आयटी क्षेत्राचे विस्तारणारे क्षितीज

    16-Oct-2023
Total Views | 76
 E-Commerce

भारताच्या आयटी क्षेत्राने जगभरात आर्थिक मंदी असतानाही महसुलात वाढ नोंदवली आहे. भारतात होत असलेले वाढते ‘डिजिटलायझेशन’, ‘एआय’ तसेच ‘मशिन लर्निंग’चा वाढता वापर आणि ‘ई-कॉमर्स’ क्षेत्राची होत असलेली विक्रमी वाढ आयटी क्षेत्राच्या वाढीला हातभार लावणारी ठरली आहे. त्याविषयी...

गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात जगभरात त्याचे आर्थिक पडसाद उमटले. सर्वाधिक रोजगार कपात अमेरिकेसह युरोपने अनुभवली. भारतीय आयटी कंपन्यांना मात्र सुदैवाने अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले नाही. कार्यालयात पोहोचल्यावर कामावरून कमी करण्यात आल्याचे काहींना सांगण्यात आले, तर काहींना ई-मेलवरून त्याची माहिती देण्यात आली. भारतात त्याची तीव्रता कमी होती. म्हणूनच आजघडीला जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय आयटी क्षेत्राने नोंदवलेली वाढ, ही म्हणूनच उल्लेखनीय ठरते. सर्व उपक्षेत्रांनी दुहेरी महसूल वाढ दर्शवली आहे. डिजिटल परिवर्तन सेवांसाठी असलेली जोरदार मागणी, ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘मशीन लर्निंग’चा वाढता वापर, ‘ई-कॉमर्स’ आणि इतर डिजिटल व्यवसायांची होत असलेली विक्रमी वाढ भारतीय आयटी क्षेत्राच्या वाढीला हातभार लावणारी ठरली आहे.

एका अहवालानुसार, कुशल ‘एआय’ व्यावसायिकांना आयटी क्षेत्रात वाढती मागणी असून, विश्लेषण व्यवस्थापक, डाटा अभियंते, क्लाऊड सिस्टम मॅनेजर आदींसाठी मोठे मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. ‘गेमिंग’, ‘सायबरसुरक्षा’, ‘वेब ३’, ‘ब्लॉकचेन’ यांसारख्या क्षेत्रांची वाढ होत असून, तेथे रोजगार उपलब्ध आहेत; तसेच मागणीही कायम आहे. गेल्या महिन्यात या क्षेत्रात ४५ हजार रोजगार उपलब्ध झाले. टेक क्षेत्र नऊ टक्के वाढीसह आर्थिक वर्षात बंद होईल. गेल्या वर्षीच्या २४५ अब्ज डॉलरच्या तुलनेत ते २४५ अब्ज डॉलर इतकी वाढ नोंद करेल. यंदाच्या आर्थिक क्षेत्रात होत असलेली वाढ आयटी क्षेत्राचा पाया किती मजबूत आहे, हे तर दाखवतेच. शिवाय ते लवचिक असल्याचेही दिसून येते. सध्या काही आव्हानांचा सामना त्याला करावा लागत असला तरी ही स्थिती फार काळ कायम राहणार नाही, असे या अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत आयटी क्षेत्रातील रोजगारात २५ टक्क्यांची घट दिसून येते. तसेच चार प्रमुख कंपन्यांनी तिसर्‍या तिमाहीत केवळ १ हजार, ९४० कर्मचार्‍यांची भर घातली. गेल्या आठ तिमाहीतील ती सर्वात कमी असल्याचे मानले जाते. बहुतेक कंपन्यांनी नवीन भरतीची प्रक्रिया मंद केली असून, लगेचच नोकरी हवी असेल, तर कमी वेतनाचा पर्याय खुला ठेवला आहे, असे असतानाही भारतात टाळेबंदी मोठ्या प्रमाणात होत असल्याचा दावा केला जात आहे. ‘अ‍ॅमेझॉन’, ‘गिटहब’, ‘एक्सेंचर’ या कंपन्यांनी ती लागू केली असली, तरी उपलब्ध रोजगाराच्या तुलनेत हे प्रमाण नगण्य आहे. भारतातील ‘स्टार्टअप्स्’नी पाच हजारांपेक्षा कमी जणांना कमी केल्याचे वृत्त आहे. सहा टक्के कंत्राटी कामगारांनी नोकर्‍या गमावल्या असल्याचे ‘इकोनॉमिक टाईम्स’ने नमूद केले आहे. ‘फोर्ब्स इंडिया’च्या मते, भारतीय आयटी उद्योगाने ५.१ दशलक्ष लोकांना थेट रोजगार दिला असून, सहा महिने या क्षेत्रातील अस्थिरतेचे वातावरण कायम राहणार आहे. जे व्यावसायिक त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी मात्र उज्ज्वल भविष्य असल्याचे, हा अहवाल सांगतो.


