४० मराठी संस्थांना स्थान नाही; नेहमीच्या कंपूकडून ‘फेक नॅरेटिव्ह’ चालवण्याचे काम
24-Feb-2025
Total Views | 39
2
नवी दिल्ली: नवी दिल्लीत पार पडलेल्या साहित्य संमेलनामध्ये दिल्लीतच तब्बल ९० ते १०० वर्षे कार्यरत मराठी संस्थांना डावलण्याचा पराक्रम घडला आहे. त्यामुळे दिल्लीतील संमेलनातून राजकीय अजेंडे रेटण्याव्यतिरिक्त नेमके काय घडले, असा प्रश्न उपस्थित होतो. ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ आणि संजय नहार यांच्या ‘सरहद’ने मोठा गाजावाजा करून दिल्लीत ९८वे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवले. त्यासाठी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये मोठा सोहळा आयोजित केला होता. अर्थात, या साहित्य संमेलनातही नेहमीच्या कंपूने आपला ‘फेक नॅरेटिव्ह’ चालवण्याचे काम केले. त्यामुळे साहित्य संमेलन हा आपल्याला न पटणार्या विचारांचे सरकार जनतेने सलग तीन वेळा निवडून दिल्याने आलेले नैराश्य व्यक्त करण्याचा कार्यक्रम असेच स्वरूप आले.
साहित्य संमेलन खरे तर ‘अखिल भारतीय साहित्य महामंडळा’चा कार्यक्रम. मात्र, संमेलनात ‘सबकुछ सरहद’ असाच प्रकार दिसला. कोणत्याही प्रश्नास उत्तर देण्याऐवजी ‘सरहद’ महामंडळाकडे आणि महामंडळ ‘सरहद’कडे चेंडू टोलवत असल्याचे दिसले. साहित्य संमेलनाचा एकूण तोंडावळा बघता ‘सरहद’च्या जाहिरातीसाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते का, अशी शंका उत्पन्न होते. साहित्य संमेलनातील सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे दिल्लीत दीर्घकाळापासून मराठी संस्थांना डावलणे. दिल्लीमध्ये थोड्या थोडक्या नव्हे, तर तब्बल ४० मराठी संस्था आहेत. यातील काही संस्था तर १०० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व संस्थांना दिल्लीमध्ये मराठी साहित्य मराठी संस्कृती आणि परंपरा जपून ठेवण्याचा देदीप्यमान वारसा लाभला आहे. त्यामुळेच पूर्वी केवळ दिल्ली आणि आता दिल्लीसह संपूर्ण राष्ट्रीय राजधानी परिसर अर्थात ‘एनसीआर’मध्ये मराठीचा डंका ठळकपणे दिसतो.
दिल्लीमध्ये मराठी नाटक आयोजित करणे, आषाढी एकादशीच्या दिवशी सांकेतिक वारी आयोजित करणे, मराठा साम्राज्य दिन साजरा करणे, शिवजयंती साजरी करणे, दिवाळी पहाट सरकार कार्यक्रम आयोजित करणे आणि असे अनेक उपक्रम दिल्लीतील वेगवेगळ्या भागांत विखुरलेल्या मराठी संस्था करत असतात. त्याचप्रमाणे, दिल्लीतील सर्व मराठी संस्था एकत्र येऊनही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करतात. दिल्लीत महाराष्ट्र आणि मराठी संस्कृती ठळकपणे दिसण्यामागे या ४० संस्थांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. मात्र, साहित्य संमेलनामध्ये महामंडळ असो अथवा आयोजक ‘सरहद’ असो या सर्वांनी आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची खंत या संस्थांनी दै. ’मुंबई तरुण भारत’कडे व्यक्त केली आहे.
