कुंडलिनीशक्ती - ज्ञान-विज्ञान भाग१७

    22-Feb-2023
Total Views | 152
Kundalini Shakti
 
 
मानवी मेंदू एक सर्वोच्च कर्षण यंत्र आहे. विश्वातील अन्यान्य सर्वच प्रक्षेपण त्याद्वारे मानवी मेंदू करू शकतो. आपले कार्य एकच असते आणि ते म्हणजे त्या त्या विषयाचे ध्यान प्रक्रियेद्वारे मेंदूत कर्षण करून त्या त्या दिव्य शक्तींचे ज्ञान देणे होय. विश्वातील अनंत देवाणघेवाण असल्या ध्यान समाधीद्वारे सतत चालत असते. वरून शांत, पण आतून अतिशय वेग, विश्वसंचाराचा त्रिभुवनाचा एकाच क्षणात अनुभवणारा प्रचंड वेग, कवी, कलाकार अन्वेषक आपापल्या विषयातच बुद्धी चालविल्यामुळे तज्ज्ञ असतात. इतर विषयांत ते इतरांसारखे नगण्यच असतात, पण कुंडलिनी जागृत साधकाचे मेंदूतील सर्व बुद्धिकेंद्रे पूर्णत्वाने जागृत झाल्यामुळे कुंडलिनी जागृत साधक सर्वच क्षेत्रात सर्वोच्च असतो.

 
यामुळे प्रत्येक भक्त, योगी अथवा संत उत्तम कवी, कलाकार, तत्त्वज्ञ व बुद्धिमान असतो. त्या त्या गुणावस्था प्राप्त करण्याकरिता त्याला प्रयास पडत नाहीत. विहंग अवस्था आल्यावर आता तो साधक पूर्ण विकसित झालेला असतो. पलीकडील अनंत विश्वाच्या सर्व घडामोडी जाणण्याकरिता तो आता सत्पात्र होतो. म्हणून कुंडलिनी जागृत अवस्था सर्वोच्च अवस्था नसून ज्ञान जाणण्याकरिता ती आवश्यक अशी अवस्था आहे. पलीकडील विशाल ज्ञान प्राप्त करण्याचे ते एक महाद्वार आहे. इतर कवी, कलाकार व गुणिजन त्यांच्या विषयाचे जाणकार असल्याने त्यांची कुंडलिनी शक्ती तेवढ्यापुरतीच जागृत झालेली असते. कधी कधी तर दुर्दैवाने असे पहावयास मिळते की प्राप्त कलेच्या अहंकाराने ते दुर्गुणांच्या नादी लागून अधोगतीच्या मार्गास लागतात. पण त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास ते योग्य साधनेद्वारे इतरांपेक्षा लवकर प्रगती करून भगवान गोपालकृष्णांसारखे सर्वगुणसंपन्न होऊ शकतात. त्याकरिता त्यांना कुंडलिनी जागृतीची साधना करावी लागेल, तरच ते नराचे नारायण बनू शकतील.

कुंडलिनी जागृतीनंतर येणारे दिव्य अनुभव

 
कुंडलिनी जागृतीच्या कालावधीत साधकाच्या शरीरात आमूलाग्र फरक होत असल्याने शारीरिक त्रास होऊन त्याचा साधकाच्या मनोबुद्धीवर किती व्यापक परिणाम होतो, हे आपण पाहिलेच आहे. कित्येक वेळा त्रास व यातना सहन न होऊन साधक आपली साधना अर्धवट सोडून माघारी फिरतो व पूर्वीपेक्षा अधिक अध:पतित होतो असे पाहण्यात आले आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ‘सूज्ञे प्रकट न व्हावे, प्रकट होऊनि नासावे हे विहित नव्हे!’ परंतु, योग्य मार्गदर्शनाखाली नेटाने प्रयत्न केल्यास यातनांचे बंधन झुगारून देऊन साधक प्राप्त दिव्य शक्तींमुळे पलीकडील दिव्य जगताचे दिव्य अनुभव घेऊ शकतो. त्याच्या शरीरातील पेशीपेशीत स्पंदन करणार्‍या गुणाणूंची रचना आदर्श गुणांना धरुन उत्क्रांत झाल्यामुळे तो आता प्राप्त दिव्य शक्तीद्वारे दिव्य अनुभव घेऊ शकतो. त्याच्या शरीरातील योगनाड्या दिव्य प्रवाहस्त्रोताकरिता मोकळ्या झाल्यामुळे साधक आता दिव्य प्रकाश, दिव्य नाद, दिव्य स्पर्श, दिव्य गंध, दिव्य रस, इत्यादी दिव्य अवस्थांचा अनुभव घेऊ शकतो. शरीरातील कुंडल रचना व तिला धरून नाडीशुद्धी झाल्यामुळे साधक असले दिव्य अनुभव घेऊ शकतो.

