डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी : राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेचे प्रेरणास्थान

    22-Jun-2021
Total Views | 133

shyamprasad mukhrjee_1&nb


भारतमातेच्या स्वातंत्र्यानंतर हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे, राष्ट्रीय एकात्मता व अखंडता जपणे व वैविध्याने नटलेल्या या भारतमातेला एक राष्ट्र म्हणून एकसंध ठेवणे, यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिलेले मोलाचे योगदान महत्त्वाचे आहे.


डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म कोलकाता येथे दि. ६ जुलै, १९०१ रोजी झाला. लहानपणापासूनच शिक्षणात प्राविण्य मिळविणार्‍या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सरस्वतीमातेचीच सेवा करण्याचा दृढनिश्चय केला होता. त्यामुळे इंग्लंड येथे ‘बॅरिस्टर’चे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या श्यामाप्रसादजींनी यांनी तेथील शिक्षणप्रणालीचा अभ्यास केला व त्यानुसार भारतीय शिक्षणप्रणालीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ते भारतात परत आले. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी ते कोलकाता विश्वविद्यालयाचे कुलगुरू बनले. ही खूप अभिमानाची बाब होती.

शिक्षण क्षेत्रात कार्य करून सामाजिक सुधारणा घडवू इच्छिणार्‍या श्यामाप्रसाद मुखर्जी यांची खरी गरज ही राजकारणात अधिक आहे, हे जणू खुद्द नियतीनेच ठरवले होते. तत्कालीन पश्चिम बंगालमधील हिंदू समाजाची परिस्थिती पाहता, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राजकारणातील आगमन हे किती निकडीचे होते, याचा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही. ब्रिटिशांच्या साहाय्याने मुस्लीम लीगकडून हिंदू जनतेवर प्रचंड अन्याय-अत्याचार केला जात होता. मूलभूत हक्कही हिंदू जनतेला नाकारले जात होते. हिंदू समाजाची ही वाताहत थांबविण्यासाठी एन. सी. चॅटर्जी, आशुतोष लिहाडी, जस्टिस मन्मथनाथ मुखर्जी आणि ‘भारत सेवाश्रम संघा’चे संस्थापक स्वामी प्रणवानंद महाराज यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना सक्रिय राजकारणात उतरण्यासाठी प्रोत्साहित केले.

राजकारणात प्रवेश केल्यावर अल्पावधीतच श्यामाप्रसाद मुखर्जी हे ‘राष्ट्रीय नेते’ म्हणून ओळखले जाऊ लागले. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सुद्धा श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रखर राष्ट्रवादी व विचाराने प्रभावित झाले होते. त्यामुळेच “पंडित मदन मोहन मालवीय यांच्यानंतर हिंदू समाजाचे नेतृत्व करण्यासाठी तुमच्यासारख्या नेत्यांची देशाला गरज आहे,” अशा शब्दांत त्यांनी डॉ. मुखर्जी यांची प्रशंसा केली होती. एवढेच नव्हे, तर महात्मा गांधी यांच्या आग्रहाखातर स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला होता.

हिंदू समाजाचे नेतृत्व करणारे नेते या नात्याने जरी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे राजकारणात आले असले तरी हिंदू जनतेच्या न्याय्य हक्कासाठी मुस्लीम वा इतर धर्मीय बांधवांवर अन्याय होईल, असे कोणतेच निर्णय किंवा धोरण त्यांनी राबविले नव्हते. राजकारणातील त्यांचा उद्देश व विचार हा स्वच्छ होता. पश्चिम बंगालमध्ये तत्कालीन मुस्लीम लीग सरकार शिक्षण क्षेत्रातही धार्मिक राजकारण करून अनागोंदी माजवण्याचा प्रयत्न करत होती. माध्यमिक शिक्षणव्यवस्था कोलकाता विश्वविद्यालयाच्या नियंत्रणाखाली होती, ती मुस्लीम लीगच्या अधिपत्याखाली आणून हिंदू जनतेला शिक्षण क्षेत्रापासून वंचित ठेवण्याचा मुस्लीम लीगचा विचार होता. मात्र, आपले जीवन सरस्वतीमातेच्या चरणी अर्पिलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना हे कदापी मान्य होणारे नव्हते. ते शांत बसले नाहीत. त्यांनी या प्रश्नावर जनजागृती केली. काँग्रेसी नेत्यांना आपली भूमिका पटवून दिली त्यांचे समर्थन मिळविले. रस्त्यावर आंदोलने उभी केली, तर विधीमंडळात संवैधानिक पद्धतीने आपली बाजू मांडून मुस्लीम लीगचा शिक्षणाला धार्मिक रंग देण्याचा हा मनसुबा हाणून पाडला. या घटनेनंतर आत्ताच्या ढाका शहरात हिंदू बांधवांचे मोठ्या प्रमाणावर हत्यासत्र सुरू झाले. त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या जीवाची बाजी लावून अवैधरित्या ढाक्यामध्ये प्रवेश करून तेथील तत्कालीन नवाब यांना भेटून हिंदूंचा नरसंहार थांबविण्यातही यश मिळविले. तसेच शिक्षणासारख्या क्षेत्राचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी लढा दिला.

