‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नेमके काय झाले, कसे झाले, किती प्रमाणात झाले याचे सप्रमाण सादरीकरण भारतीय सैन्यदलाने केल्याने पाकिस्तानची बनवाबनवी संपुष्टात आली. कालपर्यंत थापा मारत विजयाची शेखी मिरवणार्या पाकी पंतप्रधानांचा बुरखा अखेर फाटला. भारताच्या बेधडक कारवाईने पाकिस्तानलाही धडकी भरली असेल, हे नक्की!
भारतीय लष्कर, हवाईदल आणि नौदलाच्या डायरेक्टर जनरल-ऑपरेशन या वरिष्ठ अधिकार्यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेस संबोधित केले. पत्रकार परिषदेच्या प्रारंभीच भारताने पाकिस्तानची कशी दाणादाण उडवली, हे दाखवणारी एक चित्रफीत दाखवण्यात आली. त्या चित्रफितीस पार्श्वसंगीत दिले होते ते, राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘कृष्ण की चेतावनी’ या अजरामर काव्याचे. ‘जब नाश मनुज पर छाता हैं, पहले विवेक मर जाता हैं।’ या ओळींसह भारताने पाकसह संपूर्ण जगाला दिलेला संदेश स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे, यापूर्वी रविवारी सार्वजनिक करण्यात आलेल्या चित्रफितीमध्ये ‘शिवतांडव स्तोत्रा’चे पार्श्वसंगीत होते. त्याविषयी विचारले असता एअर मार्शल एके भारती अगदी सहजपणे म्हणाले की, “विनय न मानत जलधि जड़, गए तीनि दिन बीति। बोले राम सकोप तब, भय बिनु होइ न प्रीति॥”. याद्वारे भारतीय सैन्यदलाने पाकचे कमकुवत लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या जिहादी मानसिकतेवरच मोठा प्रहार केला.
भारताच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत असलेले अनेक दहशतवादी मारले गेले. एकाच रात्रीत अनेक दहशतवादी मॉड्यूलचे प्रमुख नष्ट करण्यात आले. दि. 9 आणि दि. 10 मे रोजीच्या रात्री प्रत्युत्तर देऊन, भारत अण्वस्त्रधारी देशाच्या हवाई दल तळांना लक्ष्य करणारा पहिला आणि एकमेव देश बनला. तीन तासांत नूर खान, रफीकी, मुरीद, सुक्कर, सियालकोट, पसुर, चुनिया, सरगोधा, स्करू, भोलारी आणि जेकोबाबादसह 11 एअरबेसवर हल्ले करण्यात आले. भारतीय सैन्याने आपल्या प्रलयंकारी कारवाईत पाकिस्तानी हवाई दलाच्या 20 टक्के पायाभूत सुविधा नष्ट केल्या. भारताने पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवर हल्ला केला, ज्यामध्ये पाकिस्तानचे स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफ, चार एअरमन आणि इतरांसह 50हून अधिक लोक ठार झाले, तसेच पाकिस्तानची लढाऊ विमानेही उद्ध्वस्त केली.
त्यामुळे ज्या कारणासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ जाहीर करण्यात आले होते, ते दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांना नेस्तनाबूत करण्याचे ध्येय साध्य झाले. पाकिस्तानने या लष्करी कारवाईला आपल्या नागरिकांवरील हल्ला म्हणून वर्णन केले परंतु, पत्रकार डॅनियल पर्लचा मारेकरी आणि इतर दहशतवाद्यांच्या मृत्युच्या बातम्या समोर येताच, जागतिक स्तरावर पाकिस्तानची बदनामी झाली. हेदेखील स्पष्ट झाले की, जर पाकिस्तानने दहशतवादाला पोसण्याचे आणि संरक्षण देण्याचे धोरण सुरू ठेवले, तर भविष्यात त्याच्या समस्या वाढतील. पाकिस्तान आर्थिक आणि अंतर्गत आघाड्यांवर संघर्षरत असताना या अडचणी वाढतील. भारताच्या राजनैतिक रणनीतीचा दुसरा पैलू खूप महत्त्वाचा आहे. पाकिस्तानने लष्करी कारवाईद्वारे केलेल्या चिथावणीला भारत बळी पडला नाही. भारताने आपले अचूक हल्ले सुरूच ठेवून जगाला यशस्वीरित्या संदेश दिला की, भारताची लढाई पाकिस्तानविरुद्ध नाही तर दहशतवादी संघटनांविरुद्ध आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसेल, तोपर्यंत भारत असेच प्रत्युत्तर देईल.
