स्वप्न विशाल बलुचिस्तानचे!

    17-May-2025
Total Views | 25
will Balochistan come to reality?


भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू झाल्याचा मुहूर्त साधत, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्ययोद्ध्यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली. “हा बलुच जनतेने घेतलेला राष्ट्रीय निर्णय (नॅशनल व्हर्डिक्ट) आहे,” असे ते म्हणाले. बलुच नेते मीर यार बलुच यांनी ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’च्या निर्मितीची घोषणा करीत, हा नवीन देश पाकिस्तानपासून फारकत घेत असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे, तर बलुच संघटनेने दिल्लीत स्वतंत्र उच्चायुक्तालय सुरू करण्याची मागणी केली आहे. जागतिक पटलावर भारतासह अन्य देशांनी आपल्याला साथ द्यावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. “पाकिस्तान बलुचांचा वंशविच्छेद करीत आहे, पाकिस्तान बलुच लोकांना युद्धबंदी मानते, त्यांना बलुच संस्कृतीच नष्ट करायची आहे,” असा गंभीर आरोप बलुच नेते मीर यार बलुच पाकिस्तानवर केला आहे.


मीर यार बलुच हे एक लेखक तर आहेतच, तसेच ते स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणार्‍या ‘बलुच लिबरेशन आर्मी’चे नेतृत्वही करीत आहेत. संयुक्त राष्ट्रांनी त्यांची शांतिसेना बलुचिस्तानमध्ये पाठवावी आणि पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्या नवीन सीमेच्या आतच राहण्यास सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. वरवर पाहता, हे सर्व साध्य होणे कठीण दिसते. पण, बलुच समाजाचा स्वातंत्र्यासाठीच्या प्रभावी लढ्याचा इतिहास खूप जुना आहे, हेही विसरता येणार नाही. बलुच लोक पराक्रमी आणि लढवैय्ये मानले जातात. ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला आणि त्यांना माघार घेण्यास आणि क्वेटा सोडण्यास भाग पाडले, हेही नजरेआड करता यायचे नाही. या पूर्वी 2025 सालच्या मार्च महिन्यात नैऋत्य पाकिस्तानमध्ये बलुच बंडखोरांनी एका ट्रेनचेच अपहरण करून प्रवाशांना सुमारे 36 तास ओलीस ठेवले होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या 1947 सालच्या कायद्यानुसार भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण करण्यात आले. या दोन देशांवरील ब्रिटिश सत्ता पूर्णपणे नष्ट झाली. बलुच लोकांची इच्छा नसतानाही बलुचबहुल प्रदेश पाकिस्तानमध्ये यावेळी सामील करून घेण्यात आला. तेव्हापासून स्वतंत्र होण्यासाठी बलुच लोकांचा पाकिस्तान शासनाशी सतत संघर्ष सुरू आहे.