त्यानंतर १९४१ साली बंगालमध्ये कृषक प्रजा पार्टी व काँग्रेसची सत्ता आली. या सत्तेमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे एकमेव हिंदू नेते होते. या कॅबिनेटची कार्यप्रणाली जनमानसात एवढी लोकप्रिय झाली की ‘श्यामा-उल’ या नावानेच या कॅबिनेटला ओळखले जाऊ लागले. या सत्ताकाळात हिंदूंवरील अत्याचार थांबले. जो न्याय, जो व्यवहार मुस्लीम व्यक्तीसोबत केला जायचा, तोच व्यवहार हिंदू बांधवांसोबत केला जाऊ लागला. एक आश्वस्तता हिंदू समाजामध्ये येऊ लागली. हिंदू बांधवांना त्यांचे न्याय्य हक्क मिळू लागले. मुस्लीम समाजामध्येसुद्धा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याप्रति आदर वाढला. आपले नेते, मुस्लीम समाजाचे हिंतचिंतक अशी भावना मुस्लीम बांधवामध्ये रूजू होऊ लागली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या या कार्यपद्धतीमुळे बंगालसारख्या राज्यात हिंदू-मुस्लीम समाजातील ऐक्य दिसून येऊ लागले. प्रथमच ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीला तडा गेला होता. ब्रिटिशांसह मुस्लीम लीग नेत्यांना, समाजकंटकांनाही अपयश आले होते. मात्र, हिंदू -मुस्लीम समाजातील हे ऐक्य पाहता तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर हर्बर्ट यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून हे मंत्रिमंडळ बरखास्त केले.
या एका वर्षाच्या कार्यकाळावरून हे लक्षात येते की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे केवळ हिंदुत्वासाठी लढत नव्हते, तर भारतमातेच्या ऐक्यासाठी, एकात्मतेसाठी ते लढत होते. मतांच्या राजकारणासाठी, स्वार्थासाठी त्यांनी कधी धर्माचे राजकारण केले नाही.

‘प्रखर राष्ट्रवादी विचाराचे नेते’ अशीही डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची ओळख होती. भारताच्या फाळणीला त्यांनी कडाडून विरोध केला. राष्ट्रीय पातळीवर जरी भारत-पाकिस्तान अशी धर्माच्या आधारावर झालेली फाळणी जरी त्यांना रोखता आली नाही तरी बंगालच्या अखंडतेसाठी त्यांनी सर्वातोपरी लढा दिला आणि कोलकात्यासह हिंदूबहुल प्रदेश भारताशी जोडून ठेवण्यात जी लढाई ते लढले त्यात त्यांनी यशही मिळवले.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनात भारतमातेच्या अखंडतेसाठी अति महत्त्वाची लढाई ठरली ती म्हणजे काश्मीरची. १९५२ साली पंतप्रधान नेहरू यांनी काश्मीरला विशेषाधिकार देण्याच्या नावाखाली वेगळे संविधान आणि वेगळा झेंडा उभारण्याचे स्वातंत्र्य दिले. भारतमातेचे हे अशा प्रकारे संविधानाचे तुकडे पडणे भविष्यासाठी धोक्याचे आहे, हे डॉ. मुखर्जी यांनी वेळीच ओळखले. एकाच देशात दोन संविधान आणि तिरंग्याशिवाय दुसरा झेंडा चालणार नाही. काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. भारताचे तुकडे पडू देणार नाही, अशी जहाल भूमिका घेत डॉ. मुखर्जींनी काश्मीरसाठी आपला लढा उभारला. या लढ्यात भारतमातेचा शिरोमणी असलेल्या, स्वर्गनंदनवनातच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी वीरमरण आले.

भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले बलिदान दिले. मात्र, याच स्वतंत्र भारतमातेचे अखंडत्व, एकात्मता टिकविण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपले बलिदान दिले, हे कदापि विसरता येणे शक्य नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात भारतीय तरूण जागतिक पातळीवर आपले अस्तित्व उभे करू इच्छितो. अशावेळी प्रांतवाद, धार्मिकवाद करण्याऐवजी एक भारतीय, भारतमातेचे पुत्र म्हणून राष्ट्रप्रेमाची ज्योत शालेय जीवनापासूनच पेटवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जात, धर्म, प्रांत यांच्या पल्याड जाऊन देशाच्या एकात्मतेसाठी झटणार्‍या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवन हे नेहमीच प्रेरणादायी ठरेल.

-  फ्रेडी डिकोस्टा-गोन्सालविस


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121