मुंबई : मुंबई आयआयटी विद्यार्थी दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणी एफआयआर दाखल करताना पोलिसांनी छळ केल्याचा आरोप दर्शनच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीकडून एफआयआर दाखल करताना आपल्यावर दबाव आणि छळ केला जात असल्याचा आरोप दर्शनच्या वडिलांनी केला आहे. यासंदर्भांत दर्शनच्या वडिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती देखील केली आहे.
एसआयटीला ३ मार्च रोजी दर्शन सोळंकीने आत्महत्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोटसुद्धा मिळाली. त्यानंतर या सगळ्या प्रकरणांमध्ये जातीभेदाचे मुख्य कारण असल्याचे समोर आले. तशा जबाबानंतर पोलिसांनी या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे दर्शनच्या वडिलांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच पोलिसांनी तयार केलेल्या जवाबानुसार गुन्हा दाखल केला जाणार असून त्यामध्ये जातीभेदाचे कारण काढून टाकण्यात आल्याचे देखील दर्शनच्या वडिलांनी म्हटले आहे. एसआयटीमध्ये नेमले गेलेले पोलीस अधिकारी दर्शनच्या कुटुंबीयाचा छळ करत असून एक प्रकारे दबाव टाकत असल्याचा आरोप दर्शनच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान हा आरोप पोलिसांकडून फेटाळण्यात आला आहे.