World Sea Turtle Day - यंदा समुद्री कासवांबाबत कोकण किनारपट्टी झाली लखपती

    16-Jun-2025
Total Views | 21
sea turtle hatchlings released from Konkan coast


मुंबई (अक्षय मांडवकर) -
यंदा समुद्री कासवांच्या पिल्लांबाबत कोकण किनारपट्टी लखपती झाली. कारण, समुद्री कासव विणीच्या २०२४-२५ या यंदाच्या हंगामात कोकणातून तब्बल १ लाख ७१ हजार २४५ पिल्लं समुद्रात सोडण्यात आली (sea turtle hatchlings released from Konkan coast). रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यापैकी यंदा सर्वाधिक पिल्लं ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सोडण्यात आली, तर कासवाची सर्वाधिक घरटी रत्नागिरीच्या जिल्ह्यातील गुहागरच्या किनाऱ्यावर आढळून आली. (sea turtle hatchlings released from Konkan coast)
 
 
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमधील काही प्रमुख किनाऱ्यांवर 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या सागरी कासवांची घरटी आढळतात. रायगडमधील ५, रत्नागिरीतील २५ आणि सिंधुदुर्गमधील २४ किनाऱ्यांवर यंदा आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची घरटी आढळली. नोव्हेंबर ते मार्च या काळात कोकण किनारपट्टीवर २,९२९ घरटी आढळली. या घरट्यांमध्ये एकूण २ लाख ७४ हजार ८४२ अंडी सापडली. त्यामधून बाहेर पडलेल्या १ लाख ७१ हजार २४५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.
 
 
 
 
यंदा कोकण किनारपट्टीवरील जन्मास आलेल्या सागरी कासवांच्या पिल्लांचा जन्म दर हा ७० टक्के आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तो अधिक आहे. २०१९-२० साली हा जन्म दर ३५ टक्के, २०२०-२१ साली ५७ टक्के आणि २०२१-२२ साली ५८ टक्के आणि २०२२-२३ साली ५५ टक्के आणि २०२३-२४ साली तो ६४ होता. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिल्लांचा जन्म दर हा रत्नागिरी आणि रायगड पेक्षा अधिक आहे. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्री कासवाची १ हजार ४५७ घरटी आढळली. या घरट्यांमध्ये संवर्धित करण्यात आलेल्या १ लाख ३५ हजार २३४ अड्यांमधून १ लाख ५ हजार ५३६ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील पिल्लांचा जन्म दर हा यंदा ७७ टक्के आहे. जो रत्नागिरीमध्ये ४७ टक्के आणि रायगडमध्ये ५४ टक्के आहे. किनारपट्टीवर कासव संवर्धन करण्यासाठी वन विभागाकडून कासव मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. या कासव मित्रांकडून कासवांची अंडी शोधणे, त्यांचा सांभाळ करणे, घरट्यामधून बाहेर पडलेल्या पिल्लांना समुद्रात सोडण्याची जबाबदारी असते.
 
 
सध्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीसाठी शिल्लक राहिलेला उत्तम प्रदेश हा उत्तर रत्नागिरीपासून गोव्यापर्यंत आहे. उत्तर कोकणाचा विचार केल्यास पालघर, मुंबई आणि रायगड येथील किनारे पर्यटनकेंद्रित झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी कासवाची वीण होत नाही. कासव विणीच्या काळातील रात्र पर्यटनामुळे रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यांची क्षमता ही कासव विणीच्या अनुषंगाने नष्ट झाल्याच्या बरोबरीने आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर अजूनही रात्र पर्यटन पोहोचलेले नाही. त्यामुळे त्याठिकाणी कासव विणीचे किनारे अजूनही शिल्लक आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121