मोदींच्या हॅट्ट्रिकनंतर जागतिक वर्तुळात बहुतांशी सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आणि विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदींच्या विजयाचे स्वागतही केले. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा भारताचे जागतिक महत्त्व अधोरेखित झाले आहे.
७५ हून अधिक जागतिक नेत्यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन
नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर जगभरातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमीर झेलेन्स्की यांच्यासह ७५ हून अधिक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. यात मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचाही समावेश आहे. तसेच या सगळ्यांनी त्यांच्यासोबत जवळून काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विजयाबद्दल आणि ऐतिहासिक निवडणुकीतील सुमारे ६५० दशलक्ष मतदारांचे अभिनंदन. दोन्ही राष्ट्रांमधील मैत्रीपूर्ण संबंध वाढत आहेत. आम्ही अमर्यादित सामर्थ्याचे सामायिक भविष्य ‘अनलॉक’ करतो,” असे जो बायडन आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणाले. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी दूरध्वनी संभाषणादरम्यान मोदींचे यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन केले.
जमैकाचे पंतप्रधान अॅण्ड्—यू हॉलनेस, श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे, मालदीवचे उपराष्ट्रपती हुसेन मोहम्मद लतिफ, दिनेश गुणवर्देना - पंतप्रधान श्रीलंका, प्रविंद कुमार जगन्नाथ - पंतप्रधान मॉरिशस, पुष्प कमल दहल - पंतप्रधान नेपाळ, हे सगळे सलग तिसर्यांदा मिळवलेल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत आहेत व द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी भारतीय पंतप्रधानांसोबत काम करण्यास इच्छुक आहेत.
युरोप, अमेरिकेमधील भारतविरोधी वृत्तवाहिन्या विरुद्ध भारतप्रेमी राजकीय नेतृत्व
मात्र, युरोप आणि अमेरिकेमधील बहुतेक मोठ्या वृत्तवाहिन्यांनी आणि वर्तमानपत्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वतःच्या पक्षाचे बहुमत न मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. बहुतेकांचे म्हणणे होते की, यामुळे त्यांना भारताचे राष्ट्रीय हित जपण्याचा कार्यक्रम यापुढे राबवता येणार नाही. पश्चिम जगतातील बहुतेक माध्यमे/वर्तमानपत्रे भारताच्या विरोधात आहेत. याचे मुख्य कारण आहे की, त्यांना हे सहन होत नाही की, भारताची इतक्या वेगाने प्रगती होते आहे. या देशांतील माध्यमांना अजूनसुद्धा वाटते की, त्यांच्या गोर्या कातडीमुळे त्यांना मानसिकरित्या अजूनसुद्धा भारताला उपदेश करण्याचा हक्क आहे. भारतावर अजूनसुद्धा ते राज्य करत आहेत. त्यांच्या स्वतःच्या देशाची परिस्थिती कशीही असो. युरोप, अमेरिका आणि इतर देश आर्थिकदृष्ट्या अजून कमजोर होत आहेत, पण त्यांची मानसिकता भारतावर राज्य करण्याची आहे.
मात्र, या देशांच्या राजकीय नेतृत्वाला हे नक्कीच साफ समजते की, भारताच्या वाढत्या आर्थिक आणि सामरिक प्रभावामुळे भारत चीनला महत्त्वाचा जागतिक पर्याय म्हणून समोर येत आहे आणि या देशांचे हित भारताशी सामरिक, संरक्षण आणि आर्थिक संबंध अजून मजबूत करण्यामध्येच आहे. त्यामुळे तेथील माध्यमे काहीही म्हणो, ते देश भारताशी त्यांचे संबंध अजून मजबूत करणारच. चीनची जगावर राज्य करण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा आता सगळ्या जगाला स्पष्ट समजून आलेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर चीनचा संताप
मात्र, दोन देश ज्यांच्या पोटात तिसर्यांदा मिळवलेल्या विजयामुळे सर्वात जास्त दुखले, ते म्हणजे पाकिस्तान आणि चीन. पाकिस्तानच्या माध्यमांना भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे खूपच आनंद झाला आणि त्यांना अशी आशा वाटते की, भारत यापुढे काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानशी चर्चा करेल.