दिल्लीत मराठीसाठी योगदान देणार्या दुर्लक्षित संस्था
महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज, बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज, नवी दिल्ली-११००५५
दिल्ली महाराष्ट्रीयन समाज बिल्डिंग ट्रस्ट, बृहन्महाराष्ट्र भवन, पहारगंज, नवी दिल्ली-११००५५
मराठा मित्र मंडळ, चौगुले पब्लिक स्कूल, डी-४, फैज रोड, करोल बाग नवी दिल्ली-११००५५
महाराष्ट्र मित्र मंडळ, जनकपुरी-शिवनगर परिसर, दत्त विनायक मंदिर संस्थान सी-२ए, पॉकेट १६, जनकपुरी, नवी दिल्ली-११००५८
महाराष्ट्र मंडळ आर. के. पुरम सीए/१४-ए, डीडीए फ्लॅट, मुनिरका, नवी दिल्ली-११००६७
श्री विठ्ठल मंदिर संस्थान विठ्ठलवाडी, सेक्टर ६, आर. के. पुरम, नवी दिल्ली-११००२२
महाराष्ट्र सांस्कृतिक समिती, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली-११०००१
पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, बी-८०, आनंद विहार, दिल्ली-११००९२
दिल्ली महाराष्ट्रीय शिक्षण आणि सांस्कृतिक समाज वालचंद प्लेस, आराम बाग, नवी दिल्ली ११००५५,
वनिता समाज, १३, संस्थात्मक क्षेत्र, लोदी रोड, नवी दिल्ली- ११०००३
आनंदवन कल्चरल सोसायटी (नोंदणीकृत) महा. को. ऑप. हाऊसिंग सोसायटी, ए/६, पश्चिम विहार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससमोर नवी दिल्ली-११००६३
महाराष्ट्र मंडळ, मयूर विहार २८-ए, पॉकेट-१, फेज-१, दिल्ली-११००९१
सह्याद्री महाराष्ट्र मंडळ गोल्डन को-ऑप. गृहनिर्माण संस्था ९-ए, आयपी. एक्सटेन, पटपरगंज, दिल्ली-११००९२
छत्रपती शिवाजी मराठा मंडळ, २४५८/९, बीदानपुरा, करोलबाग, न्यू दिल्ली-११०००५
महाराष्ट्रीयन समाज समिती, ए१, सेक्टर-२२, नोएडा-२०१३०१
महाराष्ट्र मित्र मंडळ के-१०२, काविरी अपार्ट., प्लॉट-४, सेक्ट-६ द्वारका, नवी दिल्ली
महाराष्ट्र मंडळ, गुरुग्राम (गुडगाव) ८८५, ग्रा. फ्लोअर, सेक्टर १४, गुडगाव
गणेश सेवा मंडळ, बी-३८, स्वास्थ्य विहार, विकास मार्ग, दिल्ली-११००९२
महाराष्ट्र मंडळ, अशोक विहार बी-६२-ए, अशोक विहार, फेज-२ नवी दिल्ली-११००५२
सार्वजनिक उत्सव समिती यु-१७, ग्रीन पार्क विस्तार, नवी दिल्ली-११००१६
विदर्भ मित्र मंडळ २२९, समाचार अपार्टमेंट मयूर विहार फेज-१, दिल्ली-११००९१
मराठी मित्र मंडळ (अलकनंदा) ५७, अरावली अपार्टमेंट्स अलकनंदा, नवी दिल्ली-११००१९
श्री गणेश मराठा मंडळ गल्ली नं-८, बीदोनपुरा, करोल बाग नवी दिल्ली-११०००५
श्री गणेश मराठा मित्र मंडळ, माकन क्र. २७२, पहिला मजला, दरिबा कलान, चांदणी चौक, दिल्ली-११०००६
गणराज महाराष्ट्र मित्र मंडळ ट्रस्ट एच-१६८/२० सेक्टर गामा-२ ग्रेटर नोएडा-२०१३०६
भारती विद्यापीठ भारती विद्यापीठ परिसर, ए-४, पश्चिम विहार, रोहतक रोड नवी दिल्ली-११००६३
महाराष्ट्र मंडळ, फरिदाबाद गीता मंदिर, १०७७, सेक्टर-२९ फरीदाबाद (हरियाणा)
महाराष्ट्र मित्र मंडळ, फरीदाबाद ५-बी/८१, एनआयटी-५ फरीदाबाद - १२१००१ (हरियाणा)
जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंड. दिल्ली चॅप्टर १६-ए/२० डब्ल्यू. इ. ए., करोल बाग नवी दिल्ली-११०००५
विशाल महाराष्ट्रीय सहकारी क्रेडिट अॅण्ड थेफ्ट सोसायटी, डी-७५३, पेशवे रोड, नवी दिल्ली-११०००१
बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली १००५६, मुलतानी धांडा, गल्ली नं. २ पहाडगंज, नवी दिल्ली-११००५५
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राष्ट्रीय समिती, बी-१४अ, कुतुब संस्थात्मक क्षेत्र, कटवरिया सराई, नवी दिल्ली-११००१६
सह्याद्री सार्वजनिक गणेश उत्सव समिती, हंस एन्क्लेव्ह, गल्ली नं. १०, घर क्रमांक २२२, दिल्ली-जयपूर महामार्ग, गुडगाव,
हरियाणा महाराष्ट्रीय सेवा समिती, इंदिरापुरम ४४९डी, शिप्रा सन सिटी, फेज-१, इंदिरापुरम-२१०२१४, गाझियाबाद
अखिल भारतीय सिद्धार्थ कल्याण केंद्र, नवी दिल्ली
दिल्ली मराठी प्रतिष्ठान
महाराष्ट्र गणेश महोत्सव पोलीस कॉलनी, नरेला दिल्ली
नेमका अजेंडा काय?