भारताच्या फाळणीनंतर लगेचच श्रीनगर जिंकण्याच्या सोपवलेल्या कामगिरीत अपयश आल्यानंतर मेजर जनरल अकबर खान याला बॅरिस्टर महमंद अली जिनांनी पाचारण केले. बलुचिस्तानमध्ये कलात नावाचा जिल्हा आहे, होता. याच नावाचे शहरही होते. कलातच्या खानांना शरण आणण्याचे काम जिनांनी मेजर जनरल अकबर खान याच्यावर सोपविले. बलुचिस्तानातले कलात हे महत्त्वाचे संस्थान होते. कलातच्या खानाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचे नाकारले. त्याने आपले संस्थान स्वायत्त असल्याचे जाहीर करून आपल्या सैन्यात काही हजार टोळीवाल्यांना सामील करून घेतले. कलातच्या खानाने नवीन कलात राष्ट्राच्या पंतप्रधानपदी, परराष्ट्रमंत्रिपदी, लष्करप्रमुखपदी आणि इन्स्पेक्टर जनरलपदी इंग्रजांची नेमणूक केली. जिनांनी कलातवर हल्ला करण्यासाठी चार बटालियन अकबर खानकडे सोपविल्या होत्या. अकबर खानच्या मदतीसाठी कराची बंदरावर नौका उभ्या केल्या आणि अन्यत्र बॉम्बफेकी विमानेही सज्ज ठेवली. या लहानशा कामासाठी एवढी मोठी तयारी आवश्यकता नाही, असे अकबर खान याचे मत होते. त्यावेळी पाकिस्तानचे काश्मीरबाबत भारताशी युद्ध सुरू होते. लाहोर, कराची किंवा हैदराबाद या ठिकाणीच मोठी सैनिकी तयारी हवी, असे आपले मत असल्याचे अकबर खानचे जिनांना सांगितले. पण, जिनांनी आपला निर्णय बदलला नाही. कलात जिंकल्यानंतर उरलेले बलुचिस्तानही पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने विलीन करण्यात आले. तेव्हापासून सुरू असलेला संघर्ष आजतागायत सुरू असून त्यात खंड पडलेला नाही. कलातच्या खानाने भारताची मदत तेव्हाही मागितली होती. पण, आपले राजकारण एकूणच खूप बाळबोध वळणाचे आहे. तेव्हा तर नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले असल्यामुळे आपले राज्यकर्ते वेगळ्याच विश्वात विहार करीत होते. आपण या भानगडीत होण्याचे साफ नाकारले. तेव्हापासून बलुचिस्तानची जखम जी चिघळत राहिली आहे, ती आहेच.

आज याच बलुचिस्तान प्रांतात ग्वादर बंदर उभारून चीनने त्या बंदराचा आणि परिसराचा ताबा घेतल्यातच जमा आहे. हे पाहिल्यानंतर बलुच जनतेचा संताप द्विगुणित झाला, यात नवल नाही. चीनने काराकोरम खिंडीतून ग्वादर बंदरापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू केले आहे. ग्वादर बंदरापर्यंत रेल्वे आणि तिथेच विमानतळही अशी प्रचंड कामेही चीनने आपल्या हाती घेतली आहेत. हा चीनचा आपल्या भागातला चंचूप्रवेश आहे, हे जाणून बलुच जनता ही कामे पार पडू नयेत, यासाठी सतत अडथळे निर्माण करीत असते. आता तर या रस्त्याच्या कामावर असलेल्या चिनी कामगारांच्या संरक्षणाची जबाबदारी पाकिस्तानच्या लष्कराकडे आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर विरुद्ध बलुच जनता हा संघर्ष अक्षरश: रोजचा झाला आहे. ग्वादर बंदर बांधून पूर्ण तयार झाले की, चिनी मालाला या बंदरातून अरबी समुद्रामार्गे अमेरिकेत, दक्षिण अमेरिकेत, आफ्रिकेत विनासायास प्रवेश करण्याचा राजमार्ग उपलब्ध होईल आणि सध्या चीनला जो लांबचा फेरा पडतो तो पडणार नाही, पैसा वाचेल आणि सुरक्षाही लाभेल.

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू होताच, बलुच बंडखोरांनी भारताला निरोप पाठविला होता की, आम्ही आमच्या भागातून संघर्षाला प्रारंभ करीत आहोत. दुसर्‍या बाजूने तुम्ही अशीच मोहीम सुरू करा. आज बलुचिस्तान क्षेत्रफळाने पाकिस्तानमधील सर्वांत मोठा प्रांत आहे. बलुचिस्तान प्रांताने पाकिस्तानचा 48 टक्के भूभाग व्यापला आहे. क्वेटा ही बलुचिस्तानची राजधानी व सर्वांत मोठे शहर. एकटा बलुचिस्तान लांबोळक्या पाकिस्तानमधून बाहेर पडला, तरी पाकिस्तान पांगळे होईल. पख्तुनबहुल प्रदेशालाही पाकिस्तानमधून फुटून बाहेर पडायचे आहे. सिंध प्रांतातही हीच भावना आहे. मग उरतो फक्त या सर्वांशी मग्रुरीने वागणारा पंजाबीबहुल पंजाब!

