भारतीय खगोलशास्त्र आणि विज्ञानसाहित्याचा तेजस्वी चेहरा असलेले डॉ. जयंत नारळीकर हे केवळ वैज्ञानिक नव्हते, तर विचारांचे विश्व उलगडणारे तत्त्वज्ञ होते. ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडून त्यांनी खगोलशास्त्राला नवीन दिशा दिली, तर विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी सुलभ, रसाळ भाषेत लेखन केले. त्यांनी विज्ञानाला साहित्याची भाषा दिली आणि जिज्ञासेला विचारांची दिशा. त्यांच्या जाण्याने केवळ एक महान शास्त्रज्ञच हरपला नाही, तर विज्ञानाच्या कथा गावोगावी पोहोचणारा कथेकरीच काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉ. नारळीकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा या लेखातून घेतलेला आढावा...
डॉ. जयंत नारळीकर
काहीजण फार काहीही न करता, किती करून दाखवले अशा विलक्षण तोर्यात वावरत असतात. काहीजण तर सार्या जगाचा आदर आणि सन्मान मिळत असतानासुद्धा, अतिशय नम्रतेने साध जीवन व्यतीत करतात. आदरणीय असे डॉ.जयंत नारळीकर यांनी जगाचा निरोप घेतल्याचे ऐकल्यावर मनात पहिली आलेली भावना हीच होती. जागतिक पातळीवर विज्ञानाच्या क्षेत्रात अतिशय मूलभूत अशी कामगिरी करून दाखवणारे डॉ. नारळीकर, कधीही आपल्या मोठेपणाचे बिरुद घेऊन वावरले नाहीत. उलट अगदी शाळकरी मुलांच्या मनातल्या शंका कशा दूर करता येतील, यांसारखी आव्हाने त्यांना खुणावत राहिली. साहजिकच आईनस्टाईनसारख्या महान शास्त्रज्ञाविषयी जे म्हटले गेले, तेच आपण नारळीकरांच्या बाबतीत म्हणू शकतो. जगाला खूप काही देणारा हा महान शास्त्रज्ञ, माणूस म्हणूनही कायम मोठाच ठरला.
अत्यंत विद्वान कुटुंबात जन्मलेल्या नारळीकरांना लहानपणापासूनच अभ्यासू वृत्तीचे धडे मिळाले. त्यांच्या स्वतःच्या विलक्षण बुद्धिमत्तेची त्यात भर पडल्यामुळे ते थेट इंग्लंडमध्ये जाऊन, ‘विश्वाच्या निर्मिती’सारख्या मूलभूत प्रश्नांना सहज भिडले. ज्या काळात त्यांनी हे केले, तो काळ इतका सोप्पा नव्हता. तेव्हा भारत ब्रिटिशांच्या तथाकथित श्रेष्ठत्वाला काहीसा बुजूनच होता. स्वातंत्र्य मिळून काही वर्षे उलटून गेलेली असली, तरी इंग्लंड म्हणजे ‘साहेबाचा देश’ ही भावना मात्र भारतीयांच्या मनातून गेलेली नव्हती. अशा पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये जाऊन ब्रिटिशांच्या बरोबरीचे काम करणे आणि आपला अजरामर ठसा त्यावर उमटवणे, हे काम निश्चितपणे अत्युच्च प्रतीचेच होते. इंग्लंडमध्ये आयुष्यभर राहण्याची संधी त्यांच्यासमोर चालून आलेली असताना, देशाच्या पंतप्रधानांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत, मायभूमीत परतून विज्ञानाची सेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यातूनच त्यांच्या वृत्तीचे सहज दर्शन आपल्याला घडते.
पुण्यामध्ये खगोलशास्त्र तसेच विश्वाच्या कामकाजासंबंधीच्या अनेक गुढांची उकल करण्यासाठी नारळीकरांनी, ‘आयुका’ संस्थेची पायाभरणी केली. पुणे विद्यापीठातल्याम ‘आयुका’च्या परिसरात गेल्यावर काही वेगळीच भावना मनात येते. इथे इतर सगळ्या ठिकाणांपेक्षा काहीतरी खास वेगळे असल्याचे सतत जाणवत राहते. नारळीकरांनी इथे न्यूटनच्या सफरचंदाच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रयोगातून प्रेरणा घेऊन ‘आयुका’मध्येही सफरचंदाचे एक झाड लावले होते! दुर्दैवाने त्यासाठी अनुकूल हवामान नसल्यामुळे ते कोमेजले पण, यातूनही नारळीकरांची वेगळी विचारसरणी अधोरेखित होते. ‘आयुका’ हे खरोखरच वेगळे असले पाहिजे, इथे जागतिक पातळीचे संशोधन व्हायला हवे, अशा नारळीकर यांच्या पक्क्या धारणा होत्या. त्यामुळेच त्यांनी अनेक वर्षे या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. एकीकडे हा इतका मोठा माणूस विज्ञानाचे मूलभूत धडे लोकांना देत असताना, दुसरीकडे काही कामानिमित्त फ्रान्सला जावे लागणार असल्यामुळे एखाद्या शाळकरी विद्यार्थ्यासारखा फ्रेंच भाषेचे काही काळ धडे गिरवत होता. इतकेच नव्हे, तर या वर्गामधल्या सगळ्या उपक्रमांमध्येही नारळीकर अगदी शिस्तशीर विद्यार्थ्याप्रमाणे सहभागी होत असत. इतका साधेपणा, सच्चेपणा अगदी दुर्मीळच.