साहित्य संमेलन दिल्लीत आयोजित करणे, त्याची जबाबदारी ‘सरहद’कडे देणे आणि शरद पवार स्वागताध्यक्ष असणे; यामध्येच संमेलनाचा अजेंडा लक्षात आल्याची चर्चा रंगली आहे. संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा खोट्या पुरोगामित्वाचा डंका वाजवणे, हाच या संमेलनाचा हेतू होता का, असाही प्रश्न निर्माण होतो. मराठी साहित्य क्षेत्रातील एक कंपू केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांची राजकीय भूमिका पटत नाही म्हणून सावरकरांच्या साहित्याकडे दुर्लक्ष करणे, सध्याच्या काळात स्पष्ट भूमिका मांडणार्या रमेश पतंगे यांच्यासारख्या विचारवंतांच्या साहित्यास नाक मुरडणे, असे प्रकार करत असतो. हाच कंपू ’देशात भूमिका स्वातंत्र्य नाही,’ असाही कांगावा करतो.
आम्हाला जाणीवपूर्वक डावलले
'सार्वजनिक उत्सव समिती’ ही दिल्लीतील एक प्रमुख मराठी संस्था. यशवंतराव चव्हाण, वसंत साठे आणि रा. मो. हेजिब यांनी या संस्थेला आकार दिला. नीना हेजीब या सध्या या संस्थेची जबाबदारी पाहतात. त्या म्हणाल्या, “दिल्लीमध्ये स्नेहसंवर्धक समाज असो अथवा सार्वजनिक उत्सव समिती असो, याद्वारे मराठी संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्यात आली. मात्र, दिल्लीत होणार्या साहित्य संमेलनामध्ये आम्हाला साधे निमंत्रण देण्याचेही सौजन्य दाखवण्यात आले नाही. खरे तर दिल्लीत साहित्य संमेलन होत असल्याचे पाहून आम्हा सर्वांनाच खूप आनंद झाला होता. मात्र, दिल्लीतील मराठी संस्थांना यामध्ये सहभागी न करून घेण्यात आयोजकांनी नेमकी धन्यता का मानली, याचे उत्तर मिळत नाही. दिल्लीतील या संस्थांमध्ये कार्यरत किमान ज्येष्ठ मंडळींना तरी कार्यक्रमात बोलावण्याचे सौजन्य दाखवण्याची गरज होती. एकूणच संपूर्ण मनमानी पद्धतीने साहित्य संमेलन आटोपण्यात आले आहे.”
- नीना हेजीब, सार्वजनिक उत्सव समिती
अधिक समन्वयाने दिल्लीतील मराठी संस्थांचा सहभाग वाढला असता
दिल्लीतील सर्व मराठी संस्थांची ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ म्हणजे ‘दिल्ली मराठी प्रतिष्ठान’. दिल्लीत दिवाळी पहाट आयोजित करणे आणि सांकेतिक वारी सुरू करणे याचे श्रेय ‘दिल्ली मराठी प्रतिष्ठान’चे आहे. या संस्थेचे वैभव डांगे म्हणाले, “दिल्लीत दीर्घकाळापासून कार्यरत असणार्या मराठी संस्थांचा सहभाग अधिक समन्वयाने वाढवता आला असता, अशी भावना आहे. कारण, प्रारंभीपासून मराठी संस्था आयोजनात आनंदाने सहभागी झाल्या होत्या आणि हवी ती मदत करत होत्याच. शेवटच्या क्षणी नियोजनात थोडा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. दिल्लीला मराठी संस्थांच्या कार्याचा मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्योत्तर काळ ते आजचा काळ दिल्लीतल्या मराठी संस्था स्वतःमध्ये कालानुरूप बदल करून टिकून आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दिल्लीत साहित्य संमेलन घ्यावेसे वाटणे, याचे प्रमुख कारण म्हणजे दिल्लीत ठळक असलेला मराठी समाज. दिल्लीत मराठी समाजाचे ठळक अस्तित्व दिसण्यामागे दिल्लीतील या ४० संस्थांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे.”