बलुचिस्तानमध्ये ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ हा एक मोठा बंडखोर गट आहे. अशाच एका बंडखोर गटाने तुर्बत शहरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचे वृत्त आहे. केच नदीच्या काठावर वसलेले तुर्बत हे दक्षिण बलुचिस्तानमधील एक शहर आहे. हे केच जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या घटनेमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. स्वातंत्र्याच्या मागणीसाठी बलुच नागरिक ठिकठिकाणी बंड करून उठले असून, पाकिस्तानी लष्कराच्या दमनशाहीला जिद्दीने विरोध करीत आहेत. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ शिवाय इतरही लहानलहान बंडखोर गट स्वतंत्रपणे संघर्ष करीत आहेत. त्यांनी अनेक महामार्गही बंद केले आहेत. ‘बलुच राजी अजोई संघर’ (बीआरएएस) हीसुद्धा एक सशस्त्र संघटना आहे. ती एकाचवेळी अनेक शहरात मोठाली आंदोलने उभारते. नुकताच तिने जवळजवळ 50 शहरांत एकाचवेळी उठाव करून पाकिस्तानची भंबेरी उडवून दिली होती. बलुच बंडखोर पंजाब्यांवर खूप नाराज आहेत. कारण, पंजाबी स्वतःला राज्यकर्ते समजतात. सध्या जरी सर्वच इस्लामधर्मी आणि त्यातलेही सुन्नीच असले, तरी आपण मूळचे राजपूत आहोत, असे पंजाबी मानतात. बलुच, सिंधी व पख्तून हे राज्यकर्त्या वर्गातले नाहीत, अशी त्यांची प्रौढी असते. म्हणून ते या घटकांना दुय्यम दर्जाची वागणूक देत असतात. ग्वादर बंदर बलुचिस्तानमध्ये आहे. त्याला आणि ‘चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ला (सीपीइसी) बलुचींचा कडवा विरोध आहे. या प्रकल्पात चीनने फार मोठी रक्कम गुंतवली आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी चीनमधून आलेल्या कर्मचार्‍यांवर बलुचींचे हल्ले वाढले आहेत. यामुळे चीन संतापला असून, त्याने पाकिस्तानला खडसावले आहे. चिनी कर्मचार्‍यांच्या संरक्षणाची जबाबदारी पाकिस्तानी सैनिकी तुकड्यांनी घ्यावी, असे चीनने सांगितले आहे. बलुच बंडखोरांनी त्यांच्यावरही हल्ले करायला सुरुवात केली असून, रोज कुठे ना कुठे संघर्ष होत असतो. ‘सीपेक’ महामार्गाचे काम मंद गतीने सुरू असून ही चीनसाठी एक डोकेदुखीच होऊन बसली आहे.
अशाप्रकारे बलुचिस्तानला एक स्वतंत्र राष्ट्र बनवण्याची चळवळ दीर्घकाळापासून चालत आलेली चळवळ आहे, हे सर्व जग पाहते आहे. बलुच लोकांना आपण पाकिस्तानमध्ये दुर्लक्षित आहोत, आपल्यावर सतत अन्याय होत असतात आणि आपल्या मूलभूत अधिकारांचे हरण होत असते, असे वाटते. 1948 साली पाकिस्तानने बलुचिस्तानला आपल्यात जबरदस्तीने सामील करून घेतले, ही सल बलुच लोक विसरले नाहीत, विसरणारही नाहीत. बलुचिस्तानमध्ये नैसर्गिक वायू आणि खनिजांचे मोठे भंडार आहे, याच्याआधारे बलुच लोकांचे जीवन समृद्ध व्हायला हवे होते. पण, प्रत्यक्षात बलुचांच्या वाट्याला काहीही आलेले नाही. बलुच लोकांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कही हिरावले गेले आहेत. बलुचिस्तानच्या भरवशावर इतर राज्यांचाच विकास आजवर झाला आहे. बलुच संस्कृती आणि भाषा यांच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. आज स्वातंत्र्यासाठीच्या चळवळीने व्यापक रूप धारण केले असून, पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले आहे. बांगलादेश निर्माण व्हावा म्हणून भारताने जसे साह्य केले, तशीच मदत आपल्यालाही करावी, असे बलुच लोकांना वाटते. भारताने अजूनतरी अशी मदत केलेली नाही.

