पुन्हा शिकवूया मराठी...

    26-May-2025
Total Views | 36
Let
राज्यात नुकताच दहावीचा निकाल लागला. यामध्ये मराठी विषयात जवळपास पाऊणलाख विद्यार्थी नापास झाले. ज्या राज्याची मातृभाषा मराठी आहे, तिथे प्रथम भाषा मराठी घेतलेलेही विद्यार्थी नापास व्हावे हे दुर्दैवच! त्यामुळे एकूणच मराठी शिकवण्याच्या पद्धतीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळा’च्यावतीने मार्च 2025 साली घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल, नुकताच जाहीर करण्यात आला. राज्यातील सुमारे 45 टक्के विद्यार्थी हे 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 211 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. 100 टक्के निकाल लागणार्‍या शाळांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी वाढते आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर प्रथम भाषा म्हणून मराठी भाषेची निवड करून अभ्यास करणार्‍या सुमारे 64 हजार विद्यार्थी आणि द्वितीय व तृतीय भाषा म्हणून ज्यांनी मराठी विषयाची निवड करून परीक्षा दिली आहे, त्यांपैकी सुमारे 12 हजार विद्यार्थी चक्क मराठी विषयात नापास झाले आहेत. ज्या राज्याची राजभाषा मराठी आहे, ज्या भाषेला नुकताच केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे, अशा मराठी भाषेतच आपल्या राज्यातील सुमारे 78 हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. एकीकडे परकीय भाषेत विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत आणि स्वतःची मातृभाषा असलेल्या विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण होत आहेत, याचा नेमका अर्थ काय? संत ज्ञानेश्वरांनी ‘माय मराठीचे बोलु कौतुके, अमृताते पैजा जिंके’ असे आपल्या मराठीचे वर्णन केले. त्या मराठी कुटुंबातील पाल्यांनाच मराठी भाषेची जाण नसेल, विद्यार्थ्यांना स्वतःच्या भाषेचे किमान आकलन नसेल, ते आपल्या मातृभाषेत उत्तीर्ण होत नसतील, तर मराठी भाषेचा समृद्ध प्रवास कसा घडणार? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. केंद्र सरकारने आज ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्या समृद्ध असलेल्या भाषेचे उद्याचे नेमके भविष्य कसे असेल? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.


‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळा’च्यावतीने दहावीच्या परीक्षेसाठी, 15 लाख, 58 हजार, 20 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी 15 लाख, 46 हजार, 579 विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे पसंत केले. या विद्यार्थ्यांपैकी 14 लाख, 55 हजार, 433 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. हे प्रमाण 94.10 टक्के इतके आहे. राज्याच्या निकालाची परंपरा कायम राहिली आहे. अर्थात यावर्षी काहीसा निकालाचा आलेख घसरला आहे. मात्र, तरी तो फार मोठ्या प्रमाणावर घसरला असल्याचे चित्र नाही. राज्यातील 15 लाख, 58 हजार विद्यार्थ्यांपैकी, 10 लाख, 85 हजार, 176 विद्यार्थ्यांनी प्रथम भाषा म्हणून मराठी भाषेची निवड केली होती. त्यांपैकी 10 लाख, 21 हजार 518 विद्यार्थी मराठी विषयात उत्तीर्ण झाले. हे उत्तीर्णतेचे प्रमाण शेकडा 94.13 टक्के इतके आहे. याचा अर्थ प्रथम भाषा म्हणून मराठी विषयाची निवड केलेले विद्यार्थी, हे आपल्याच राज्याचे रहिवासी आहेत. मराठी हीच ज्यांच्या कुटुंबाची, परिसराची भाषा आहे, असे सुमारे 64 हजार विद्यार्थी मराठी विषयातच अनुत्तीर्ण झाले आहेत. हे विद्यार्थी मातृभाषेत नापास झाले असले, तरी काही प्रमाणात हेच विद्यार्थी मात्र इतर भाषांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत,हे विशेष!

