विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती

भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

    14-Jun-2025
Total Views | 12

virar alibaugh



मुंबई,दि.१३ : प्रतिनिधी 
आगामी वाहतूककोंडी मुंबई महानगर प्रदेशात विविध प्रकल्पांना गती असतानाच आता बहुप्रतीक्षित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला आता राज्य सरकारकडून गती देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मंजुरी दिली आहे.भूसंपादनासाठी आवश्यक कर्जासाठी राज्य सरकारने शासन हमी घेतली आहे, त्यामुळेविरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे.

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पासाठी एकूण अंदाजे खर्च ६६,००० कोटी रुपये असून, त्यापैकी २२,३०० कोटी रुपये केवळ भूसंपादनासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. विरार ते अलिबाग वाहतूक मार्गिका या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडको या वित्तीय संस्थेकडून उभारण्यात येणाऱ्या २२ हजार २५० कोटीच्या कर्जास वित्त विभागाच्या अटीस अधीन राहून शासन हमी देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दि. २६ जून २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मंजूरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आता जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मागणीनुसार हुडकोकडून प्रस्तावित व्याजाचा दर कर्ज घेण्याच्या वास्तविक दिनांकावर अवलंबून असणार आहे. कर्ज घेताना रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित बँक दराचा विचार करून, त्यानुसार व्याजाचा दर कमीत कमी निश्चित करण्याबाबतची कार्यवाही करावी. कर्जाचा मुदत कालावधी १५ वर्षाचा असणार आहे.‌ विधी व न्याय विभागाने विहित केलेल्या नमुन्यात शासन हमी करारनामा करण्यात यावा, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल दर ६ महिन्यांनी (३१ मार्च व ३० सप्टेंबर) सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करणे बंधनकारक असणार आहे.

मुंबई-रायगड एक तासात


मुंबई-विरार-अलिबाग-अटल सेतूवरून पुन्हा मुंबईत मरीन ड्राइव्ह ते वरळी, वरळी सी लिंक ते वर्सोवा-दहिसर आणि दहिसर ते भाईंदर आणि भाईंदर ते विरार आणि विरारपासून पालघर ते थेट अलिबागपर्यंत रिंग रोंड तयार करण्यात येणार आहे. अलिबागवरून हा मार्ग नवी मुंबई विमानतळासह अटल सेतूला जोडला जाईल. यामुळे मुंबई आणि महानगर क्षेत्र एका मार्गाने जोडले जाणार आहे. यामुळे मुंबई ते रायगड एक तासात प्रवास करता येणार आहे. हा एक्सप्रेस वे रायगड, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांना जोडेल. त्याचे बांधकाम दोन टप्प्यात केले जाईल. पहिला टप्पा वसईजवळील नवघर आणि पेणजवळील बालावली दरम्यानचा ९६.४१ किमीचा महामार्ग आहे. दुसरा टप्पा बालावली आणि अलिबाग दरम्यानचा २९.९ किमीचा महामार्ग आहे. मुंबई महानगर प्रदेश आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १६५ किमी लांबीचा प्रकल्प नियोजित करण्यात आला आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121