“भाजपप्रणीत रालोआ आघाडीच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन. द्विपक्षीय संबंधांचे हित लक्षात घेऊन भारतासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असे माओ निंग, प्रवक्ते, चीन परराष्ट्र मंत्रालय म्हणाले. मात्र, दुसर्याच दिवशी चीनने आपला राग व्यक्त केला. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग यांनीही नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. “भारत-तैवान यांच्यातील परस्पर भागीदारी, व्यापार, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यास तयार आहेत, जेणेकरून इंडो-पॅसिफिकमध्ये शांतता प्रस्थापित होईल,” असे तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग यांनी म्हटलं होते. त्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिलेल्या उत्तरात म्हटले होते की, “भारत तैवानशी जवळचे संबंध निर्माण करण्यास तयार आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानावर चीनने संताप व्यक्त करत, भारताला तैवानपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. “पंतप्रधान मोदींनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या अभिनंदनाला विरोध करायला हवा होता. भारताची मोठे सामरिक, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता कमी होईल,” अशी प्रतिक्रिया यावर चीनने व्यक्त केली.
भारताने नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीकरिता शेजारच्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांना बोलावले आहे. मात्र, यामध्ये चीन आणि पाकिस्तान हे देश सामील नाहीत. अर्थ सरळ आणि साफ आहे की, या देशांशी आमचे संबंध चांगले नाहीत. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही आणि चीन भारताच्या विरोधात करणार्या कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत ते भारताचे मित्र बनू शकत नाहीत.
चीनचे सर्वात मोठे वर्तमानपत्र आहे, ‘ग्लोबल टाइम्स.’ त्यांनी भारताच्या निवडणुकीचे विश्लेषण केले. चीनला वाटते की, आता नरेंद्र मोदींच्या स्वतःच्या पक्षाचे बहुमत नसल्यामुळे, भारताची मोठे सामरिक, आर्थिक निर्णय घेण्याची त्यांची आणि भारताची क्षमताही कमी होईल. कुठलेही मोठे निर्णय घेण्याकरिता त्यांना आघाडीच्या सर्व पक्षांना बरोबर घ्यावे लागेल आणि यामुळे सर्वात जास्त फायदा चीनला होईल. कारण, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग हा कमी होईल व भारत चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढचे पाच वर्षे तरी पुढे येऊ शकणार नाही. म्हणजेच कमी झालेल्या बहुमतामुळे चीनची भारतावर मात करण्याची इच्छा पूर्ण झाली आहे.
राष्ट्रीय हित जपण्याकरिता, सामरिक शक्ती वाढवण्याकरिता
लक्षात असावे की, चीन, पाकिस्तान आणि पश्चिम जगतातील काही भारताच्या विरोधात कटकारस्थाने करतच राहतील. मात्र, भारताकरिता सर्वात महत्त्वाचे आहे की, आपल्या आर्थिक प्रगतीचा वेग हा कमी होऊ द्यायचा नाही. यामुळे जसे पहिले म्हटले जात होते, भारताच्या अर्थव्यवस्थेने वेगाने प्रवास करून पुढच्या दोन वर्षांमध्ये जगातील नंबर तीन अर्थव्यवस्था बनण्याची गरज आहे, जे अजूनसुद्धा शक्य आहे.
भारताच्या जनतेने भाजपप्रणीत एनडीए आघाडीच्या सरकारला पुढची पाच वर्षे राज्य करण्याचा अधिकार दिला आहे. आता विरोधी राजकीय पक्षांनी आंदोलने करणे, हिंसाचार करणे, बंद पाडणे आणि देशातील विकासाची कामे थांबवणे, हे थांबवावे. ‘राष्ट्र प्रथम’ हे त्यांचे ब्रीदवाक्य असायला पाहिजे आणि त्यांचे सर्वात महत्त्वाचे काम आहे की, देशाच्या प्रगतीमध्ये त्यांनीसुद्धा आपला हातभार लावावा.
आपण आपले राष्ट्रीय हित जपण्याकरिता, सामरिक शक्ती वाढवण्याकरिता, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवण्याकरिता आणि भारताची सर्वसमावेशक राष्ट्रीय ताकद वाढवण्याकरिता एक देश म्हणून वेगाने काम करायला पाहिजे. मला खात्री आहे की, येणार्या दिवसांमध्ये आपण पुन्हा एकदा वेगाने काम करून आपली भारताची सर्वसमावेशक राष्ट्रीय ताकद वाढवू. हीच भारतीयांची येणार्या दिवसांत सरकार आणि विरोधी राजकीय पक्षांकडून अपेक्षा आहे, जी नक्कीच पूर्ण केली जाऊ शकते.
निवडणुकीच्या काळामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खोट्या भारतीय नोटा आत आणल्या गेल्या, अशी एक बातमी सोशल मीडियावर येत आहे. आता याच नोटा बाजारामध्ये वापरल्या जातील. म्हणून आर्थिक व्यवहार हे फक्त डिजिटल पद्धतीने करावेत. नाहीतर आपण खोट्या नोटांना बळी पडू!
(नि.) ब्रि. हेमंत महाजन