 
त्याचबरोबर मराठी माध्यमांव्यतिरिक्त इतर भाषा माध्यमात शिकणार्‍या आणि द्वितीय व तृतीय भाषा म्हणून मराठी भाषेची निवड करत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा विचार केला, तर 4 लाख, 16 हजार, 334 विद्यार्थ्यांनी मराठी विषयाची परीक्षा दिली. त्यांपैकी 4 लाख, 4 हजार, 612 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या माध्यमांचा मराठी विषयाचा शेकडा निकाल 97.18 टक्के लागला असून, येथे सुमारे 12 हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर मराठी-हिंदी, मराठी-संस्कृत, मराठी-अरेबिक, मराठी -परशियन, मराठी-सिंधी, मराठी-बंगाली अशी संयुक्त विषय घेऊन परीक्षा देणारे एकूण 84 हजार, 237 विद्यार्थी आहेत. त्यांपैकी 81 हजार, 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा मराठी विषयाचा निकाल 96.18 टक्के निकाल लागला आहे. याचा अर्थ इतर भाषिक माध्यमात शिकत असलेल्या आणि मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचे, मराठी विषयाचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. राज्यात इंग्रजी भाषेचा विचार करता, प्रथम भाषा इंग्रजी याचा अर्थ ही सर्व मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकत आहेत. या माध्यमातील 3 लाख, 68 हजार, 812 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज सादर केले होते. त्यांपैकी 3 लाख, 68 हजार, 122 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 3 लाख, 63 हजार, 228 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे शेकडा प्रमाण 98.67 इतके आहे. आता इंग्रजी भाषा ही प्रथम भाषा म्हणून निवडलेले विद्यार्थी हे इंग्रजी माध्यमात शिकत असले, तरी ते येथील मराठी मातीतीलच विद्यार्थी आहेत. यातील काही विद्यार्थ्यांची मातृभाषा ही मराठी व्यतिरिक्त असण्याची शक्यता असली, तरी हे प्रमाण फारच कमी असणार आहे. आता हे विद्यार्थी मराठी भाषिक असूनही इंग्रजी माध्यमात शिकत आहेत आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण होत आहेत. मात्र, मराठी हीच मातृभाषा असलेले विद्यार्थी हे मराठी विषयात अनुत्तीर्ण होत आहेत. मराठी अथवा इतर माध्यमात शिकणार्‍या आणि इंग्रजी हा विषय तृतीय भाषा म्हणून परीक्षेला प्रविष्ट झालेल्या एकूण 12 लाख, 28 हजार, 678 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज सादर केले होते. त्यांपैकी 12 लाख, 17 हजार, 474 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 11 लाख, 47 हजार, 685 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. हे उत्तीर्णतेचे शेकडा प्रमाण 94.27 टक्के इतके आहे. मराठी प्रथम भाषेचा निकाल 94.13 टक्के व इंग्रजी ही प्रथम भाषा असलेल्या विद्यार्थ्यांचा माध्यम भाषेचा शेकडा निकाल 98.67 टक्के इतका आहे. इंग्रजी भाषा तृतीय म्हणून स्वीकारलेल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 94.27 टक्के इतके आहे. म्हणजे एका अर्थाने मराठी माध्यमातील मुलांचे इंग्रजी भाषेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाणे अधिक आहे. राज्यात सिंधी, बंगाली प्रथम भाषा आणि तामिळी, मल्याळम, पाली, अरेबिक या भाषांचा निकाल 100 टक्के लागला आहे. अर्थात या विषयाला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत अल्प आहे. संपूर्ण राज्यात ही संख्या 500 च्या आत आहे, तर मल्याळमसारख्या भाषेला तर अवघा एक विद्यार्थी प्रविष्ट झाला होता. अशा परिस्थितीत आपल्या राज्यात, मराठी विषयाच्या अध्यापन प्रक्रियेचा विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थी मराठी भाषा अनुत्तीर्ण होत आहेत, याचा अर्थ भाषिक कौशल्य या विद्यार्थ्यांना प्राप्त असण्याची शक्यता नाही. भाषेची कौशल्य नाही, म्हणजे या विद्यार्थ्यांचे भाषेचे शिक्षण होण्याची शक्यता अजिबात नाही. असे असताना, हे विद्यार्थी दहावीपर्यंत पोहोचले हेही विशेष म्हणायला हवे.


