संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि निवडणुका

    27-Mar-2021
Total Views | 414

eY _1  H x W: 0
 

 
 
आचार्य अत्रे, एस. एम. जोशी आणि कॉम्रेड डांगे अशा मोठ्या नेत्यांनाही महाजनांच्या उदार हिंदुत्ववादी विचारांनी जिंकले होते. कोणी शत्रू निर्माण न करता, या मुरब्बी नेत्यांमध्ये त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. महाजनांचे स्पष्ट विचार आणि स्वच्छ आचार या गुणग्राही नेत्यांना पटत होते. मुंबईतील जनसंघाचे पहिले उमेदवार म्हणून मधुकरराव महाजन यांचे नाव निश्चित झाले. जनसंघातही महाजनांना एखादा अपवाद वगळता सर्व नेत्यांचा व संघश्रेष्ठींचा पाठिंबा होता.
 
 
भारतीय जनसंघाचे मुंबई भागाचे पहिले संघटनमंत्री होते मधुकरराव महाजन. अवघ्या तिशीतच महाजनांवर ही जबाबदारी दिली गेली आणि मुंबईतील जनसंघाचे सर्वाधिक लोकप्रिय, प्रभावी आणि कल्पक नेते म्हणून त्यांना फार लवकर मान्यताही मिळाली. भारतीय जनसंघ हा राजकीय पक्ष आहे. त्याचे कार्यक्षेत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा वेगळे आहे, हे महाजनांच्या मनात अगदी स्पष्ट होते. येथे अधिक लोकाभिमुख राहिले, तर मतांमध्ये त्याचे पर्यवसान होईल आणि सत्तासंपादन हे आपले अंतिम ध्येय साध्य होईल, हे लक्षात घेऊन ते पक्षबांधणी करीत होते. दादरा-नगरहवेली मुक्ती संग्रामात संघाच्या सहकार्याने जनसंघाने मुसंडी मारली होतीच. गोवा विमोचन आंदोलनामुळे जनसंघाचे अस्तित्व ठळकपणे लोकांच्या लक्षात आले. हे आंदोलन चालू असतानाच, स्वातंत्र्य आंदोलनानंतर व्यापक लोकसमर्थन असणारी चळवळ म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली.
 
 
भाषावार प्रांतरचना होऊन स्वतंत्र मराठी राज्य स्थापन व्हावे, अशी इच्छा मराठी लोकांनी वारंवार स्पष्ट केली होती. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातमधील सौराष्ट्रासह विशाल द्वैभाषक राज्य बनवावे, असा ‘फाजल अली आयोगा’चा अहवाल १९५५ मध्ये प्रसिद्ध झाला. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातसह जोडून घ्यावे, असा विचार त्यामागे होता. मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दि. २० नोव्हेंबर, १९५५ रोजी या द्वैभाषकाला पाठिंबा देणारे प्रक्षोभक भाषण केले. त्यामुळे मराठी जनतेने चिडून २१ नोव्हेंबर रोजी, मुंबईत निषेधार्थ मोर्चा काढला. त्याच वेळी या नि:शस्त्र आंदोलकांवर सरकारने बेछूट गोळीबार केला. या मुंबईच्या प्रश्नावरून महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. ६ फेब्रुवारी रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. काँग्रेस विरुद्ध समाजवादी, शेकाप, कम्युनिस्ट, हिंदू महासभा आणि भारतीय जनसंघ असे भिन्न विचारांचे सर्व राजकीय पक्ष एकत्र आले.
 
