राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण काय आहे? कुणाला फायदा होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती
20-May-2025
Total Views | 24
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान, हे धोरण नेमके कसे असेल? यामुळे कुणाला फायदा होणार? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्राचे नवीन गृहनिर्माण धोरण मंजूर केले आहे. या धोरणामध्ये सामान्य माणसाला घर कसे मिळेल हा विचार करण्यात आला आहे. 'माझं घर माझा अधिकार' या ब्रीदवाक्याने हे धोरण प्रेरित आहे. या धोरणात मुंबई एमएमआरसहित संपूर्ण महाराष्ट्रातील भविष्यातील गृहनिर्माणाच्या धोरणाचा आढावा घेण्यात आला आहे. कुठे आणि किती घरे बांधावी लागतील? ट्रेंड्स कशाप्रकारचे आहेत? याचा विचार केलेला आहे. कुठल्या प्रकारच्या घरांना प्रोत्साहन द्यायचे यासह परवडणाऱ्या आणि सर्वसमावेशक घरांचा विचार केला आहे."
"ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिला, विद्यार्थी आणि औद्योगिक कामगार अशा विविध घटकांचा विचार या धोरणाच्या माध्यमातून केलेला आहे. यानिमित्ताने सर्व प्रकारच्या योजना आणि लाभार्थ्यांना महाआवासच्या सिंगल पोर्टलवर आणणार असून त्यातून सर्वांना पारदर्शीपणे लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वतता आणून निसर्गाशी साधर्म्य साधता येईल, असा प्रयत्न या धोरणातून करण्यात आला आहे. २००७ नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचे सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरण केले आहे. या धोरणामध्ये रखडलेले आणि अर्धवट असलेले प्रकल्प, पुनर्विकास या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत," असेही त्यांनी सांगितले.
भुजबळांच्या येण्याने मंत्रिमंडळाला फायदा होईल!
मंत्री छगन भुजबळ यांच्या शपथ विधीनंतर अंजली दमानिया यांनी केलेल्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "छगन भुजबळ एक जेष्ठ नेते आहेत. देशातील ओबीसींचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय घेतला असून आम्ही त्याचे स्वागत केले आहे. प्रत्येक व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते असू शकतात. पण भुजबळ साहेबांसारखा एक जेष्ठ मंत्री आणि ओबीसी समाजाचा हितचिंतक मंत्रीमंडळात आल्याने त्याचा फायदा होईल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.