वसाहतींचे योग्य व्यवस्थापन व स्थलांतर हे मधउद्योगातील यशाचे गमक!

    23-May-2025
Total Views | 36
वसाहतींचे योग्य व्यवस्थापन व स्थलांतर हे मधउद्योगातील यशाचे गमक!

अल्बर्ट आईनस्टाईन यांनी निसर्गातील मधमाशांचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले होते की, “पृथ्वीतलावरून मधमाशा नष्ट झाल्या, तर पुढील तीन-चार वर्षांत मानवजातसुद्धा शिल्लक राहणार नाही.” कारण, मधमाशा वनस्पतींच्या परागीभवनात महत्त्वपूर्ण योगदान देतात. निसर्गसाखळीतील मधमाशांची घटणारी संख्या हा आज चिंतेचा विषय असून, त्यांची वसाहत वाढविणे ही काळाची गरज आहे. त्याविषयी मार्गदर्शन करणारा हा अभ्यासपूर्ण लेख...


भारतात मधमाशीपालनाची प्राचीन परंपरा आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या काही गावांमध्ये 200-250 वर्षांपासून तेथील लोक हा व्यवसाय करत आहेत. आपल्या देशात जिथे जंगल भाग आहे, तेथील आदिवासी समाज अनेक वर्षांपासून मधउत्पादन करताना आढळतो. परंतु, हा व्यवसाय काही पारंपरिक व व्यावसायिक पद्धतीत नव्हता. मधमाशांच्या पोळ्याखाली आग लावून त्यांना घालवायचे व पोळे पिळून मध काढायचा, असा अशास्त्रीय प्रकार मात्र चालायचा. आजही काही ठिकाणी असा व्यवसाय चालूच आहे. 1851 मध्ये परदेशात लॅगस्ट्रॉथ याने लाकडी पेट्यांमधून मधमाशांच्या वसाहती पाळून मधउत्पादन करण्याचे तंत्र विकसित केले. भारतात 1910 मध्ये कन्याकुमारी, 1937 मध्ये उत्तर प्रदेशात कुमांऊ व नंतर काश्मीर व कर्नाटकात लाकडी पेट्यांमधून युरोपीय मधमाशीपालनाचे छोटे प्रयोग सुरू झाले. पुढे महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वी मधमाशीपालनास कुटिरोद्योगात स्थान दिले. 1956 मध्ये खादी व ग्रामोद्योग आयोग व पुढे राज्यांमध्ये खादी व ग्रामोद्योग मंडळे स्थापन झाली. त्यामुळे मधमाशीपालनास चालना मिळाली. महाराष्ट्रात 1946 सालापासून खादी व ग्रामोद्योग समितीच्या माध्यमातून महाबळेश्वर येथे आधुनिक मधमाशापालनास सुरुवात झाली. कालांतराने राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे तेथे ‘मध संचालनालय’ झाले. आज त्या माध्यमातून ‘मध केंद्र योजना’, ‘मधाचे गाव’, ‘मधुमित्र पुरस्कार’, ‘मध महोत्सव’ आदि उपक्रम सुरू आहेत. परंतु, आज महाराष्ट्रात मधमाशापालनास पर्याप्त अनुकूलता असली, तरी त्याच्या विस्तारास पाहिजे तेवढा वेग आलेला नाही. महाराष्ट्रात ‘आग्या’, ‘सातेरी’, ‘फुलोरी’, ‘पोया’ या स्थानिक, तर ‘मेलिफेरा’ ही युरोपीय मधमाशी आढळते. ज्या स्थानिक मधमाशा आहेत, त्यांच्या वसाहती निसर्गातच उपलब्ध असतात. त्या शोधून, पकडून मधपेटीत भरून हा व्यवसाय सुरू करण्याची प्रथा चालूच आहे. पण, या पद्धतीत मर्यादा आहेत. ‘आग्या’ व ‘फुलोरी’ या पाळता येत नाहीत, परंतु त्यांचे योग्य संवर्धन करणे व त्यासाठी अधिक प्रबोधन करण्याची गरज आहे. ‘पोया’ ही डंखहीन मधमाशी असून, तिचा उपयोग केवळ परागीभवनासाठी केला जातो. ‘सातेरी’ या स्थानिक मधमाशा मधपेटीत पाळता येतात. ‘मेलिफेरा’ ही युरोपीय संकरित जात आहे. या मधमाशा ‘सातेरी’पेक्षा जास्त मध देतात. त्यामुळे मधपाळांचा या मधमाशा पाळण्याकडे अधिक कल असतो. ‘सातेरी’ व ‘मेलिफेरा’ या दोन्ही मधमाशांचे गुणविशेष वेगवेगळे आहेत. जसे की, ‘सातेरी’ मधमाशा जंगल विभाग आणि जंगल-शेती अशा संमिश्र विभागात ‘मेलिफेरा’पेक्षा जास्त मध देतात. परंतु, मराठवाडा किंवा राज्यातील पठारी भागात ‘मेलिफेरा’ पाळणे अधिक लाभदायक ठरते. ‘मेलिफेरां’च्या वसाहतीची वाढ ‘सातेरी’च्या तुलनेत वेगाने होते. ‘मेलिफेरां’ना वेड्या राघूपासून ‘सातेरी’पेक्षा जास्त धोका असतो. ‘मेलिफेरा’ वसाहतीची देखभाल करणे ‘सातेरी’च्या देखभालीपेक्षा अधिक खर्चिक असते. कांद्यासाठी ‘सातेरी’ अधिक लाभकारक, तर सूर्यफूल, डाळिंब, मोहरी यावर ‘मेलिफेरा’ प्रभावी काम करतात. मधमाशीपालन करताना भौगोलिक परिस्थिती, फुलोरा, वसाहत ठेवण्याची जागा, योग्य प्रकारचे प्रशिक्षण या बाबी महत्त्वाच्या. परंतु, मधमाशीपालनात वसाहतीचे व्यवस्थापन, देखभाल व स्थलांतर योग्य पद्धतीत झाले, तर या व्यवसायात वृद्धी व गुणवत्ता वाढ निश्चित होते. ‘सातेरी’ आणि ‘मेलिफेरा’ या दोन्ही मधमाशांच्या वसाहती महाराष्ट्रात वाढण्याची निकड आहे. या दृष्टीने मधपाळांचे व्यापक प्रशिक्षण तसेच शेतकर्‍यांचे प्रबोधन झाले पाहिजे. मधपाळांना प्रशिक्षणात मधमाशांना उपयुक्त असणार्‍या वनस्पतींची माहिती, मधउद्योगातील अद्ययावत ज्ञान, योग्य उपकरणे तसेच मधमाशांचे रोग, शत्रू व त्यावरील नियंत्रण याबद्दल माहिती देणे आवश्यक असते.