जनसंघाचे भाषिक धोरण
 
भारतीय जनसंघ, हा अखिल भारतीय पक्ष रा. स्व. संघाच्या प्रेरणेतून निघाला होता. भाषावार प्रांतरचनेला संघाचा पूर्ण विरोध होता. संघाच्या मते पूर्वांचल, पश्चिमांचल, दक्षिणांचल आणि उत्तरांचल असे देशाचे फक्त चार भाग असावेत. चार दिशांना असणारे ते ते प्रदेश त्या आंचलात येतील. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेणे म्हणजे संघाच्या धोरणाच्या विरुद्ध जाणे. मधुकरराव महाजन हेच त्यावेळी मुंबईचे प्रमुख नेते होते. दहा वर्षे संघामध्ये प्रचारक म्हणून काम केलेल्या मधुकररावांची दूरदृष्टी, धडाडी आणि सर्वसमावेशक विचार लक्षात घेऊनच संघाने त्यांच्यावर जनसंघ उभारणीची मोठी जबाबदारी सोपवली होती. “सत्ता मिळवल्याशिवाय आपल्या तत्त्वांचा आग्रह धरता येत नाही, हे लक्षात आल्यामुळे, सत्ता मिळवण्यासाठीच संघाने राजकीय पक्ष काढला आहे. तेव्हा राजकीय पक्षाने काळाबरोबर राहून थोडी तडजोड केली पाहिजे, आग्रही विचारांना थोडी मुरड घातली पाहिजे,” हे संयुक्त महाराष्ट्र समितीत सामील होण्यासंबंधीचे आपले मत महाजनांनी स्पष्टपणे मांडले. तत्कालीन महाराष्ट्राचे संघटनमंत्री रामभाऊ गोडबोले यांचे मत महाजनांपेक्षा वेगळे होते. पण, वरिष्ठांना महाजनांचे मत पटले. राजकीय पक्ष म्हणून काही तडजोडी करणे आणि स्वतंत्रपणे पावले टाकणे आवश्यक असते, हे महाजनांचे विचार संघाने त्यावेळी लक्षात घेतले, म्हणूनच जनसंघ व भाजपने एवढी भरारी मारली.
 
 
युतीचे राजकारण
 
 
मधुकरराव महाजन हे माझे वडील. इथून पुढे त्यांचा उल्लेख मी ‘तात्या’ असा करणार आहे. ‘सत्य असेल ते बोलणार आणि इष्ट असेल ते करणार’ असा तात्यांचा बाणा होता. नि:स्वार्थी देशभक्त आणि समाजसुधारक अशा टिळक व आगरकरांचे ते वारसदार होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सामील होणे हे माझ्या मते पक्षाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे पाऊल होते. महाजनांचे मत पक्षाने स्वीकारले आणि स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून जनसंघाची वाटचाल सुरू झाली. पुढे महाराष्ट्रात तर पुलोद आणि युतीचे राज्यही आले. भारतातही अनेक राज्यात स्थानिक किंवा भाषाभिमानी पक्षांशी युती करून जनसंघाने आणि भारतीय जनता पक्षाने राज्य केले आहे. केंद्रातही जनता पक्षापासून असे प्रयोग केले, कधी फसले, पण बहुतांशी यशस्वी होत आहेत हे आपण अनुभवत आहोत. भिन्न विचारांच्या लोकांबरोबर जमवून घेणे हासुद्धा राजकारणाचा भाग आहे, हे मधुकररावांनी पटवून दिले. गोवा स्वातंत्र्यासाठी अन्य पक्षांबरोबर जाऊन गोवा विमोचन आंदोलनाचा अनुभव महाजनांनी घेतला होता. तो स्वातंत्र्याचा प्रश्न असल्यामुळे केवळ देशभक्ती हेच त्याचे अधिष्ठान होते. इथे संघाला भाषाविषयक धोरणावर पुनर्विचार करावा लागणार होता. तरीही जनसंघाचे हित कशात आहे, हे स्पष्टपणे मांडण्याचे धाडस महाराष्ट्रात सर्वप्रथम महाजनांनी केले. पहिले पाऊल उचलण्याची हिंमत महाजनांनी केली आणि म्हणूनच आज संघाची विचारधारा सत्तास्थानाजवळ नव्हे, तर सत्तास्थानावर पोहोचली आहे. संघविचारावर अविचल निष्ठा आणि भारतीय तत्वज्ञान यांचे सखोल चिंतन होते म्हणूनच कोणतीही सत्तापदे दृष्टिपथात नसताना केवळ पक्षहिताचा ध्यास या पहिल्या पिढीने घेतला. भारतीय जनसंघाची पायाभरणी करणार्‍यांमध्ये मधुकरराव महाजन हे बिनीचे शिलेदार होते. राजकीय युती करण्याचा विचार त्यांनीच सर्वप्रथम मांडला आणि संघ, जनसंघाच्या मनात रुजवला, हे आज आपल्या लक्षात येईल.
 
