गाथा स्वातंत्र्यलढ्याच्या, कथा क्षत्रिय शौर्याच्या...

    15-Apr-2023
Total Views | 176
 
 
freedom struggle
 
 
भारतीय स्वातंत्र्याच्या ‘अमृत’मधुर पर्वात, मागे वळून बघताना स्वातंत्र्य सैनिकांच्या कितीतरी कथा नव्याने पुन्हा एकदा ऐकायला मिळाल्या. अनेक संस्था, व्यक्ती आणि सरकारी पातळीवरून विविध माध्यमांत स्वातंत्र्यलढ्यातील इतिहास मांडण्यात आला. त्यावरून लक्षात येते, आज जे आपण मुक्त स्वातंत्र्य अनुभवतो आहोत, त्यासाठी 75 वर्षांपूर्वी किती जणांनी त्याग केला, किती जणांनी तुरूंगात हाल-अपेष्टा सोसल्या आणि किती जणांनी प्राणांची आहुती दिली, याची गणती नाही.
 
मंतरलेल्या त्या काळात प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्याचे गीत गात होती. स्त्रिया, शेतमजूर, वनवासी, लहान शालेय मुले, विविध ज्ञाती, जमाती, हे सारेजण एक झाले होते. परकीयांच्या दास्यातून भारतमातेला सोडवणे हा एकच ध्यास घेऊन असंख्य अनाम वीरांचे बलिदान काळाच्या पटलावर मूकपणे मिटून गेले. अशांच काही कहाण्या जीवंत करणारे प्रा. श्रीकृष्ण व्ही. सोमवंशी लिखित ‘कथा क्षत्रिय शौर्याच्या’ हे पुस्तक नुकतेच वाचकांच्या भेटीला आले आहे.
 
या पुस्तकात प्रारंभी स्वातंत्र्यसेनानी गणपतराव पाटोळे यांची कहाणी विलक्षण प्रेरक आहे. 1942च्या आंदोलनात पंधराव्या वर्षी उडी घेणार्‍या पंढरपूरच्या या शालेय मुलाने मित्रांसह एक संघटन सुरू केले. मुंबई, पुणे, कोलकाता या शहरांतील बॉम्बस्फोट, जाळपोळ असे क्रांतिकार्य ऐकून, आपणही तसेच काहीतरी जहाल कृत्य केले पाहिजे म्हणून गावात इंग्रजांच्या अधिनस्त असलेल्या ठिकाणी मित्रांच्या मदतीने जाळपोळ केली. इंग्रजांनी या मुलांची धरपकड करून त्यांना तुरुंगामध्ये टाकले. एवढ्या लहानपणी सक्त मजुरीचा कारावास झाला. नऊ महिने शिक्षा भोगल्यावर ते मुक्त झाले, पण देश स्वतंत्र झाला नव्हता. 15 ऑगस्ट, 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यावर तुरूंगवासाचे सार्थक झाले. स्वातंत्र्यसैनिकांची सरकारी पेन्शन त्यांनी नाकारली. देशभक्तीचे मोल असे पैशांत करणे, त्यांना पटले नाही. पुणे महानगरपालिकेत कुटुंबाच्या चरितार्थासाठी नोकरी करून सेवादलाच्या माध्यमातून सामाजासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले. त्यांना लेखन-वाचनाची आवड होती. त्यांच्या कवितेचा ’धून’ नावाचा काव्यसंग्रहला थोर लेखक ग. प्र. प्रधान यांची प्रस्तावना लाभली होती. 1972 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते देशसेवेच्या सन्मानार्थ ताम्रपट प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. बालपणापासून देशभक्तीची तळमळ मनात असलेल्या गणपतराव पाटोळे यांनी जीवन देशासाठी सार्थकी लागले होते.
 
