‘अग्नी-५’ ची यशोगाथा

    16-Dec-2022   
Total Views | 80
'Agni-5'


अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमधील संघर्षामुळे दोन्ही देशांतील तणावात वाढ झाली आहे. याचदरम्यान भारताने आपले सर्वात मोठे महाअस्त्र आंतरखंडीय बॅलिस्टीक मिसाईल ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची यशस्वी नाईट ट्रायल करून चीनसह संपूर्ण जगाला भारत प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार असल्याचा संदेश दिला. परिणामी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सशक्त आणि सक्षम भारताला दुबळे समजण्याची हिंमत आता चीन करणार नाही. त्याचे कारणही स्पष्ट आहे, भारताने संरक्षण क्षेत्रात जोरदार विकास केला आहे. अन्य मित्र देशांच्या सहकार्यानेच नव्हे, तर भारत स्वतःच्यापायावरही संरक्षण क्षेत्रात सातत्याने सशक्त होत चालला आहे.


गुरुवार, दि. १५ डिसेंबरच्या रात्री केल्या गेलेल्या परीक्षणात पहिल्यांदा ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राला त्याच्या पूर्ण क्षमतेने डागण्यात आले. म्हणजे, ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राने आपले लक्ष्य ५ हजार ५०० किमी अंतरावर पोहोचत उद्ध्वस्त केले. या क्षेपणास्त्राला ‘डीआरडीओ’ आणि ‘भारत डायनामिक्स लिमिटेड’-‘बीडीएल’ने संयुक्तपणे तयार केले आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे हा मुद्दा नसून चीन आणि इतरही अनेक देशांना आपले संपूर्ण क्षेत्रफळ या क्षेपणास्त्राच्या पल्ल्यात आल्याची भीती वाटत आहे. कारण, भारताने ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्र डागल्यास त्याद्वारे संपूर्ण आशिया, युरोपचा काही भाग, युक्रेन, रशिया, जपान, इंडोनेशियापर्यंत हल्ला केला जाऊ शकतो.

‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ‘एमआयआरव्ही तंत्रज्ञान-मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एन्ट्री व्हीकल्स’. या तंत्रज्ञानात क्षेपणास्त्राच्या वर लावल्या जाणार्‍या वॉरहेडची संख्या वाढवली जाऊ शकते. म्हणजेच, एक क्षेपणास्त्र एकाचवेळी कित्येक लक्ष्यावर हल्ला करू शकते. ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे, ते २९ हजार ४०१ किमी प्रतितास वेगाने शत्रूवर हल्ला करते. यात ‘रिंग लेझर गायरोस्कोप इनर्शियल नेव्हीगेशन सिस्टीम’, ‘जीपीएस’, ‘एनएव्हीआयसी सॅटेलाईट गायडन्स सिस्टीम’ लावण्यात आली आहे. ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्र लक्ष्यावर नेमकेपणाने हल्ला करते. लक्ष्य आपल्या जागेवरुन १० ते ८० मीटरपर्यंत सरकले तरी ते ‘अग्नी-५’च्या हल्ल्यापासून वाचू शकत नाही.

‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राचे वजन ५० हजार किलो असून त्याची लांबी १७.५ मीटर आहे, तर व्यास दोन मीटर म्हणजे ६.७ फूट आहे. त्यावर १५०० किलो वजनाची आण्विक शस्त्रे लावली जाऊ शकतात. या क्षेपणास्त्रात तीन टप्प्याचे रॉकेट बूस्टर असून ते ‘सॉलिड फ्युएल’द्वारे उड्डाण करतात.‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा २४ पट अधिक आहे. म्हणजेच, ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्र एका सेकंदात ८.१६ किमी अंतर पार करते. ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणासाठी मोबाईल लॉन्चरचा वापर केला जातो. भारताने आतापर्यंत या क्षेपणास्त्राचे आठवेळा यशस्वी परीक्षण केले आहे. ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राचे पहिले यशस्वी परीक्षण दि. १९ एप्रिल, २०१२ रोजी झाले. त्यानंतर दि. १५ सप्टेंबर, २०१३, दि. ३१ जानेवारी, २०१५, दि. २६ डिसेंबर, २०१६, दि. १८ जानेवारी, २०१८, दि. ३ जून, २०१८, दि. १० डिसेंबर, २०१८ आणि दि. २७ ऑक्टोबर, २०२१ रोजी ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. या परीक्षणात क्षेपणास्त्राची विविध मानकांवर तपासणी करण्यात आली. त्यातून शत्रुला नेस्तनाबूत करण्यासाठी ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्र उत्तम हत्यार असल्याचे दिसून आले.

‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी परीक्षणावरून देशाची सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याबरोबरच मोदी सरकार संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’लादेखील प्रोत्साहन देत असल्याचे दिसते, जेणेकरून आत्मनिर्भर आणि सुरक्षेबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल. त्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्या गोष्टी कधीकाळी अशक्य वाटत होत्या त्याही आता ‘मेक इन इंडिया’अंतर्गत शक्य होत आहे. दि. २३ डिसेंबर, २०२१ रोजीदेखील भारताने अशाचप्रकारे इतिहास रचला. भारताने २४ तासांच्या आत सलग दुसरे अर्ध बॅलिस्टीक मिसाईल ‘प्रलय’चे ओडिशाच्या किनार्‍यावरील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी परीक्षण केले. याव्यतिरिक्त संपूर्णपे स्वदेशात तयार केलेल्या हाय-स्पीड एक्पांडेबल एरियल टारगेट-अभ्यासचेदेखील यशस्वी परीक्षण केले. अशाप्रकारे भारताच्या इतिहासात प्रथमच २४ तासांच्या आता दोन बॅलिस्टीक मिसाईल्सचे यशस्वी परीक्षण झाले.









महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121