मधमाशा हा समूहाने राहणारा कीटक आहे. एका वसाहतीत साधारणपणे 35-40 हजार मधमाशा राहतात. मध तयार होण्याचे मुख्य व दुय्यम असे दोन हंगाम आपल्याकडे असतात. फेब्रुवारी ते जून हा प्रमुख हंगाम, तर नोव्हेंबर ते जानेवारी हा दुय्यम हंगाम समजला जातो. वर्षभर मधपाळाने वसाहतींची ऋतुनुसार योग्य निगा व तपासणी केली पाहिजे. वसाहत सर्वप्रथम निरोगी हवी. कमजोर वसाहत नुकसान करते. वसाहतीची स्वच्छता, हवा खेळती राहणे, सरडे, पाल, मुंग्या व माकडे यापासून संरक्षण (यासाठी स्टँडवर वसाहत ठेवणे, स्टँडखाली वाट्या ठेवून वाटीत पाणी ठेवणे.) काही भागांत अस्वले त्रास देतात. यांस प्रतिबंध म्हणून ‘सोलर झटका तंत्र’ वापरले जाते. वसाहतीच्या दारातून (गेट) मधमाशांची नित्य ये-जा सुरू असणे, हे वसाहत उत्तम असल्याचे लक्षण मानले जाते. मधपाळांनी तपासणी नोंदवही वापरून त्यात निरीक्षणे लिहिली पाहिजेत. त्यांत तपासणीचा दिनांक, अंडी, पिलावा, राणीमाशी, पोकड्यांची स्थिती, मध तयार होण्याची स्थिती, रोगाचा प्रादुर्भाव याचा समावेश असावा. पावसाळ्यात मधमाशा बाहेर पडत नसल्यामुळे त्यांना साखरेचा पाक, परागकण देण्याची विशेष गरज असते.

