साधारण पाणी आणि जड पाणी

    29-Mar-2021
Total Views | 770

water level_1  


मागील लेखांमधून पाणी किती प्यावे, कधी प्यावे, जास्त प्यायल्यास होणारे त्रास इत्यादीची माहिती आपण जाणून घेतली. आज आपल्या घरात, शहरात येणारे पाणी कसे आहे व त्याचे फायदे-तोटे, हे समजून घेऊया.


आपण सर्वांनाच माहीत आहे की, जड पाणी असल्यास भांड्यांवर, नळांवर एक पांढरा थर चढत जातो. कपड्याच्या साबणाला, भांड्यांच्या साबणाला, अंगाच्या साबणाला जास्त फेस येत नाही. ते का? व आपण वापरतो ते पाणी कसं आहे, त्याचे परीक्षण कसे करावे, याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊया. प्रत्येक अन्नघटकाचे विशिष्ट ‘pH’ (सामू) असते, तसेच पाण्याचे ही ठरावीक ‘pH’ आहे. ‘pH’ म्हणजे ‘पॉवर ऑफ हायड्रोजन’ किंवा ‘पॉटेन्शियल ऑफ हायड्रोजन’. जेवढे एखाद्या पदार्थामध्ये ‘H+’ अधिक असतील, तेवढे ते जास्त ‘अ‍ॅसिडिक’ होते व त्याचे ‘कि’ कमी असते. ‘कि’ तीन प्रकारचे असते. अ‍ॅसिडिक -० ते ७, न्यूट्रल-७ आणि अल्केलिन- ७ ते १४. आपल्या शरीराचे सर्वसाधारण ‘pH’ ७.३५-७.४५ इतके असते. यापेक्षा कमी-अधिक झाल्यास, कालांतराने शरीराला अपाय होऊ शकतो. आपला आहार व पाणी हे सर्व शरीराला सात्म्य होण्यासाठी, ‘pH’चा समतोल राखणे अतिशय गरजेचे आहे. सर्वसामान्य पाण्याचा ‘pH’ ७ असतो. पण, जड पाणी असल्यास त्याचे ‘pH’ अधिक असते. पाण्याचे ‘pH’नुसार मुख्यतः दोन प्रकार होतात (सॉफ्ट वॉटर) साधारण पाणी (हार्ड वॉटर) जड पाणी. पुणे, सातारा व मध्य महाराष्ट्रातले पाणी थोडे जड असते व मुंबईसह कोकण प्रांतातील पाणी साधारण (सॉफ्ट) असते, असे आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. आपले पाणी जड आहे की साधारण, याच्या दोन प्रकारे परीक्षा करता येतात.

 
१) साबण व पाणी एकत्र घेऊन चोळावे, त्याचा व्यवस्थित फेस आला, तर ते साधारण पाणी आहे असे समजावे. पण, जर त्याचा फेस खूप झाला नाही किंवा अजिबातच झाला नाही, तर त्याला ‘जड पाणी’ म्हणावे.
२) जड पाण्यात कणीक भिजवली, ती तिंबवली (विशेषत: ‘बेकिंग’साठी कणीक तिंबवावी लागते, अशा वेळेस अधिक जाणवते.), तर ती जास्त फुलत नाही, तिंबत नाही. कणिक कालांतराने थोडी जड व कडक होते. साधारण पाण्यामध्ये असे होत नाही. किंबहुना, कणीक थोडी चिकट होते.
३) जड पाणी व साधारण पाण्याच्या चवीतही फरक असतो. जड पाण्यात अधिक प्रमाणात खनिज द्रव्ये असल्याकारणाने त्या खनिज द्रव्यांची थोडी चव पाण्यात उतरते. या उलट साधारण पाणी तसे बेचव असते. क्वचित प्रसंगी थोडे खारटसर लागू शकते. असे का? जड पाण्यात असे काय असते? व जड आणि साधारण पाणी असे प्रकार कसे पडतात? पावसाचे पाणी जेथे पडते, तिकडच्या डोंगर-दर्‍यांशी, दगडांशी त्या पाण्याचा संपर्क येतो. तसेच उन्हाळ्यात बर्फ वितळून त्याचे पाणी होते व ते झरे होऊन विविध नद्यांमधून मिसळतात आणि वाहू लागतात. ज्या दगडांशी मातीशी, नदीशी व विहिरींशी पाण्याचा संपर्क येतो, त्यातील खनिज द्रव्ये त्या पाण्यात मिसळतात. काही विरघळतात (Soluble) व काही नुसतीच त्या पाण्यात राहतात (Insoluble).