राज्यात मराठी प्रथम भाषा असलेले विद्यार्थी आणि इंग्रजी प्रथम भाषा असलेले विद्यार्थी यांचा तुलनात्मक विचार केला, तर मराठी प्रथम भाषा असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 10 लाख, 94 हजार, 935 इतकी आहे. तर, इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख, 68 हजार, 812 इतकी आहे. राज्यात साधारण इंग्रजी भाषा माध्यमात 33.68 टक्के विद्यार्थी शिकत आहेत. ज्या राज्याची मराठी ही राजभाषा आहे, त्याच राज्यात इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण सातत्याने वाढताना आकडेवारीवरून दिसते, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपल्याच मराठी मातृभाषा असलेल्या राज्यात मराठीची अवस्था काहीशी कठीण आहे का? याचा विचार करावा लागणार आहे. एकीकडे मराठी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या आटत चालली आहे. मराठी शाळा महानगरांमध्ये बंद पडत आहेत. वर्तमानात जी मुले मराठी माध्यमात शिकत आहेत, ते विद्यार्थी मराठी भाषेतच नापास होत आहेत. त्यामुळे मराठी विषयाचे अध्यापन करणार्‍या शिक्षकांनी, अध्यापन प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मुळात ज्या माध्यमात विद्यार्थी शिकत आहेत, त्या मराठी भाषेचे आकलन विद्यार्थ्यांना होत नसेल, तर ते विद्यार्थ्यांचे इतर विषयाचे शिकणे खरेच प्रभावी आणि परिणामकारक कसे होणार? हा प्रश्न आहेच. शेवटी भाषा हेच शिक्षणाचे माध्यम असते. ज्या विद्यार्थ्यांची शिकण्याचे माध्यम असलेली भाषा उत्तम असते, त्या विद्यार्थ्यांचे शिकणे परिणामकारक होते हे शिक्षणशास्त्र आणि भाषातज्ज्ञ सांगत आले आहेत. आज भाषेच्या शिक्षणाच्या संदर्भाने विचार करण्याची गरज आहे.

आज दहावीपर्यंत मराठी भाषेची कायद्याने सक्ती केली आहे. त्यामुळे सक्तीने का होईना विद्यार्थी मराठी भाषा शिकत आहेत. मात्र, ही भाषा शिकणे खरेच विषय म्हणून आहे की, भाषा म्हणून आहे? याचाही विचार करण्याची गरज आहे. आज शालेय स्तरावर तीन भाषा शिकवल्या जात आहेत. त्या भाषा विषय म्हणून शिकवल्या जात असल्या, तरी भाषा म्हणून कौशल्य, भाषिक रसास्वाद, सौंदर्य, साहित्य यांसारख्या विविध कौशल्यांचा प्रवास घडताना दिसत नाही. वर्तमानात भाषा समृद्धतेने न शिकता केवळ विषय म्हणून शिकत असतानादेखील विद्यार्थी नापास होत आहेत, तेथे खरोखर भाषा अध्यापनाची प्रक्रिया ही ’भाषा’ म्हणून शिकण्यासाठी पावले उचलली गेली आणि त्यादृष्टीने मूल्यमापनाचा विचार केला गेला, तर भाषेचा निकाल किती लागेल? याचा अंदाज न केलेलाच बरा. मुळात आपल्याकडे भाषेचा विचार हा, विषय म्हणूनच विचार केला जात आहे. भाषा म्हणून अध्यापनाचा कल हरवत चालला आहे. भाषा शिक्षणाचा विचार केवळ औपचारिक शिक्षणापुरता उरला आहे. त्यामुळे भाषिक विकासाचा विचार करता, हे विद्यार्थी भविष्यात भाषा शिक्षणाकडे खरंच आकर्षित होतील का? अन्यथा भविष्यात भाषा विषय शिकवला गेला, तरी इतिहासातील योगदानावर भाषा अभिजात ठरली आहे आणि वर्तमानातील भाषा प्रवासाने तिचा प्रवास विकलांग होण्याचा धोका आहे.त्यामुळे पाऊण लाख विद्यार्थी मराठीत नापास होत आहेत, याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.


संदीप वाकचौरे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121