 
अभ्यासू वृत्ती, कष्टाळू आणि अजातशत्रू स्वभाव यामुळे सर्व पक्षांच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत मधुकरराव लोकप्रिय होते. यामध्ये संघविचारांचा राग करणारे आणि संघस्वयंसेवकांना दूर ठेवणारे नेते प्रमुखपदांवर होते. तरीही मधुकररावांवर संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सेक्रेटरीपदाची जबाबदारी दिली गेली, ती त्यांच्या गुणांमुळेच. सभा, मोर्चे, निदर्शने असे कार्यक्रम संयुक्त महाराष्ट्र समिती आखत होती. महाजनांना जराही उसंत मिळत नव्हती. सारा महाराष्ट्र ढवळून निघाला. अत्र्यांचा मराठा गर्जत होता. १९५७ साल उजाडले. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने सार्वत्रिक निवडणूक लढवण्याचे ठरले. सर्व पक्षांनी आपले उमेदवार व ठिकाणे पुढे केली. सर्व पक्षात भारतीय जनसंघ अगदी नवा पक्ष असल्यामुळे ३९६ मतदारसंघात जनसंघाच्या फक्त २४ उमेदवारांना संधी मिळाली. मुंबईकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
 
 

जनसंघासाठी चेंबूर मतदारसंघ
मुंबईमध्ये जनसंघासाठी विधानसभेला एक व लोकसभेसाठी एकच मतदारसंघ दिला जाईल, असे समितीने जाहीर केले. जनसंघाने लोकसभेचा उमेदवार सांगावा, विधानसभेसाठी मात्र फक्त मधुकरराव महाजन यांनाच उमेदवारी द्यावी, असे संयुक्त महाराष्ट्र समितीने स्पष्टपणे सांगितले. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी आणि कॉम्रेड डांगे अशा मोठ्या नेत्यांनाही महाजनांच्या उदार हिंदुत्ववादी विचारांनी जिंकले होते. कोणी शत्रू निर्माण न करता, या मुरब्बी नेत्यांमध्ये त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. महाजनांचे स्पष्ट विचार आणि स्वच्छ आचार या गुणग्राही नेत्यांना पटत होते. मुंबईतील जनसंघाचे पहिले उमेदवार म्हणून मधुकरराव महाजन यांचे नाव निश्चित झाले. जनसंघातही महाजनांना एखादा अपवाद वगळता सर्व नेत्यांचा व संघश्रेष्ठींचा पाठिंबा होता. जनसंघाने ठाणे जिल्ह्यातील कल्याण विधानसभा जागेची मागणी केली. महाजन दहा वर्षे ठाणे जिल्ह्यात प्रचारक होते. तेथील गावोगावी सगळे त्यांना ओळखत होते. अख्खा जिल्हा त्यांच्या पाठीशी होता. महाजन तेथून नक्कीच निवडून आले असते. परंतु, कृष्णराव धुलूप हे शेकापचे मोठे नेते, त्यांना कल्याणच हवे होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने कृष्णरावांची मागणी मान्य केली आणि जनसंघाला दिला मुंबईतील चेंबूर मतदारसंघ. चेंबूरमधून जिंकून येण्याची कोणाही मोठ्या नेत्याला आणि पक्षाला खात्री नव्हती, म्हणून या नव्या पक्षाला चेंबूरची उमेदवारी दिली गेली. त्यामध्ये मेख अशी होती की, महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा मतदारसंघ आणि येथील घाटकोपर भागात गुजराती मतदार बहुसंख्येने होते. मुंबई, गुजरातबरोबर जोडली जाऊ नये हेच तर निवडणुकीमध्ये समितीचे ब्रीद वाक्य होते. साहजिकच सर्व गुजराती समाज संयुक्त महाराष्ट्र समितीच्या विरोधात एकवटला होता.
 
