मला कळलेले श्रीराम ...

    29-Mar-2023
Total Views | 945
 
हजारो वर्षे भारत रामकथा सांगत आलेला आहे, ऐकत आलेला आहे. विविध भाषांमधून, विविध कलांमधून, चित्रांमधून, शिल्पांमधून, साहित्यातून रामकथा भारताच्या रोमरोमात भिनलेली आहे आणि आता तर अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर होत आले आहे. श्रीराम आदर्श पुत्र होते, आदर्श पती होते, आदर्श शत्रू होते, महापराक्रमी, सर्वश्रेष्ठ असे आदर्श योद्धा होते आणि प्रजाहितदक्ष असे आदर्श राजा होते म्हणूनच आज इतक्या पिढ्या उलटून गेल्या तरी रामकथेचे गारुड आपल्या मनावरून उतरलेले नाही.


ShreeRam - Shefali Vaidya
 
‘रामायण’ मी सर्वांत पहिल्यांदा ऐकलं ते माझ्या आजोबांकडून. गोव्याला आमचं मोठं चौसोपी घर होतं. मला आठवतं तेव्हापासून आजोबा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर चौकीवर शतपावली करायचे, तेव्हा त्यांच्या तोंडी सतत तीन गाणी असत. एक त्यांच्या भावाने लिहिलेले श्री महालसा स्तोत्र, दुसरे मृच्छकटीक नाटकातले ’दारिद्य्राहुनी मित्रा मज ते मरण बरे वाटते’ हे गाणे. हे एकच गाणे त्यांना का आठवायचे, हे मला कधीच कळले नाही.
 
तिसरा श्लोक ते म्हणायचे तो म्हणजे ‘एकश्लोकी रामायण.’ एकाच श्लोकात सांगितलेली संपूर्ण रामकथा. आजोबांच्या तोंडून रोज ऐकता ऐकता हे ‘एकश्लोकी रामायण’ मला तोंडपाठ झालं होतं. अगदी आजही मला रामायण म्हटलं की सर्वात प्रथम मला हात पाठीशी बांधून चौकीवर येरझारा घालणारी आजोबांची उंच, धडधाकट मूर्ती आठवते आणि त्यांच्या खर्जातल्या आवाजातले ‘एकश्लोकी रामायण’च आठवते.
 
आदि राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्।
वैदीहीहरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणम्॥
बालीनिर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरीदाहनम्।
पश्चाद् रावण कुम्भकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्॥
 
पुढे पुढे शब्दांमधली गंमत कळायला लागली, गोष्टीरूप संपूर्ण रामायण, अमर चित्रकथा रामायण वगैरे वेगवेगळ्या रामायणाच्या गोष्टींशी परिचय झाला. तेव्हा, ‘एकश्लोकी रामायण’ अधिकच आवडायला लागला. ऋषी वाल्मिकींचं इतकं मोठं महाकाव्य केवळ एका श्लोकात गुंडाळणारा हा अनाम कवी आजच्या ‘इन्स्टा’ ‘रील्स’च्या 15 सेकंदांच्या जमान्यात नक्कीच शोभला असता!
 
मी गोव्यात कुंकळ्ळीसारख्या एका छोट्या गावात वाढले. आमच्या घराला अगदी चिकटून श्री रामदेव वीर विठ्ठलाचं मंदिर आहे. श्रीराम आणि वीर विठ्ठल ही दोन्ही तिथली उपास्य दैवते. या मंदिराला रामनवमीच्या उत्सवाची 100 वर्षांची परंपरा आहे. रामनवमीला भर दुपारी श्रीरामजन्मोत्सव होतो. बाळ श्रीरामाला पाळण्यात घातले जाते, रामकथा सांगितली जाते, नंतर आठ दिवस नाटके, विविध स्पर्धा, लहान मुलांचा गुणदर्शन कार्यक्रम वगैरे कार्यक्रम होतात. ‘रामनम’ हा आजही आमच्या सर्वांसाठी फार जिव्हाळ्याचा विषय. आमच्या वाड्यावरच्या कित्येक पिढ्यांचा पहिला रंगमंच प्रवेश याच मंचावर झाला. मलाही वक्तृत्व, सभाधीटपणा वगैरे गुण याच मंचाने शिकवले, ही श्रीरामाचीच कृपा म्हणता येईल.
 
पुढे वाचन वाढत गेलं तशा मी अनेक रामकथा वाचून काढल्या. समर्थांचे श्लोक वाचले. ‘दास डोंगरी राहतो’ ही समर्थांच्या आयुष्यावरची गोनीदांची कादंबरी शाळकरी वयातच वाचून काढली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण गीत रामायण ऐकले. ऋषी वाल्मिकींची अद्भुत प्रतिभा, तिचा पूर्ण आदर राखून महाराष्ट्राचे प्रतिवाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या शब्दातून साकार झालेली गीते, सुधीर फडकेंनी दिलेले अत्यंत सुरेल संगीत आणि अनेक मान्यवर गायक-गायिकांनी दिलेला स्वर, या सर्वांचा अलौकिक संगम म्हणजे गीतरामायण, महाराष्ट्राचा एक अमर सांस्कृतिक वारसा. गीतरामायणामुळे मी रामकथेच्या, श्रीरामांच्या, सीतेच्या प्रेमात पडले.
 