भारताच्या लष्करी कारवाईनंतर, जागतिक पातळीवरही लक्ष देण्याची गरज आहे. पाकिस्तानला सर्वांत मोठा धक्का म्हणजे, एकाही आखाती देशाने त्याच्या समर्थनात आवाज उठवला नाही. 1998 साली पोखरण येथे झालेल्या अणुचाचणीनंतर सौदी अरेबियापासून इराणपर्यंत अनेक इस्लामिक देश, त्याच्या समर्थनार्थ उभे राहिले. सौदीने चाचणी होईपर्यंत पाकिस्तानला दररोज 50 हजार बॅरल तेल मोफत देण्याची घोषणाही केली होती. आता, भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर, तुर्की वगळता एकही इस्लामिक देश त्याच्या समर्थनार्थ उभा राहिला नाही. उलट, रशियासह इतर पाश्चात्य देश प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भारताच्या समर्थनात उभे राहिल्याचे दिसून आले.
राहता राहिला प्रश्न अमेरिकेचा. पाकने अमेरिकेद्वारे भारतास प्रस्ताव पाठवला तर खरा. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांना योग्य त्या शब्दांत भारताची भूमिका समजावून सांगितली. अर्थात, रशिया-युक्रेन, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात ट्रम्प यांनी काय केले ते जगासमोर आहेच. त्यामुळे आता भारत-पाक संघर्षात तरी काहीतरी करून दाखवतो, या उतावीळपणातून शस्त्रसंधी झाल्याचे ‘ट्विट’ केले आणि पाकने त्यांना अवघ्या तीनच तासांत तोंडघशी पाडले. त्यानंतरही त्यांनी काश्मीर प्रश्नातही मध्यस्थी करतो, अशी दर्पोक्ती केली. यावरून त्यांना केंद्र सरकारच नव्हे, तर भारतातल्या विरोधी पक्षांनीही झोडपून काढले. ट्रम्प यांच्या श्रेयवादाची उरलीसुरली हवा भारतीय सैन्यदलांच्या पत्रकार परिषदेतून निघून गेली.
भारताच्या कृतींमुळे रणनीतीमध्ये प्रतिसादाच्या सिद्धांताचे रूपांतर निर्णायक कृतीच्या सिद्धांतात झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’ने लक्ष्मण रेखा निर्माण केली आहे, जी पाकिस्तान आता दुर्लक्ष करू शकत नाही. जर दहशतवादाला राज्य धोरण बनवले तर त्याला थेट, मजबूत आणि दृश्यमान उत्तर मिळेल. पहिल्यांदाच भारताने दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांच्यात कोणताही फरक करण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि दोघांविरुद्ध एकाच वेळी कारवाई केली. यामुळे पाकिस्तानातील त्या जिहादी घटकांचे स्वातंत्र्यदेखील संपुष्टात आले, जे आतापर्यंत कोणत्याही भीतीशिवाय दहशत पसरवत होते. त्याचप्रमाणे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई संरक्षणाला पूर्णपणे ठप्प केले. अवघ्या 23 मिनिटांत केलेल्या अचूक आणि जलद कारवाईने, पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचा पर्दाफाश झाला. ‘राफेल’ लढाऊ विमानांच्या ‘स्काल्प’ क्षेपणास्त्र आणि ‘हॅमर’ बॉम्बमुळे, कोणतेही नुकसान न होता मोहीम पूर्ण केली, ज्यामुळे भारताची तांत्रिक आणि सामरिक धार सिद्ध झाली. धक्कादायक म्हणजे इस्लामाबाद ते कराची असा पाकचा कणाच तोडण्याचे काम भारताने केले आहे.
भारताच्या या नव्या रूपाचे वर्णन करायचे झाल्यास, राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ओळीच चपखल आहे,
हरि ने भीषण हुंकार किया,
अपना स्वरूप-विस्तार किया,
डगमग-डगमग दिग्गज डोले,
भगवान् कुपित होकर बोले
जंजीर बढ़ा कर साध मुझे,
हाँ, हाँ दुर्योधन! बाँध मुझे।