छत्रपती शिवरायांचे किल्ले अतिक्रमण मुक्त होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
19-Feb-2025
Total Views | 59
पुणे : छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून तिथे कुठल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव' या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे तर होतेच यासबोतच ते उत्तम प्रशासकही होते. विविध व्यवस्थापनाचे गुरु होते, शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा, जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून राज्य शासनाच्यावतीने सातत्याने त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरु आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकास कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून याठिकाणी कोणतेही अतिक्रमण राहणार नाही."
"येत्या ५ वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ४०० वा शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत. किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर इथल्या मातीतून स्वराज्याची स्फूर्ती आणि तेज मिळते. यातून प्रेरणा घेऊन राज्याची सेवा करण्यासाठी आम्ही इथे येतो. मुघल साम्राज्यात विविध राजे, राजवाडे मुघलांचे मांडलिकत्व पत्करत असताना मराठी मुलखात अनाचार, अत्याचार सुरु होते. त्यावेळी माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना याचा प्रतिकार करुन स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी दिली. छत्रपती महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करुन मावळ्यांची फौज तयार केली. या माध्यमातून त्यांनी देव, देश आणि धर्माची लढाई सुरु केली आणि स्वराज्य स्थापनेतून भारताचा आत्मभिमान जागृत केला. आजच्या १४० कोटी लोकसंख्येच्या आत्मभिमानी भारताच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे, ते आमचे आराध्य दैवत आहेत," अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
महाराजांचे गडकिल्ले जागतिक वारसास्थळे होणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील १२ गडकिल्ले नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन आणि पर्यावरणशास्त्राचा उत्तम नमुना आहेत. याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरीता येतील," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.