वसाहतीचे व्यवस्थापनाबरोबर त्याचे स्थलांतरही महत्त्वपूर्ण असते. ऋतूंतील बदलानुसार निसर्गातील मधमाशासुद्धा स्थलांतर करतात. त्याप्रमाणेच पाळीव मधमाशांचेही आवश्यकतेप्रमाणे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे लागते. मधमाशांच्या वसाहती वेळोवेळी स्थलांतरित करणे, हे यशस्वी मधउद्योगाचे गमक आहे. दुष्काळी हंगामावर मात करणे, अधिक मधउत्पादन, प्रतिकूल हवामानापासून वसाहती वाचवणे, पिकांचे योग्य परागीभवन आणि वसाहतीचे विभाजन करून त्याच्यात वृद्धी होण्यासाठी हे स्थलांतर आवश्यक ठरते. पावसाळी हंगामात जंगल भागात फुलोर्‍याचा तुटवडा असतो, मात्र त्यावेळी शेती प्रदेशात फुलोरा असतो आणि जेव्हा देशावर पर्याप्त फुलोरा नसतो. त्यावेळी वनविभागात फुलोरा असतो. स्थलांतराच्या नियोजनासाठी हे वेळापत्रक मधपाळांना माहीत होणे जरूरीचे, परंतु याकरिता वनविभागाच्या अधिकार्‍यांनी मधपाळांना जंगल भागात मधपेट्या ठेवण्यास पूर्ण सहकार्य देणे महत्त्वाचे. स्थलांतराची पूर्वतयारी मधपाळांनी चार-पाच महिन्यांपासून केली, तर अधिक किफायतशीर असते. स्थलांतर जिथे करणार, त्या जागेचे सर्वेक्षण करून वसाहतींना पुरेसे पाणी, मुख्य फुलोरा, मकरंद देणार्‍या वनस्पती, मधमाशांना त्रास देणार्‍या शत्रूंची सद्यस्थिती, मुख्य फुलोरा सुरू होण्यास लागणारा अवधी या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, या सर्व बाबींचा तपशीलवार अभ्यास झाल्यानंतर योग्य वेळी, योग्य स्थानी रात्रीच्या वेळी स्थलांतर करावे. वसाहती वाहनांमधून नेताना त्यांना हिसके बसू न देता कौशल्यपूर्ण पद्धतीत नेणे गरजेचे. स्थलांतर केलेल्या जागेवर वसाहत बसली की तिच्या स्थिरतेस काही अवधी जावयास लागतो. एकदा ती स्थिर झाली की, पूर्वीप्रमाणेच तिची देखभाल व्हावयास हवी. महाराष्ट्रात जिथे छोटे मधपाळ आहेत, त्यांनी सामुदायिक पद्धतीत स्थलांतर केले, तर खर्चात बचत होईल. प्रगतशील व मोठे मधपाळ दुसर्‍या राज्यात स्थलांतर करतात.

महाराष्ट्रात मधपाळांची संख्या वाढणे, वर्षभर फुलोरा उपलब्ध होणे व मधउत्पादन वाढणे काळाची गरज आहे. मधमाशापालन वाढण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ’ कटिबद्ध आहे. या संपूर्ण व्यवसायाचा गुणात्मक विकास व विस्तार होण्यासाठी मंडळाचे महाबळेश्वर येथील मध संचालनालय पुढील काळात एक अद्ययावत ‘अ‍ॅपिकल्चर संस्था’ म्हणून विकासित करण्याचा मंडळाचा संकल्प आहे.
रवींद्र साठे
(लेखक महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ सभापती आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121