बलुच लोक फक्त बलुचिस्तानमध्येच आहेत, असे नाही. आजमितीला बलुचबहुल प्रदेश तीन देशांत विभागलेला आढळतो. ते देश आहेत, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. सर्वांत मोठा भूभाग पाकिस्तानमध्ये आहे. सर्वांत जास्त बलुच लोकही पाकिस्तानमध्येच आढळतील. पाकिस्तानमध्ये अंदाजे 1.5 कोटी बलुच लोक राहतात, त्यांचे प्रमाण पाकिस्तानाच्या एकूण लोकसंख्येच्या 3.6 टक्के इतके आहे. बलुचिस्तान प्रांतामध्ये सर्वाधिक बलुच लोकसंख्या आहे, तर सिंध आणि पंजाब प्रांतांमध्येही काही बलुच लोक राहतात. इराणमधील एक प्रांत सिस्तान आणि बलुचिस्तान या नावाने ओळखला जातो. इराणमध्ये अंदाजे 20 लाख बलुच लोक राहतात. इराणच्या सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात त्यांची संख्या जास्त आहे. बलुच हे प्रामुख्याने बलुचिस्तान आणि इराण-पाकिस्तान सीमेच्या दोन्ही बाजूंना राहणारे लोक आहेत. दक्षिण अफगाणिस्तानमधल्या निरूझ, हेलमंड आणि कंदहार प्रांतातही बलुच लोक बहुसंख्येने आहेत. अफगाणिस्तानमध्ये अंदाजे एक लाख बलुच लोक राहतात, त्यांचे प्रमाण अफगाणिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे दोन टक्के आहे, असे बोलले जाते. पाकिस्तानमधील बलुचबहुल भागाला बलुचिस्तान प्रांत म्हटले जाते. सर्व बलुच लोकांचा एक स्वतंत्र देश असावा, (विशाल बलुचिस्तान) अशी या भागातील लोकांची इच्छा आहे. या लढ्याचे नेतृत्व पाकिस्तानमधील बलुच लोकांकडे आले आहे, कारण ते संख्येने सर्वांत जास्त आहेत.