 
निवडणुकीचा अनुभव -उत्साहाला उधाण
 
संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे चेंबूर येथे लोकसभेसाठी पीटर अल्वारीस आणि विधानसभेसाठी मधुकरराव महाजन उभे होते. संयुक्त सभा बैठका सुरू झाल्या. सर्वांच्या मते आता महाजनांनी चेंबूरला राहावयास जावे असे ठरले. अडीच वर्षांच्या मला कल्याणला आजोळी ठेवून आई-तात्यांनी चेंबूरला बिर्‍हाड केले. राम चेंबूरकर यांच्या माडीवर आईने संसार थाटला. त्या काळी सारे उमेदवार पन्नाशीचे असत. पस्तिशीतल्या तात्यांना पाहून मतदारही म्हणत की, ‘हा कोण पोरसवदा उमेदवार आमच्या इथे उभा केला आहे.’ यांच्याबरोबरीने महिला आघाडी सांभाळणारी माझी आई तर तिशीचीसुद्धा नव्हती. पण, आई म्हणते, “सुशीलाबाई खेडकर आणि मी रात्रंदिवस काम करीत होतो. चरई, घाटला, गोवंडी, देवनार ही सगळी खेडी होती. भर उन्हात तेथेही हिंडत होतो. पण, इलेक्शन जसे काही आमच्या अंगात भिनले होते.” राष्ट्र सेविका समितीच्या कार्यवाहिका इंदुताई साठे यांचीही खूप मदत झाली होती. आई महिलांच्या रोज बैठका घेत असे. निवडणुकीमध्ये सर्व पक्षाचे एकत्र कडबोळे असले म्हणजे काय अडचणी येतात त्याबद्दलही आई सांगते.
 
चेंबूरला रोज पाच-सहा माणसे जेवायला असत. आई म्हणते, “कार्यकर्ते फार साधे होते. मतदानाच्या दिवशी गिरगावपासून अंबरनाथपर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपले जेवणाचे डबे आणले होते. रोजही मदतीला येणारे जेवणाचे डबे आणत.” आई फरसाण- चुरमुरे आणून ठेवत असे आणि मधली वेळ साजरी होत असे. त्यावेळी कोणाकडेच पैसे नव्हते. पण, तरीही आपला प्रवासखर्च, जेवणाचा खर्च पक्षाने करावा, अशी कुणाची अपेक्षाही नव्हती. सगळे पायी प्रचार करत होते. कल्याणचे माझे मामा, वामनराव साठे आणि त्यांचे सहकारी, रामभाऊ कापसे, माधवराव काणे, हे सगळेच पुढे जनसंघाचे नेते, नगरसेवक, खासदार झाले. पंचविशीतले हे तरुण भिंती रंगवणे, सभा-बैठका घेणे, कार्यकर्त्यांची त्यासाठी आखणी करणे ही कामे पाहत होते. माझे मामा, रमेश साठे म्हणाले की, १८-२० वर्षांचे ते भिंती रंगवायला रात्री कल्याणहून जायचे. कल्याण-डोंबिवली, ठाणे येथील तरुणांना रोज मुलुंड, भांडुप, घाटकोपर असा भाग वाटून दिला होता. शिस्त ही तर संघाची जमेची बाजू. शिवाय, तेथे गरीब-श्रीमंत असा भेद कधीच नव्हता. शेवटचे पाच-सहा दिवस प्रचाराला गाडी मिळाली होती. ‘कॅमल इंक’सारख्या नामवंत कंपनीचे संचालक शरद दांडेकर तात्यांच्या गाडीचे चक्रधर बनले होते. निवडणुकीच्या दिवसापर्यंत त्यांनी हे काम निष्ठेने केले. संघ ही बोलघेवड्या कार्यकर्त्यांची संघटना नाही, याचा प्रत्यय आजही येतो.
 
 

