मुंबई(प्रतिनिधी): अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावातील कळसुबाई पर्वत रांगेत वसलेल्या रतनगडावरील गर्दीवर (ट्रेकिंग) आता चाप बसणार आहे. महसूल व वन विभागाने काढलेल्या सूचनेनुसार रतनगडावर गर्दी टाळण्यासाठी शनिवार-रविवार केवळ ३०० पर्यटकांना रतनगडावर जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असल्यामुळे या गडावर अनियंत्रित गर्दी झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी या बाबतचे परिपत्रक जाहीर केले आहे.
रतनगडावर येणाऱ्या पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले होते. स्थानिक वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले. यामुळे शनिवार रविवार रतनगडावर केवळ ३०० पर्यटकांना जाता येणार आहे. या साठी शेंडी व भंडारधारा चेक पोस्ट येथून पर्यटन शुल्क पावतीवर क्रमांकाचा शेरा देऊन पर्यटकांना सोडण्यात येणार आहे. कोणतेही पर्यटक नियमांचे उल्लघन करताना आढळून आल्यास त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम (१९७२) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. वन विभागाकडून स्थानिक पातळीवर लोकांमध्ये संरक्षणाच्या दृष्टीकोनातून जन जागृती करण्यात येणार आहे.
“कारवीचा मौसम सध्या सह्याद्रीत सर्वत्र बहरल्यामुळे पर्यटकांची जत्रा कारवी साठीच प्रसिद्ध असलेल्या व सध्या रिल्स मुळे चर्चेत आलेल्या रतनगडावर भरत आहे. नवख्या ऑर्गनायझर्सने शेकड्यांनी आणलेले सदस्य तसेच एकमेकांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव ह्यामुळे आधीच चिंचोळा मार्ग व मर्यादित "कॅरिंग कॅपसिटी" असलेल्या रतनगडावर अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक वनविभाग तसेच स्थानिक प्रशासनाने व्यवस्था लावूनही त्यांना जुमानले जात नाही व वादाचे प्रसंग निर्माण होतात. गर्दी टाळण्यासाठी वनविभागाने घेतलेला हा निर्णय अतिशय स्तुत्य असून इथून पुढे दरवर्षी पहिल्या दिवसापासूनच अश्या प्रकारच्या निर्णयांची अतिशय कडक अंमलबजावणी व्हावी.” -ओंकार ओक, गिर्यारोहक व रेस्क्यू समन्वयक