मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता मागच्या अनेक दशकांपासून आपल्या विचारविश्वाचा भाग होता. दैनंदिन जीवनात त्याचा वापर आज आपल्याला बघायला मिळतो. मात्र या कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विज्ञान लेखक बाळ फोंडके यांनी केले आहे. मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा या परिसंवादात ते बोलत होते.
लोकमान्य सेवा संघ, पारले संचालित श्री. व. फाटक ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात दि. ८ फेब्रुवारी रोजी, 'कृत्रिम बुद्धिमत्ता: आज आणि उद्या ' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये प्राध्यापक मकरंद भोसले, संजीव तांबे आणि माधवी ठाकूरदेसाई यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. ज्येष्ठ विज्ञान लेखक बाळ फोंडके या परिसंवादाचे सूत्र सांभाळत होते.कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम ते भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्तेची आव्हानं यावर व्यापक चर्चा करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे विषाद करताना माधवी ठाकूरदेसाई म्हणाल्या की शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे विश्लेषण करणे, भाषेमुळे येणाऱ्या संवादाच्या अडथळ्यांवर मात करणे फायदेशीर होईल. परंतु दुसऱ्या बाजूला माणसाचा मेंदू ज्याप्रकारे निर्णय घेतो, त्याच्या मागचा विचार एआय करू शकेल का याबद्दल अद्याप तरी खात्रीशीलपणे काही सांगत येणार नाही. प्राध्यापक संजीव तांबे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निर्माण झालेल्या विविध प्रारुपांवर भाष्य केले. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्णय घेण्याची क्षमता व त्यातील विकास यावर सुद्धा प्रकाश टाकला. कृत्रिम बुद्धीमत्ता ही क्षणा क्षणाला शिकणारी गोष्ट आहे. ती जितका जास्त डेटा आत्मसात करत जाईल, तसा तिचा विकास होत राहील. कृत्रिम बुद्धीमत्तेचा असलेला धोका आपल्याला आज दिसत नाही, हाच त्यातील सर्वात मोठा धोका आहे असे प्राध्यापक मकरंद भोसले यांनी नमूद केले.
प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही काळाची गरज असेल!
"कृत्रिम बुद्धीमत्ता हे उत्तर देणारे तंत्र आहे. पण त्या उत्तरासाठी आपल्याला योग्य ती प्रश्न विचारणारी माणसं लागणार आहेत. येणाऱ्या काळात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व असेल.कृत्रिम बुद्धिमत्तेकडून काम करवून घेणं आपल्याला शिकावं लागणार आहे. " असे मत मकरंद भोसले यांनी व्यक्त केले.