मित्रा पार्कमुळे ३ लाख लोकांना रोजगार मिळणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20-Sep-2024
Total Views | 69
वर्धा : मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे अमरावती जगाच्या नकाशावर येणार, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम मित्रा पार्कची पायाभरणी करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे. एकीकडे आज अमरावतीच्या मित्रा टेक्स्टाईल पार्कचे भूमिपूजन होत आहे तर दुसरीकडे आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षणाची यौजना सुरु होत आहे. त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर स्टार्टअपची योजनाही सुरु होत आहे. पीएम विश्वकर्मा अंतर्गत राज्यातील दोन लाख लोकांना मदत मिळत आहे. आज या एका कार्यक्रमामध्ये साडे सहा लाख कुटुंबाचं चित्र बदलणार असून त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकारीता पोहोचणार आहे."
"ज्याला ज्याला आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मोदीजींनी संधी तयार केली आहे. इतक्या वर्षात सूतार, लोहार, सोनार, कुंभार, मुर्तीकार, चर्मकार, मिस्त्री, न्हावी, टेलर, धोबी या सगळ्या घटकांचा विचार कुठल्याच सरकारने केला नव्हता. पण पंतप्रधान मोदी हे त्यांचा विचार करणारे देशातील एकमेव व्यक्ती आहेत. मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे अमरावतीला जगाच्या नकाशावर आणण्याचं काम होणार आहे. आम्ही पंतप्रधान मोदींना टेक्स्टाईल पार्क देण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी देशातील सात पार्कपैकी एक पार्क अमरावतीमध्ये दिला. ज्यामुळे जवळपास ३ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली.