चंडीगड : ‘गुजरात टायटन्स’चा कर्णधार शुभमन गील आणि ‘मुंबई इंडियन्स’चा कर्णधार हार्दिक पंड्या यांच्यातील वाद कॅमेऱ्यासमोरही लपून राहिला नाही. शुक्रवारी झालेल्या दोन्ही संघांच्या सामन्यातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांमधील वादंग पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात आले, तेव्हा हा प्रकार घडला. यावेळी शुभमन गिल आणि हार्दिक पंड्याने एकमेकांशी हस्तांदोलन केलेच नाही. हार्दिकने हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शुभमन गिलने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. सहाजिकच पंड्याला राग अनावर झाला. दोघांमध्ये घडलेला हा किस्सा नेमका कॅमेऱ्यात कैद झाला आणि पुन्हा दोघांमधील वाद हा चर्चेत आला.
दोघांमध्ये खरंच मतभेद आहेत का?, असा प्रश्न आता पुन्हा क्रिकेटप्रेमींकडून विचारला जात आहे. तसे अंदाजही सोशल मीडियावर बांधले जाऊ लागले. हार्दिक आणि शुभमन यांच्यात द्वंद्वयुद्ध सुरू आहे का? गुजरात टायटन्समध्ये कर्णधारपद बदलल्यामुळे नाराजी आहे का?, असा प्रश्न विचारला जात आहे. हार्दिक पंड्या २०२२ आणि २०२३ मध्ये ‘गुजरात टायटन्स’चा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने एकदा चषक जिंकले आणि एकदा अंतिम फेरीही गाठली होती. मात्र, यंदा हार्दिकने ‘मुंबई इंडियन्स’मध्ये पुनरागमन केलं, आणि गुजरातने शुभमन गिलला कर्णधारपद दिलं. या बदलामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला का?, असाही प्रश्न विचारला जात आहे.
सामन्यानंतर दोघंही वेगवेगळ्या दिशेने गेले. ना गळाभेट, ना हसू. ही गोष्ट चाहत्यांच्या लक्षात आली. सोशल मीडियावर अनेक मीम्स, पोस्ट्स आणि प्रतिक्रिया उमटल्या एका चाहत्याने लिहिलं, “गुजरातमध्ये काहीतरी चुकीचं घडतंय का?” हा प्रकार खरंच एक ‘इगो क्लॅश’ आहे का? की फक्त गैरसमज? खरं काय आहे हे ? असे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांना पडले आहेत.
सामन्यावेळी काय घडलं?
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २२८/५ धावा केल्या. रोहित शर्माने ८१ धावांची खेळी केली, तर जॉनी बेअरस्टोने ४७ धावा केल्या. शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याने तीन षटकार मारून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. गुजरात टायटन्सने प्रत्युत्तरात २० षटकांत २०८/६ धावा केल्या. साई सुदर्शनने ८० धावांची झुंजार खेळी केली, तर वॉशिंग्टन सुंदरने ४८ धावा केल्या. तथापि, जसप्रीत बुमराह आणि रिचर्ड ग्लीसन यांच्या अचूक गोलंदाजीमुळे ‘मुंबई इंडीयन्स’ने सामना जिंकला. मुंबई विरूद्ध पंजाब असा पुढील सामना नरेद्र मोदी स्टेडीयम मध्ये १ जून रोजी पार पडेल.