शास्त्रज्ञ म्हणून सगळ्यांना सुपरिचित असलेले डॉ. नारळीकर यांची साहित्यिक म्हणूनही ओळख आहे. डॉ. नारळीकरांच्या ‘वामन परत न आला’, ‘यक्षांची देणगी’, ‘टाईम मशीनची किमया’ या आणि इतर विज्ञानकथा वाचून, विविध विषयांत रुची निर्माण झालेले अनेकजण आहेत. मराठीमध्ये विज्ञान आणि विज्ञानकथा याविषयीचे उत्कृष्ट दर्जाचे लिखाण करणार्या आघाडीच्या लेखकांमध्ये डॉ. नारळीकरांचे नाव अग्रस्थानी आहे. आजच्या पिढीमधले अनेक मराठी विज्ञानलेखक नारळीकरांमुळेच घडले आहेत. खगोलशास्त्र, अंतराळ विज्ञान, भौतिकशास्त्रामधल्या मूलभूत संकल्पना हे सगळे डॉ. नारळीकरांच्या मूळ अभ्यासाचे विषय असल्याने, त्यांनी या संदर्भात विपुल लेखन केले आहे. ते करताना त्यांनी अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचक यांना आदर्श अशीच शैली निवडल्याचे जाणवते. काही वर्षांपूर्वी डॉ. नारळीकरांच्या कामाच्या आणि लिखाणाच्या शिस्तीच्या संदर्भातले अनुभव वाचायला मिळाले होते. प्रत्येकाला त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. संशोधन, प्रशिक्षण, प्रवास या सगळ्याच्या झपाट्याबरोबरच ते आपल्या लिखाणाच्या बाबतीतही किती शिस्तप्रिय होते, हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर अजूनच वाढतो. तसेच ठरलेल्या वेळेला लेख तयार ठेवण्याबद्दलची त्यांची तळमळसुद्धा प्रत्येक लेखकाने लक्षात घेण्याजोगीच.
डॉ. नारळीकरांना वेळ न पाळणार्या लोकांविषयी फार आदर वाटत नसे. ते स्वतः वेळ पाळण्याविषयी विलक्षण आग्रही असल्यामुळे, त्यांना स्वतःचा तसेच इतर कुणाचा वेळ वाया घालवणे अजिबात पसंत नसायच आवडत नसे. ठरलेल्या वेळी ते सांगितलेल्या ठिकाणी हजर राहणार म्हणजे राहणारच. जर त्यांना कुणी घ्यायला येणार असेल, तर त्या माणसानेही ठरलेल्या वेळेत हजर राहण्याला त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असे. वेळ न पाळणारा माणूस इतर कुठली शिस्त पाळणार आणि आपल्या आयुष्यात काय नीटसे करणार? असा डॉ. नारळीकरांचा त्यामागचा दृष्टिकोन होता. ही शिस्त त्यांच्या आयुष्यात लहानपणापासूनच होती पण, इंग्लंडमधल्या वास्तव्यात ती अधिकच भिनली. त्यांना एखाद्या कार्यक्रमामध्ये बोलावलेले असेल आणि तो कार्यक्रम वेळेवर सुरू झाला नाही, तर त्यांना ते अजिबात रुचत नसे. वेळेची किंमत न समजलेला समाज फार पुढे जाऊ शकत नाही, असे म्हणतात. डॉ. नारळीकरांकडून आपण हे न शिकणे म्हणजे, या विधानावर शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे.
श्रद्धा-अंधश्रद्धा या बाबतींमध्येही डॉ. नारळीकर अत्यंत स्पष्टवक्ते होते. ‘गणपती दूध प्यायला लागल्यावर(!)’ हतबद्ध झालेल्या डॉ. नारळीकरांनी या संतापजनक प्रकाराची, अतिशय योग्य शब्दांमध्ये हजेरी घेतली होती. आजच्या जगातसुद्धा अत्यंत अविवेकी, अवैज्ञानिक दृष्टिकोन असलेले लोक इतक्या मोठ्या संख्येने आपल्या देशात असावेत, याची त्यांना खूप खंत वाटली होती. एकूणच श्रद्धा-अंधश्रद्धा या संदर्भात त्यांनी केलेले लिखाणसुद्धा अतिशय वाचनीय आणि मोलाचे आहे. विज्ञानाचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेऊनसुद्धा लोकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन दिसत नाही, याची त्यांना खंत वाटत राहिली. यात बदल घडवण्यासाठी त्यांनी वारंवार आपल्या लिखाण आणि भाषणांतून प्रयत्न केले.