सोलापूरच्या तुकाराम चव्हाण यांची कथा अशाच समर्पणाच्या इतिहासाचे एक पान उलगडते. ज्ञात इतिहासातील ’सोलापूरचा स्वातंत्र्यलढा’ फारच वैशिष्ट्यपूर्ण घटना होती. 1947 पूर्वी 17 वर्षे आधी सोलापूरने इंग्रजांची सत्ता धुडकावून ’तीन दिवसांचे स्वातंत्र्य’ उपभोगले होते. चादरी आणि टॉवेल ही सोलापूरची ओळख असली, तरी ‘हुतात्म्यांचे शहर’ ही खरे तर सोलापूरची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यसेनानी तुकाराम चव्हाण यांच्या लढ्याची कहाणी अधिक खुलते. आपला देश गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या ध्यासाने वेडे होऊन त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक कारवाया केल्या. बंदुकीने भरलेल्या गोळ्या घेऊन उभ्या असलेल्या इंग्रज अधिकार्‍यांसमोर ’इन्कलाब जिंदाबाद’ नारे देऊन आव्हान दिल्यानंतर इंग्रजांचे अत्याचार सुरू झाले. त्यांचे व्यवसायाचे सामान जाळून टाकण्यात आले. सश्रम कारावासाची शिक्षा होऊन सोलापूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदी झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1966ला मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते तुकाराम चव्हाण यांचा सन्मान झाला. एका धाडसी, शूर स्वातंत्र्यसैनिकाचे जीवन देशसेवेस समर्पित होते.
 
समर्पित आणि त्यागी जीवनाच्या एकाहून एक ’क्षत्रिय शौर्यकथा’ या पुस्तकातून एकामागोमाग एक उलगडत जातात. आर्वीचे चित्रकार आपल्या रंगरेषांच्या कुंचल्याने इंग्रजांना धक्का देणारे दाजिबा ताजनेकर, मोठे सामाजिक कार्य उभारणारे पुण्याचे गांधीवादी नेते नानासाहेब तळेगावकर, इंग्रजांना सळो की पळो करणारे अहमदनगरचे जनार्दन घोडके, राजगुरूनगरचे कुस्तीगीर तरुणांना व्यायामाचे धडे देऊन स्वातंत्र्यप्रेमाचे बाळकडू पाजणारे माधवराव जाधव, असे एकापेक्षा एक त्यागी सेनानी आपल्या शौर्याने वाचकांना भारावून टाकतात.
 
देशासाठी इंग्रजांची नोकरी सोडून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेणारे बंगळुरूचे स्वातंत्र्यसैनानी नरसिंगराव भांडवलकर, स्वतः महात्मा गांधींनी ज्यांच्या खांद्यावर कार्याची धुरा दिली, ते निपाणीचे स्वातंत्र्यसैनानी हरीनाथ माने, ब्रिटिश रेल्वे रोखून धरणारे औरंगाबादचे जनार्दन गवळी, गुणी शूरवीर बीडचे रामचंद्र यंदे, लातूरचे धाडसी व्यक्तिमत्त्वं रंगनाथ सातपुते अशा अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्यकथा अंगावर रोमांच उभे करतात.
 
उस्मानाबाद, लातूर, बीड, गेवराई इ. मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिक नंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामात मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणपणाने लढले. त्या लढ्याचा इतिहास सोमवंशी सरांनी स्वतंत्रपणे प्रकरणात लिहिला आहे. गेवराई तालुक्यातील टाकळगावचे बाबूराव पिंपळे या नव्वदीच्या वर वय असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या हस्ताक्षरात या पुस्तकासाठी पाठवलेला संदेश मोलाचा आहे. अतुल गेंदले यांचे मुखपृष्ठ त्यागाचा आणि लढ्याचा रंग घेऊन आले आहे. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. बी. पाटील यांची अर्थपूर्ण प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. ’कथा क्षत्रिय शौर्याच्या’ हे पुस्तक सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाच्या अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण योगदान ठळक करणारे आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त असे पुस्तक प्रकाशित होणे ही गोष्ट फक्त विशिष्ट एका ज्ञाती पुरती न राहता, समग्र स्वातंत्र्यलढ्याचे प्रतिनिधित्व करणारी आहे.
 
पुस्तकाचे लेखक : प्रा. एस. व्ही. सोमवंशी
 
- अमृता खाकुर्डीकर
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121