साधक आता उच्च मानव होऊन पूर्ण योगी होऊ शकतो. तो सूर्य चंद्राचे प्रकाशनाद, तार्‍यांचे दिव्य संगीत, दूरस्थ अस्तित्वांचे नाद, आकाशगंगेतील भव्य दिव्य रचना व नाद कल्लोळ ऐकू शकतो, पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, चव घेऊन त्याचा गंध घेऊ शकतो. एकाच गुणाद्वारे तो पंचगुणांचा अनुभव घेऊ शकतो, चव घेऊन त्याचा गंध घेऊ शकतो. आपल्या प्रत्येक इंद्रियाची क्षमता वाढविल्यामुळे तो हे सहज साध्य करू शकतो. तो तार्‍यांचा नाद, स्पर्श, प्रकाश, रस व गंधही घेऊ शकतो. त्याचे प्रत्येक इंद्रिय प्रत्येक कार्य करू शकते. त्यामुळे असला परमयोगी एकसमयावच्छेदेकरून सर्व गुणांचे ज्ञान एकाच क्षणी घेऊ शकतो.यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसून तो त्याच्या सर्व इंद्रियातील क्षमतेचा गुणविकास आहे. सामान्य जनांना शास्त्र माहित नसल्यामुळे असल्या अतींद्रिय ज्ञानाला ते ‘चमत्कार’ असे म्हणतात. पण, जगात चमत्कार असा नाहीच. दिव्य साधनेद्वारे प्रत्यक्ष अनुभव घेऊन साधक आपली धारणा दृढ करतो. त्यालाच ‘च’ ‘मत’ कार ‘चमत्कार’ असे म्हणतात. ‘च’ म्हणजे दृढ धारणा, ‘मत’ म्हणजे अनुभवसिद्ध मत आणि ‘कार’ म्हणजे अवस्था होय. उच्च अनुभवांची निश्चिती म्हणजेच चमत्कार होत. ते घ्यायचे असतात, दाखविण्यासाठी नसतात. ते अन्य लोकांना दाखविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला ‘बुवाबाजी’ म्हणता येईल.
 
अयोग्य माणसांना आपले दिव्य अनुभव सांगू नयेत असा त्या प्रांतात मान्य असा नियम आहे. असे न झाल्यास अयोग्य माणसे त्यांची टिंगल करतील किंवा त्यांचा व्यापार करतील. ध्यानामुळे प्रत्येक साधकात जन्मत: असलेल्या शक्ती उत्क्रांत होऊन तो दिव्य अनुभवांना पात्र होतो. म्हणून वैदिक परंपरेत ध्यानाला फार महत्त्व आहे. भक्तिमार्गात सुद्धा इष्टदेवतेच्या ध्यानाला फार महत्व आहे. प्रथम इष्टदेवतेचे ध्यान करून मगच मंत्रजप अथवा नामस्मरण करावे असा दंडक आहे. शरीरातील सर्व चेतना एकत्र करण्याच्या प्रक्रियेला ध्यान असे म्हणतात. ‘सर्व शरीरेषु चैतन्यं एकाग्रं इति ध्यानम्’ अशी ध्यानाची परिभाषा आहे. चैतन्य एकाग्र करता आल्यास ध्यान लागते तर ध्यान लागल्यास चैतन्य आपोआप एकाग्र होते. चैतन्य एकाग्र झाल्यास त्या एकतानतेमुळे विश्वातील अनेकानेक अवस्थांशी संबंध येऊन त्या त्या अवस्थांशी एकरूप झाल्यामुळे त्या त्या अवस्थांचे ज्ञान आपणहून होत असते. ज्ञान म्हणजे त्या त्या अवस्थांशी एकरुप होणे अथवा तादात्म्य पावणे होय. असले तादात्म्य पावल्यानंतर साधकाला चमत्कारिक अनुभव येतात. त्यापैकी काही अनुभवांबद्दल प्रत्यक्ष माहिती पाहू.
 
 
दूरदर्शन


सुरुवातीला साधकाला प्रकाशाचे अत्यंत तेजस्वी पुंज दिसतात. त्याद्वारे शक्तीची देवाणघेवाण सुरू होत असते. असले तेजस्वी प्रकाशपुंज सतत नाचत असतात. त्याद्वारे अनेक दिव्य वर्णांची वलये दिसतात. तसले वर्ण पृथ्वीतलावर पाहावयास मिळत नाहीत. कालांतराने हे तेज:पुंज एकत्र येऊन ज्योतीच्या आकारात रूपांतरित होतात. ते इतके तेजस्वी असतात की, त्यामुळे इतर पदार्थ पाहणे अशक्यप्राय होऊन जाते. काहींना यज्ञकुंड दिसू शकेल. त्या यज्ञकुंडातून प्रखर आवाज करीत प्रखर ज्वाला निघताना दिसतात. सरोवरातून हळूहळू वर येणारा सूर्य काहींना दिसतो. काहींना रम्य असा चंद्र ढगामागे लपलेला अथवा त्या ढगाबाहेर येऊन प्रकाशमान होताना दिसेल. असा चंद्रप्रकाश साधकाचे चित्त हरखून टाकतो आणि साधक एका दिव्य आनंदात धुंद राहतो, स्वानंदात मग्न असतो.



-योगिराज हरकरे

(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121