जेवढे पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक, तेवढे ते पाणी जास्त जड होते. कॅल्शियम व मॅग्नेशियम हे ‘कार्बोनेट्स’, ‘बायकार्बोनेट्स’ आणि ‘सल्फेट्स’ या स्वरूपात खनिज द्रव्यांमधून पाण्यात आढळतात. यातील कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण पाण्यात किती आहे, त्यावर ते पाणी साधारण आहे का जड आहे, ते ठरते. साधारणपणे, १० -५० ppm हे पाणी साधारण (सॉफ्ट) असते. ५०-१००ppm हे Slightly Hard Water असते. १०० -२००ppm हे ‘हार्ड वॉटर’ आहे आणि 200ppm वर 'very hard’ पाणी आहे असे समजावे. हे पाणी पिता येत नाही. खनिज द्रव्यांच्या चवीमुळे पाणी पिण्याचे समाधान व तृप्ती मिळत नाही, तहान भागत नाही ppm - Parts per million).जड पाणी साधारण करण्यासाठी सगळ्यात साधा, सोपा उपाय म्हणजे पाणी उकळविणे. उकळताना पाण्यातील कॅल्शियम कार्बोनेट हे खनिज उडून जाते व पाणी साधारण होते. पण, काही वेळेस पाण्यात जर कॅल्शियम सल्फेटचे प्रमाण अधिक असले, तर ते उकळवूनही साधारण होत नाही. अशा पाण्याला ‘परमनंट हार्ड वॉटर’ म्हणावे व ते पिण्यास वापरू नये. पावसाचे पाणी जमिनीवर पडून त्यातील खनिज द्रव्ये वाहून जातात व म्हणून ते पाणी अधिक ‘सॉफ्ट’ असते. आपण असे म्हणू शकतो की, जेवढे पाणी जड, जेवढे त्यात खनिज द्रव्ये अधिक, तेवढे ते पाणी अधिक ‘अल्केलिन’ होय. या विपरीत, जेवढे पाणी साधारण (सॉफ्ट), जेवढे त्यात खनिज द्रव्ये कमी, तेवढे ते पाणी ‘अ‍ॅसिडिक’ होय. पिण्यासाठी योग्य पाणी हे ७ ‘pH’च्या आसपास असावे. खूप जास्त व कमी ‘pH’ शरीरास बाधक आहे.

जड पाणी शरीराला कसे अपायकारक आहे? तर १० ते १००ppm म्हणजेच ‘स्लाईटली हार्ड वॉटर’ हे तसे खूप अपायकारक नाही. पण, त्यापेक्षा अधिक जड पाणी शरीराच्या संपर्कात आले की, विशेषतः त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी बाधाकर ठरते. जड पाण्याने त्वचा व केस दोन्हीही कोरडे व रुक्ष होतात. साबणाचा फेस कमी होतो/होत नाही, अशा वेळेस त्यातील काही कण त्वचेच्या रंध्रांमध्ये अडकून, त्वचेवर खाज उत्पन्न होते. काही वेळेस त्वचा जळजळते. त्वचा कोरडी पडते, काळवंडते व रोमरंध्र बंद झाल्याने तारुण्यपीटिका व ’एलूशार’ सारख्या त्वचा विकारांचे प्रमाण वाढते. पाण्यातील खनिज द्रव्यांमुळे त्वचेचेही ‘कि’मध्ये असंतुलन होऊन त्वचेचे संरक्षण करण्याचे कार्य बिघडते. विविध जंतूंपासून व ‘इन्फेक्शन्स’पासून त्वचा नीट संरक्षण देऊ शकत नाही. परिणाम, विविध त्वचाविकार वाढतात. त्याचबरोबर डोक्यावरही खाज व कोरडेपणा येऊन केस लवकर गळू लागतात, पिकू लागतात. त्वचेचा व केसांचा पोत बिघडू शकतो.अचानक, शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जर शहर/गाव सोडून इतर ठिकाणी जावे लागले व तिथे जड पाणी असल्यास सुरुवातीला ते पचत नाही व वारंवार पोटदुखी, जुलाब इ. त्रास बळावतात. हे सगळं टाळण्यासाठी जड पाणी उकळवूनच पिण्यास व जमल्यास अंघोळीसाठी वापरावे.


(क्रमश:)
-वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121