
मुंबई : धारावीमध्ये दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही लेप्टोस्पायरोसिस या आजाराची भीती पसरली आहे. प्रत्येक पावसाळ्यात विशेषतः जुलै ते सप्टेंबर दरम्यान एक जीवघेणा संसर्ग झपाट्याने पसरतो आणि अनेकांच्या जीवाला धोका निर्माण करतो. लेप्टोस्पायरोसिस एक जीवाणूजन्य आजार आहे. जो प्रामुख्याने उंदरांमुळे हा आजार फैलावतो. उंदीर मलमूत्रामुळे दूषित झालेल्या पाण्यातून ये-जा करतात आणि हा आजार पसरवतात. पावसाळ्यात चपला किंवा बूट न घालता अशा पाण्यातून चालताना, विशेषतः पायाला छोटीशी जरी जखम असेल तर या संसर्गाचा धोका जास्त असतो. धारावीत अनेक वर्षे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स सांगतात की, जुलै ते सप्टेंबर या काळात दर महिन्याला सरासरी २० ते ३० लेप्टोचे रुग्ण समोर येतात. सर्व वयोगटांतील लोकांना हा आजार होऊ शकतो; मात्र लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना त्याचा सर्वाधिक धोका अधिक असतो.
हुसैनी मशीदजवळील धारावी पोलीस ठाण्याच्या मागील गल्लीत राहणाऱ्या अमिना बानू शेख सांगतात, "माझ्या झोपडीबाहेर गेली अनेक वर्षे गटार वाहते आहे. तिथे अनेक उंदीर आहेत. माझी मुलं दिवसभर त्याच जागी खेळतात. त्यांच्याकडे शाळेसाठी फक्त एक जोडी बूट आहे; बाकी वेळ ते अनवाणीच राहतात. माझ्या ११ वर्षांच्या मुलीला गेल्या वर्षी लेप्टो झाला होता. यावर्षीही होईल अशी मला भीती वाटते.”
धारावीतील ब्लॉक क्र. ५ चे रहिवासी अनिस उपहासात्मक सुरात म्हणतात, "धारावीची स्थिती अशी आहे की, इथल्या गल्लीत मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टो – काय हवं ते मिळेल! मुलं आजारी पडतात, त्यांना सायन रुग्णालयात नेलं जातं, आणि तिथेच त्यांचा अंत होतो.”
धारावी : विशेषतः असुरक्षित
धारावी मध्ये लेप्टोस्पायरोसिस ही केवळ वैद्यकीय नव्हे तर सामाजिक, नागरी आणि धोरणात्मक व्यवस्थेच्या अपयशाची भयावह झलक आहे. धारावीतील नागरिकांचे जीवन आणि आरोग्य हे धोका पत्करूनच चालले आहे. पावसाळा येतो तसा आजारांचाही कहर वाढतो आणि दुर्लक्षित गल्ल्यांतील ही लोकं पुन्हा एकदा भीती, वेदना आणि संकटात सापडतात. त्यामुळे पुनर्विकासातून या घाण आणि अस्वच्छतेतून आपली सुटका होईल, अशी धारावीकरांना आशा आहे.
"धारावीत लेप्टोचा प्रश्न अधिक गंभीर आहे, कारण पाणी व ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचतं, नाले तुंबतात, आणि त्याच पाण्यात उंदीर, मांजरं आणि इतर प्राणी मूत्र विसर्जन करतात. त्या मूत्रात असलेल्या जीवाणूंमुळे जखमीतून संसर्ग होतो."
- डॉ. अनिल पाचनेकर
"धारावीत पावसाळ्यात होणाऱ्या आजारांची ही दु:खद कहाणी वर्षानुवर्षं तशीच सुरू आहे. इथली परिस्थिती अशी आहे की लोकांना आजारांपासून वाचणं शक्यच नाही. मुलं अस्वच्छ रस्त्यांवर खेळतात, लोकांना कामावर जाण्यासाठी पाण्यातूनच जावं लागतं. प्रत्येकाकडे चप्पल, बूट असतीलच असं नाही. इतक्या वर्षांत काहीही बदल झालेला नाही."
- डॉ. अमजद बाग
आकडेवारी काय सांगते?
- महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ नुसार, मुंबई हे या साथीचे केंद्रबिंदू आहे.
- २०२४ मध्ये राज्यात लेप्टोमुळे २६ मृत्यू झाले,
- २०२३ मध्ये हे प्रमाण केवळ ८ होते.
- एकट्या मुंबईत १८ मृत्यू ऑक्टोबर २०२४ पर्यंत नोंदवले गेले,
- ९५३ रुग्णांची नोंद झाली, विशेषतः धारावी, कुर्ला आणि गोवंडी परिसरांमधून.