डॉ. नारळीकरांचे ‘चार नगरांतले माझे विश्व’ हे आत्मचरित्रही गाजले असून, त्याला ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कारही मिळाला. या पुस्तकात त्यांनी आपला जीवनप्रवास विस्ताराने नोंदवला आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांची जडणघडण, त्यांचे ‘केंब्रिज विद्यापीठा’त असतानाचे सर फ्रेड हॉइल यांच्याबरोबरचे संशोधन हे सगळेच त्यात आहे. त्याशिवाय ‘आयुका’ची निर्मिती आणि या संस्थेचा प्रवासही अत्यंत रोचकपणे त्यांनी मांडला आहे. शिवाय त्यांच्या जीवनप्रवासामधले अनेक प्रेरणादायी तसेच गमतीशीर तपशीलही वाचनीय आहेत.
विज्ञान आणि गणित या विषयांच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणार्या समितीचे अध्यक्षपदही डॉ. नारळीकरांनी भुषवले होते. त्यांच्यासारख्या तज्ज्ञ आणि काटेकोरपणासाठी विख्यात असलेल्या माणसाने या पुस्तकांचा दर्जा उच्च राखण्यासाठीही खूप प्रयत्न केले. खगोलशास्त्र, अंतराळ विज्ञान आणि गणितामध्ये अत्युच्च पातळीवर पोहोचलेल्या डॉ. नारळीकर यांनी, आचरणात कायमच नम्रता आणि साधेपणा जोपासला. काहीतरी किरकोळ यश मिळवलेले लोकही आजकाल केवढ्या आढ्यतेने आणि तुच्छतेने वागताना दिसतात. त्यामुळेच डॉ. नारळीकरांचे हे वेगळेपण अधिकच खुलून दिसते. त्यांच्या सहचारिणी डॉ. मंगला नारळीकर याही बुद्धिमान गणिततज्ज्ञ होत्या आणि त्यांनी गणिताविषयी रस निर्माण करणारे लिखाण सोप्या शब्दांमध्ये सातत्याने केल्याचे सर्वश्रुत आहेच.
विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजेत, त्यांनी उत्तरे शोधली पाहिजेत, त्यांनी नुसते जे शिकवले आहे त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवता कामा नये, असा डॉ. नारळीकरांचा अट्टाहास असे. म्हणूनच त्यांना कुणी विद्यार्थ्याने स्वाक्षरी मागितली, तर ते आधी त्या विद्यार्थ्याला विज्ञानाशी संबंधित असलेला एखादा प्रश्न आपल्याला विचारायला सांगायचे. त्यानंतर त्या प्रश्नाचे उत्तर लिहून ते स्वाक्षरी करायचे. लहान वयात मुलांमध्ये कुतूहल निर्माण करण्याची ही अत्यंत अनोखी पद्धत त्यांनी कायम वापरली. इतर शास्त्रज्ञांनीही याचे अनुकरण केल्यास, तर खरोखरच आपल्या मुलांना निदान कधीतरी ‘का? कसे?’ यांसारखे प्रश्न पडायला लागतील. गणित-विज्ञान आणि विज्ञानप्रसार यांना वाहून घेतलेल्या डॉ. नारळीकरांना ‘साहित्यिक’ म्हणून वेगळी ओळख देण्याचे काही कारणच नाही. कारण, मुळात त्यांचा सगळा प्रवासच अगदी सहजपणे साहित्यिकाच्या भूमिकेतून झालेला आहे!
इतर विषयांमध्येसुद्धा नारळीकरांना खूप रुची होती. टेनिससारखा खेळ त्यांना खूप आवडायचा. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या लेखकांचे ते चाहते होते. याच जोडीला नारळीकर स्वतः गमतीशीर प्रयोगही करायचे. शेरलॉक होम्स तसेच पी. जी. वुडहाऊस यांच्या प्रसिद्ध ‘जीव्हस’ मालिकेमधल्या खुमासदार गोष्टी वाचून त्यांनी, त्यात विज्ञानाची भर घालून स्वतः कथा लिहिल्या. त्या मूळ लेखकांच्याच वाटाव्यात, इतक्या मस्त जमून आल्या होत्या. हे नारळीकरांचे लिखाण आहे, यावर काहीजणांचा विश्वासच बसेना!
अशी बहुविध प्रकारची विद्वत्ता लाभलेले आणि तरीही आयुष्यभर अत्यंत नम्रपणे वागणारे डॉ. जयंत नारळीकर, आपल्यासमोर अनेक प्रकारचे आदर्श ठेवून आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्यालाही बरेच काही करण्यासारखे आहे, हे निश्चित. त्यांच्या कार्यमग्न स्वभावाला हीच खरी श्रद्धांजली ठरेल!
अतुल कहाते