भारतातील आयटी उद्योगाचे भविष्यच बदलून टाकणारे, अनेक नवे प्रवाह उदयास येत आहेत. यात ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’, ‘डाटा अ‍ॅनालिटिक्स’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ यांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सायबर धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सायबरसुरक्षा क्षेत्रातील व्यावसायिकांची मागणी वाढली आहे. येत्या काही वर्षांत भारताने डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. म्हणूनच कुशल आयटी व्यावसायिकांची मागणी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

विकसित होणारे क्षेत्र

आयटी हे सतत विकसित होणारे क्षेत्र. म्हणूनच यातील व्यावसायिकांना स्पर्धेत राहण्यासाठी कौशल्ये सतत अद्ययावत करणे आवश्यक आहे. ‘कोडिंग’, ‘डाटा अ‍ॅनालिसिस’ तसेच ‘मशिन लर्निंग’ यांसारख्या कौशल्यांची मागणी वाढणार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही ग्राहकांकडून सायबरसुरक्षा सेवांना मोठी मागणी आहे. गेल्या वर्षभरात भारतातील सायबर सुरक्षा व्यावसायिकांसाठी नोकरीच्या संधी ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यांना वेतनही आकर्षक मिळत आहे. भारतातील सायबरसुरक्षा विश्लेषकाचा सरासरी पगार प्रतिवर्ष ६ लाख, ३३ हजार, ४७० रुपये इतका आहे. अनुभवावर आणि कौशल्यांवर तो वाढू शकतो. तथापि, अन्य आयटी व्यावसायिकांच्या सरासरी वेतनापेक्षा तो अधिक असतो, हे नक्की.भारतातील सायबर सुरक्षा क्षेत्राची व्याप्ती खूप विस्तृत असून, हे व्यावसायिक आयटी, बँकिंग, वित्त, आरोग्यसेवा, तसेच केंद्र सरकारसह विविध उद्योगांमध्ये काम करू शकतात. सुरक्षा विश्लेषक, सुरक्षा अभियंता आणि सुरक्षा आर्किटेक्ट असे काम करण्याची संधी त्यांना मिळते.

व्यवसायांचे वाढते ‘डिजिटायझेशन’, ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ आणि मोबाईल उपकरणांचा वाढता अवलंब यांमुळे नवीन सुरक्षा आव्हाने निर्माण होत आहेत. सायबर हल्ल्यांच्या वाढत्या अत्याधुनिकतेमुळे संस्थांना स्वतःचे संरक्षण करणे अधिक कठीण होत आहे. भारतासह जगभरातील संस्थांसाठी कुशल सायबरसुरक्षा व्यावसायिकांची कमतरता, या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता‘ आणि ‘मशीन लर्निंग’च्या वाढीचा सायबर सुरक्षा क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होत आहे. ‘एआय‘ आणि ‘मशिन लर्निंग’चा वापर नवीन सुरक्षा उपाय विकसित करण्यासाठी आणि विद्यमान सुरक्षा उपायांची प्रभाविता सुधारण्यासाठी केला जात आहे. भारतातील सायबरसुरक्षा क्षेत्राचा येत्या काही वर्षांत विस्तार होणार असून, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या क्षेत्राची व्याप्ती आणि विस्तार पाहता, येथे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. म्हणूनच हे क्षेत्र येत्या काळातही सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र ठरणार आहे.


- संजीव ओक

अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121