अपयश नव्हे, यशाची पहिली पायरी
 
तात्यांच्या भाषणांना खूप गर्दी होत असे. पण, तात्या आईला सांगत की, “या वातावरणावर जाऊ नकोस, यश मिळणे कठीण आहे.” कार्यकर्त्यांच्या बैठकीत ‘विजय आपलाच,’ असे ठासून सांगणार्‍या तात्यांना काँग्रेसच्या दाम आणि दंड शक्तीची कल्पना होती. त्या क्षेत्रात ही मंडळी अगदीच नवखी आणि दुर्बल होती. निवडणुकीच्या दिवशी चेंबूरपासून मुलुंडपर्यंत प्रत्येक बूथवर आई व तात्या गेले. संध्याकाळी सिंधी कॅम्पमध्ये तर उत्साहाला उधाण आले होते. मतदान चांगले झाले होते. हशू अडवाणी पूर्ण वेळ तात्यांबरोबर होते. महाजन नक्की जिंकणार असेच सर्वांना वाटत होते. मतमोजणी सुरू झाली, तेव्हा घाटकोपर सोडून बर्‍याच ठिकाणचे निकाल हाती आले. दुपारपर्यंत जनसंघ आघाडीवर होता. महाजन जिंकून आल्याचे बोर्डसुद्धा अत्र्यांनी दादरला लावले होते. अगदी हसत तात्यांनी आईला मात्र सांगितले की, “घाटकोपरचे निकाल आपल्या बाजूचे नाहीत, तेव्हा तू घरी जा.” त्या तरुण वयातही ते अगदी स्थितप्रज्ञ होते, असे मात्र त्यांना ओळखणारे सगळेच सांगतात. रात्री निकाल लागल्यावर विजयी उमेदवार इंद्रवदन ओझा यांना पहिला हार घालून तात्या घरी परतले. इतक्या लोकांची मेहनत फुकट गेली म्हणून आईला वाईट वाटले. तेव्हा तात्या म्हणाले, “मेहनत मुळीच फुकट गेली नाही. फार कमी मतांनी पराभव झाला. पुढच्या यशाचा हा पाया आहे” आणि खरोखरच त्यानंतर हशू अडवाणींची ही जागा पक्की झाली. जयवंतीबेन मेहता, प्रमोद महाजन आणि अनेकांना याच मतदारसंघाने लोकसभेत, विधानसभेत पाठवले. जनसंघ व भाजपने हा मतदारसंघ कायम आपल्याकडे राखला आहे. हे संघटनेचे बळ आहे, कार्यकर्त्यांचे परिश्रम त्यामागे आहेत.
 
 
मुंबई महानगरपालिकेत जनसंघ
 
विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या. पुन्हा कामाची धावपळ. यासंदर्भात मी माननीय रामभाऊ नाईक यांना भेटले. रामभाऊ त्या काळात नुकतेच पदवी घेऊन मुंबईला आले होते. महाजनांच्या चेंबूर निवडणुकीबद्दल त्यांना माहिती होती. पण, प्रत्यक्ष कामाची जबाबदारी नव्हती. महापालिकेच्या निवडणुकीसाठी गोरेगावमधून प्रा. कानिटकर जनसंघाचे उमेदवार होते. त्यांच्या मदतीला रामभाऊंना कार्यकर्ता म्हणून गोरेगावला पाठवले होते. रामभाऊ म्हणाले, “तेव्हा जनसंघाचा मुंबईतील प्रभावी वक्ता आणि नेता एकच होता ते म्हणजे मधुकरराव महाजन. महाजनांनी या निवडणुकीच्या प्रचाराची सगळी आखणी केली होती. कामाचे योग्य वाटप केले होते. मुंबईत जनसंघाचे दोन नगरसेवक तेव्हा यशस्वी झाले. जनसंघाचा झेंडा महापालिकेपर्यंत पोहोचला. त्याचे श्रेय मधुकररावांना नक्कीच द्यायला हवे.”
 
 
निवडणुकीनंतर संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन चालूच होते. प्रतापगडावरील छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण पंडित नेहरूंच्या हस्ते होणार होते. नेहरू संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक! म्हणून नेहरूंच्या भेटीला विरोध दर्शविण्यासाठी निदर्शने करण्याचा निर्णय समितीने घेतला. या निर्णयाशी जनसंघ सहमत नव्हता. शिवछत्रपतींसारख्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात काहीच गैर नाही, असे तात्यांनाही वाटत होते. समितीच्या सभेत आपले हे मत ठामपणे मांडताना त्यांना एस. एम. जोशींसारख्या खंद्या पुढार्‍यांना तोंड द्यावे लागले आणि समितीत राहून महाजनांनी खंबीरपणे हे काम केले. सा. ‘विवेक’चे माजी संपादक ब. ना. जोग त्यासंबंधात म्हणतात की, “या सर्व मोठ्या नेत्यांमध्ये आपले मधुकरराव कधीही कमी पडले नाहीत. उलट त्या चार वर्षांतील त्यांची कामगिरी जनसंघाच्या दृष्टीने फारच महत्त्वाची ठरली.” महाजनांच्या काळात विविध कामगार आंदोलनांतून जनसंघ सर्वांपर्यंत कसा पोहोचला ते पुढे पाहू.
 

- डॉ. विद्या देवधर

(क्रमश:)

९४४०३७३७७७
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121