बलुचिस्तानमधील संघर्षाची परिणिती कशात होईल? बलुच लोकांची संख्या इतकी कमी आहे की, ते पाकिस्तानच्या दमनचक्राचा भेद करू शकतील, असे अनेकांना वाटत नाही. पण, ते लढवय्ये आहेत. ते प्रतिपक्षाला हल्ले करून बेजार करतील. ते बलुचिस्तानमधील खनिजे, रत्ने पाकिस्तानला मिळू देणार नाहीत. या रांगड्या लढाऊ गड्यांमध्ये राजकीय चातुर्याचा अभाव आहे, असे मानले जाते. सर्वांशी जुळवून घेणारा आणि त्यांना सतत बरोबर ठेवेल, असा नेताही बलुचींमध्ये निदान आजतरी नाही. सामान्यतः असे समाज लढता लढता नष्ट होतात, पण शरण जात नाहीत. हे हौतात्म्य झाले. पण, बलुच शरण जाणार नाहीत, तसेच ते नष्टही होणार नाहीत. ते अनुकूल संधीची वाट पाहत लढत राहतील, असा चिवटपणा त्यांच्यात आहे. एक शक्यता अशीही असू शकेल की, दोन्ही पक्ष लढून लढून थकतील आणि मधला मार्ग स्वीकारून तडजोड करतील. तिसरी शक्यता अशी आहे की, पाकिस्तानचेच तुकडे पडतील. चळवळे सिंधी आणि पख्तून वेगळे झाले, तर बलुचिस्तानही वेगळा होईल. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व बड्या राष्ट्रांना आजचा पाकिस्तान हवा आहे. कारण तो अमेरिका, रशिया आणि चीन या तिघांशीही एकाचवेळी जुळवून घेतो. हरकाम्या आणि सांगकाम्या कुणाला नको असतो? पण, पाकिस्तानी जनतेचे तसे नाही. ती जुलमी लष्करशहा, ‘आयएसआय’मधील शकुनी आणि स्वार्थात आकंठ बुडालेले राजकारणी यांना विटली आहे. पण, मुल्ला- मौलवींचा तिच्यावर असलेला पगडा मात्र अजूनही फारसा कमी झालेला नाही. या अशांत ज्वालामुखीचा स्फोट केव्हा होईल, ते सांगता येणार नाही.
मोदी पाकिस्तानमध्येही लोकप्रिय आहेत. ‘काश, हमारे पास भी एक मोदी होता!’ ही जनसामान्याची उत्कट इच्छा अनेकांच्या कानी पडली असेल. ‘आपापसात भांडण्यापेक्षा आपण दोघेही दारिद्य्र, बेकारी आणि रोगराईशी लढू या,’ हे मोदींचे आवाहन धर्मपिसाट पाकिस्तानी नेत्यांपेक्षा पाकिस्तानमधील जनसामान्याला होते. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर परिस्थिती खूप बदलली आहे. भारताचे पारडे चार प्रश्नी वरचढ झाले आहे. पाकव्याप्त काश्मीर, सिंधू जलवाटप करार, बलुचिस्तान आणि पाकिस्तानचे अण्वस्त्र साठवण केंद्र. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानुकूल वारे वेगाने वाहू लागले आहेत. उद्या पाकव्याप्त काश्मीर भारतात आले, तर भारताचा अफगाणिस्तान मार्गे बलुचिस्तानशी संपर्क प्रस्थापित होऊ शकेल. आज भारत आणि बलुचिस्तानच्या सीमा एकमेकींना स्पर्श करीत नाहीत. ही अडचण दूर झाली, तर भारत बलुचिस्तानसाठी खूप काही करू शकेल. पाकिस्तानला खोली नाही. तो लांबुळका आहे. बलुचिस्तान वेगळा झाला, तर पाकिस्तानचा नकाशा एखाद्या अस्थिपंजर व्यक्तीसारखा दिसू लागेल. युद्धात गरज पडल्यास मागे सरकायला पुरेशी भूमी असावी लागते. हा मुद्दा दुसर्‍या महायुद्धात रशियाला जर्मनीबरोबर लढताना कामी आला होता. सिंधूचे पाणी पाकिस्तानला आजच्या सारखे मिळाले नाही, तर पाकिस्तानचे रखरखीत वाळवंटच होईल. भारताने सिंधू पाणीवाटप करार स्थगित केला आहे. पाकिस्तान अण्वस्त्र हल्ल्याची धमकी भारताला देत असतो. या युद्धात ज्या ठिकाणी ही पाकिस्तानने साठवून ठेवली आहेत, त्या बोगद्याच्या दोन्ही तोंडाशी भारताने बॉम्ब हल्ले करून मोठाली भगदाडे करून ठेवली आहेत, अशा वार्ता पाकिस्तानातूनच बाहेर आल्या आहेत. या चार नाक्यांपैकी कोणत्याही एका नाक्याचा बंदोबस्त केला, तर पाक गलितगात्र होईल. प्रत्यक्षात असे काही करण्याची आवश्यकता बहुदा पडणारही नाही. नाक दाबले की, तोंड उघडते म्हणतात. इथे तर चार नाकी भारताच्या नियंत्रणाखाली येऊ शकतील अशी असणार आहे.
वसंत काणे
9422804430
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121