. अशाच रितीने ओला कचराही वेगळा केला जातो. प्रकल्पातील इन-हाऊस तंत्रज्ञानामध्ये प्रतिटन सेंद्रीय कचर्यापासून 150 एन एम 3 पेक्षा जास्त बायोगॅस उत्पादन करण्याची क्षमता आहे, जी उद्योगाच्या सरासरी 80-100 एन एम 3 प्रति टनांपेक्षा जास्त आहे. या ओल्या कचर्याचे उच्च-गुणवत्तेच्या कंपोस्टमध्ये रूपांतर केल्याने त्याचे विपणन वाढते आणि उत्पादित खताची किंमतही सुधारते. उत्तर गोवास्थित हा प्रकल्प भारतातील सार्वधिक काळ चालणारा बायोगॅस प्रकल्प आहे. 2023 मध्ये याचा कृषी-आधारित बायोगॅस प्रकल्पांमध्ये विस्तार करण्यात आला. इथे कचर्यातून निर्माण होणार्या पाण्यावरही प्रक्रिया केली जाते. गाळाचे निर्जलीकरण केल्याने यातून उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रीय खत मिळते. कचर्यातून निर्मित बायोगॅसच्या वापरातून वीजनिर्मिती आणि उच्च दर्जाचे कम्पोस्ट बनविले जाते. याचसोबत निर्माण होणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा परिसरातील हरित क्षेत्रात पुनर्वापर केला जातो. येथील बायोगॅसमधून निर्माण होणारी 40 टक्के वीज या प्रकल्पासाठी वापरात येते, तर बाकीची वीज ग्रीडला निर्यात केली जाते. या प्रकल्पामुळे परिसरातील दृश्यमानता आणि प्रदूषणही घटले. जगभरातून शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभ्यासक आणि पर्यटक याठिकाणी भेट देतात. आज हे गाव एकात्मिक घनकचरा व्यवस्थापनाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी देशभरात ओळखले जाते. एकेकाळी डम्पिंग ग्राऊंड असणार्या जागेत उभारण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात स्वच्छता आणि चहुबाजूंनी पसरलेल्या गवताच्या हिरव्या गालिच्यामुळे प्रदूषणातही घट झाली आहे.
गायत्री श्रीगोंदेकर
(लेखिका दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये विशेष प्रतिनिधी - पायाभूत सुविधापदावर कार्यरत आहेत.)