नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल चाईबासा येथील खासदार-आमदार विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटला आव्हान देणारी याचिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंड उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला उच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी रोजी चाईबासा दिवाणी न्यायालयाने राहुल गांधींविरुद्ध जारी केलेल्या आणखी एका अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती दिली होती. उच्च न्यायालयाने गांधी यांना खटल्यापूर्वी आवश्यक कायदेशीर उपाय करण्याचे निर्देश देऊन वॉरंटला एक महिन्यासाठी स्थगिती दिली होती. त्यानंतर, १४ मार्च रोजी न्यायालयाने गांधींच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा आग्रह धरला आणि वकिलाद्वारे प्रतिनिधित्व करण्याची त्यांची विनंती फेटाळून लावली होती.
२०१८ मध्ये काँग्रेस अधिवेशनात गांधी यांनी शाह यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप चाईबासा येथील रहिवासी प्रताप कुमार यांनी केलेल्या तक्रारीवरून हा खटला सुरू झाला. त्यांच्या कथित वक्तव्यात गांधी यांनी कथितपणे म्हटले होते की कोणताही खुनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांनी असेही म्हटले होते की अशी घटना फक्त भारतीय जनता पक्षात (भाजपा) शक्य आहे.