आज इतकी वर्षं उलटूनही गीतरामायणातली गाणी आपलीच वाटतात. आयुष्यातल्या एखाद्या कठीण परीक्षेच्या प्रसंगी ‘दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे शब्द हलकेच मनःपटलावरून सरकून जातात आणि धीर येतो. श्रीरामांसारख्या अवतार पुरुषालादेखील वनवास चुकला नाही, सीतेचा वियोग चुकला नाही आणि रावण युद्ध चुकले नाही हे जेव्हा जाणवते, तेव्हा स्वतःच्या आयुष्यातल्या आव्हानांना भिडण्याचे नवीन बळ येते. आजही ’स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती’ हे माझे अत्यंत आवडते गाणे आहे.
 
मध्ये काही काळ असाही होता जेव्हा पश्चिमी स्त्रीवादाशी तोंडओळख झालेल्या मला श्रीरामाचा सीतात्याग अनाकलनीय वाटायचा. पण, नंतर कळत गेले की, आदर्श राजा आणि आदर्श पती या दोन भूमिकांमधल्या झगड्यात श्रीरामांनी ‘आदर्श राजा’ या भूमिकेला जास्त पसंती दिली. आपल्याही आयुष्यात आपण अनेक भूमिका वठवतो, कधी कधी त्या परस्परविरोधीही असू शकतात, अशावेळी काय करायचे, असा प्रश्न सर्वांनाच पडतो, तसा तो श्रीरामांनाही पडला होता आणि त्याचे उत्तर त्यांनी शोधले. अवतारी झाले तरी ते मानवच होते आणि मानवी आयुष्यातले ताणतणाव, कसोटीचे प्रसंग, घ्यावे लागणारे काही अप्रिय निर्णय त्यांनाही चुकले नाहीत.
 
समर्थांच्या भक्तीचे निधान असलेले श्रीराम, तुलसीदासांच्या चौपाईमधून दिसलेले श्रीराम, गीतरामायणातले श्रीराम, रामानंद सागरांचे टीव्हीवरचे ‘रामायण’ मालिकामधले श्रीराम, ‘यक्षगान’ या कर्नाटकी लोकनाट्यात दिसणारे श्रीराम, बालीमधल्या केचक नृत्यात दिसणारे श्रीराम, एका जपानी फिल्ममेकरने अॅ निमेशन चित्रपटात दाखवलेले श्रीराम, भारतभरच्या मंदिरांमधून शिल्पकारांनी मूर्तींमधून दाखवलेले श्रीराम, देशभरच्या नृत्य, संगीत, लोकनाट्य आदी ललितकलांमधून वेळोवेळी भेटलेले श्रीराम, या देशीच्या विणकरांनी वस्त्रात विणलेले श्रीराम, किती म्हणून रूपे सांगावीत श्रीरामांची?
 
हजारो वर्षे भारत रामकथा सांगत आलेला आहे, ऐकत आलेला आहे. विविध भाषांमधून, विविध कलांमधून, चित्रांमधून, शिल्पांमधून, साहित्यातून रामकथा भारताच्या रोमरोमात भिनलेली आहे आणि आता तर अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर होत आले आहे. श्रीराम आदर्श पुत्र होते, आदर्श पती होते, आदर्श शत्रू होते, महापराक्रमी, सर्वश्रेष्ठ असे आदर्श योद्धा होते आणि प्रजाहितदक्ष असे आदर्श राजा होते म्हणूनच आज इतक्या पिढ्या उलटून गेल्या तरी रामकथेचे गारुड आपल्या मनावरून उतरलेले नाही.
 
श्रीरामाच्या आदर्श जीवनाचा भारतीय जनमानसावर उमटलेला खोल ठसा हा कधीही मिटणारा नाही. भारतातल्या प्रत्येक भाषेत आज रामकथा सांगितली जाते. रामलीलेसारखे लोकनाट्यप्रकार आजही हजारो प्रेक्षकांना आकर्षित करतात. केवळ भारतातच नव्हे, भारताबाहेरही थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया आदी अनेक देशांमध्ये रामकथा लोकप्रिय आहे. कारण, श्रीराम हा सर्वसामान्य लोकांसाठी जगणे सुसह्य करणारा, संसारसागरावरच्या भरकटलेल्या तारवांना वाट दाखवणारा दीपस्तंभ आहे.
 
- शेफाली वैद्य
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121