पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी दहशतवादाविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले आणि भारतीय लष्कराची ताकद सार्या जगाने पाहिली. मधल्या काळात समाजमाध्यमांवरून असेही वाचण्यात आले की, भारत पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या जाळ्यात अडकतो आहे. पण, एका पाकिस्तानी तज्ज्ञाने उलटपक्षी दावा केला की, भारत नव्हे तर पाकिस्तानच भारताच्या सापळ्यात सपशेल अडकला आहे. पाकिस्तानच्या भूराजकीय व्यवहारतज्ज्ञ डॉ. हुमा बकाई यांनीही दावा केलेला की, भारत अफगाणिस्तानातून पाकिस्तानकडे वाहणार्या नद्यांचेही पाणी रोखणार आहे. यामुळे पाकिस्तानची पुरेपूर कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. एकीकडे भारत, दुसरीकडे बलुचिस्तान आणि आता अफगाणिस्तानही पाकविरोधात ठोस पावले उचलणार का? याकडे जगाचे लक्ष्य लागले आहे.
भारत केवळ चिनाब, झेलम आणि सिंधू नद्या रोखू इच्छित नाही, तर अफगाणिस्तानातून जाणारी काबूल नदीही 12 ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करतो आहे, असा दावा भारताच्या कारवाईनंतर करण्यात आला. या दाव्याने पाकिस्तानी जनतेची भितीने चांगलीच गाळण उडाली. त्यामुळे पाकिस्तानी जनता त्यांच्या लष्कर आणि सरकारविरोधात आवाज उठवू लागली. भारताने हा हल्ला पाकिस्तानच्या थेट आर्थिक क्षमतेवर केलेला होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय राजदूतांनी तालिबान सरकारच्या उच्च अधिकार्यांची भेट घेतली. अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री मावलवी आमिर खान मुत्ताकी यांनीसुद्धा पहलगाम हल्ल्यासंदर्भात निषेध व्यक्त केला. त्याचदरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पहिल्यांदाच मुत्ताकी यांच्याशी फोनवर चर्चा करत,त्यांचे आभार मानले. अफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्यानंतर भारतासोबत झालेल्या पहिल्याच मंत्रिस्तरीय चर्चेमुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.
अफगाणिस्तानातील नद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, काबूल नदी अफगाणिस्तानमध्ये उगम पावते. पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्यानंतर ती खैबर पख्तूनख्वाच्या अनेक भागांसाठी जीवनरेखा होते. या नदीचे पाणी पेशावर, नौशेरा, अटोक आणि सिंधू नदीच्या संगमापर्यंत शेती आणि पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत आहे. काबूल नदीवरील 12 ठिकाणच्या धरणे आणि पाणी व्यवस्थापन प्रकल्पांवर भारत अफगाणिस्तानसोबत काम करत आहे. या प्रकल्पाद्वारे भारत अफगाणिस्तानला ऊर्जा आणि सिंचन क्षेत्रात मदत करतो. त्यामुळे जर या धरणांचे पाणी थांबवले, तर अफगाणिस्तानातील नद्यांमधून पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा थांबू शकतो. काबूल नदीतील पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवल्यास, पाकिस्तानच्या संघर्षमय पश्तून पट्ट्यात आणखी अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यातच पाकिस्तानकडे पाणी साठवणुकीसाठी कोणतेही स्रोत नाहीत आणि भारताने अफगाणिस्तानातील शाहतूत धरण,सलमा धरण असे प्रकल्प आधीच बांधले आहेत.यामुळेच काबूल नदीचे पाणी नियंत्रित करणे म्हणजे पाकिस्तानच्या घशाला कोरड पाडण्याचे दुसरे शस्त्र आहे.
एकीकडे काबूल नदीच्या पाण्याचा प्रश्न चर्चेच असतानाच दुसरीकडे भारत-पाकिस्तान तणावामुळे बंद झालेला अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू झाला आहे. पाकिस्तानच्या वाघा सीमेवर अडकलेल्या सुमारे 50 ट्रकपैकी सहा ट्रक अटारीमार्गे भारतात दाखल झाले. दि. 23 एप्रिल रोजीपासून अफगाणिस्तानसोबतचा व्यापारही थांबला होता. परिस्थिती अधिक तणावपूर्ण असतानाही भारताने अफगाणिस्तानशी व्यवहार सुरू ठेवले आहेत. त्यांच्याच सीमेतून व्यापारी ट्रकही भारतात येत आहेत.
बलुचिस्तानचीसुद्धा एकीकडे वेगळीच गंमत सुरू आहे.‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान बलुचिस्तानातील बंडखोरांनी पाकिस्तानी लष्कराविरोधात जोरदार हल्ला चढवला. भारतापाठोपाठ बलुच लिबरेशनल आर्मीसुद्धा पाकिस्तानची चिनी शस्त्रे उद्ध्वस्त करण्यात सक्रिय झाली. भूसुरुंगाच्या स्फोटात बलुच बंडखोरांनी पाकिस्तानच्या अनेक चिलखती वाहनाचे अक्षरशः तुकडे केले. वास्तविक चीन आणि तुर्की पाकिस्तानला लहान भावाप्रमाणे मदत करताना दिसत आहे. असे असले तरी सौदी अरेबिया, इंडोनेशिया, अफगाणिस्तान असे अनेक इस्लामिक राष्ट्र आणि इतर महासत्ता दहशतवादाच्या विरोधात भारतासोबतच आहेत. त्यामुळे पाकिस्तानला घाम फुटला असला तरी, भारताने खेळलेल्या बुद्धिबळाच्या खेळात पाकिस्तान चेकमेट झाला आहे, हे नक्की!
ओंकार मुळ्ये