भस्मान्तं शरीरम्! यं त्वमग्ने समदहस्तमु निर्वापया पुन:। कियाम्ब्वत्र रोहतु पाकदूर्वा व्यल्कशा स्वाहा॥
अन्वयार्थ
हे (अग्ने) भौतिक अग्नी, (त्वम्) तू (यम्) ज्या पार्थिव शरीराला (सम्+अदह:)चांगल्या प्रकारे जाळले आहेस, (तम् उ) त्या शरीराला (पुनः) पुन्हा (निर्वापय) व्यवस्थित, मर्यादित स्वरूपात शरीराला जाळून शांत कर म्हणजेच आवश्यक तितक्याच प्रमाणात अग्नीद्वारे देहाला जाळले जावे. पुढे (अत्र) या स्मशानभूमीतील दहनस्थळी (कियाम्बु) काही प्रमाणात पाणी उत्पन्न होत राहो. (व्यल्कशा पाकदूर्वा) विविध शाखांनी युक्त अशा स्वरूपाची परिपक्व हराळी, गवत वगैरे उत्पन्न होत राहो.
विवेचन
शरीर ही जीवात्म्याला मिळालेली परमेश्वराची अमूल्य अशी देणगी आहे. वेदांमध्ये शरीराला देवतांची अयोध्या नगरी असे म्हटले आहे. याच देहरूप नगरीत मन, बुद्धी, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रियइत्यादी दिव्यशक्ती निवास करतात, अशी ही देहरूपी दिव्य नगरी अजिंक्य व अयुध्य आहे. याच पवित्र शरीरात प्रवेश करून आत्मा हा आपली विविध श्रेष्ठतम कामे करू शकतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष चार पुरुषार्थ साध्य करण्याचे सामर्थ्य याच तर देहाच्या माध्यमाने साध्य होते. इतर प्राण्यांचे सोडा. पण, मानव सर्वश्रेष्ठ प्राणीमात्र या देहरुप साधनाने या इहलोकातील सर्व प्रकारची कामे यशस्वी करू शकतो. इतकेच काय तर आयुष्यभर या देहाचा सुयोग्य उपयोग करीत आपले जे काही मनोवांछित कार्य आहे, तेदेखील संपादू शकतो. पण, ही गोष्ट विसरता येणार नाही की, एके दिवशी या शरीराचा अंतदेखील होणार आहे. आत्म्याने इहलोक सोडून परलोकाकडे प्रस्थान केले की, नाशवंत हा देह पंचतत्वात विलीन होणार यालाच मृत्यू असे म्हणतात. पंचमहाभूताने बनलेला हा देह पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतात मिसळणार व हे जग सोडून हा जीवात्मा अनंतयात्रेकडे प्रस्थान करणार, अशा या क्षणभंगुर जीवनाविषयी नीतिशास्त्रकारांनी अतिशय सुंदर शब्दात म्हटले आहे -
नलिनीदलगत जलमतितरलम्,
तद्वतज्जीवितमतिशय चपलम्।
विद्धि व्याधिकालग्रस्तम्
लोकं शोकहतं च समस्तम्॥
हे जग म्हणजे कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे अतिशय तरल आहे. त्याचप्रमाणे जीवन हेदेखील अत्यंत चंचल आहे. असे हे सारे जग जणू काही भयानक अशा दुःख व रोगरुप काळसर्पाने वेढलेले आहे. आश्चर्य मोठे हे की, अशा या चपल व चंचल जगात वावरणारेमोहांध लोक हे मात्र विवेकहीन बनून बिनधास्तपणे जगण्याची इच्छा बाळगत पुढे सरसावत आहे.पाप-पुण्य, जीवन-मृत्यू, धर्म-अधर्म याबाबतीत कोणीही काहीही जाणावयास तयार नाहीत. जणू काही आम्ही मरणारच नाहीत, या आविर्भावात बेधुंदपणे वागत आहेत. या जगात आम्ही कायमस्वरूपी राहावयास आलो आहोत,म्हणून सर्व वस्तू आणि पदार्थांचा उपभोग घेत जगणे, हाच आमचा अधिकार आहे, अशा मनस्थितीत जीवन कंठत आहेत. पण, एके दिवशी या देहाचा अंत होणारच, कारण या परिवर्तनशील सृष्टीत ज्याचा आरंभ आहे, त्याचा अंतदेखील निश्चितपणे होणार हा अटल नियम आहे.
मृत्यू म्हणजेच देहांतर. या देहानंतर दुसरा देह प्राप्त करणे. श्रीकृष्णांनी गीतेत जीवात्म्याकरिता या देहाच्या बाल्य (कौमार), तारुण्य (युवा), वार्धक्य (म्हातारपण) या तीन अवस्थांतर चौथी देहांतर म्हणजेच दुसर्या देहाची प्राप्ती अशा चार अवस्था सांगितल्या आहेत. या चारही अवस्थांना प्राप्त होऊन ‘धीरः तत्र न मुह्यते!’ धैर्यशाली पुरुष मात्र कधीही मोहीभूत होत नाही किंवा दुःख करीत नाहीत. देहाचे अवसान (मृत्यू) होत असताना माणसाने घाबरता कामा नये. आपल्या जीवन प्रवासात या देहाला इतका सुंदर व पवित्र आत्मा लाभला. अशा या जीवात्मयुक्त देहाला आम्ही आजपर्यंत सुसंस्कारित केले. व्यवस्थित सांभाळले. आतापर्यंत १५ संस्कार या चैतन्यमय देहाविषयी होते. गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन व जातकर्म या प्रारंभिक चार संस्कारांविषयी जीवात्मा हा काहीही जाणत नव्हता. पुढे नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, कर्णवेध व चूडाकर्म या पाच संस्काराच्या वेळी हा बाळ थोडे थोडे जाणू व समजू शकत होता. नंतरच्या उपनयन, वेदारंभ, समावर्तन, विवाह, वानप्रस्थ व संन्यास या सहा संस्कारांच्या प्रसंगी मात्र हा मानव अतिशय प्रबुद्ध अवस्थेत आहे.
या सर्वांविषयीचे महत्त्व व रहस्य समजू शकत होता. आता या देहातून आत्मा निघून गेल्यानंतर हे पार्थिव जड पडले आहे. हा देह निश्चेष्ट झाला आहे. म्हणून तो आपल्या देहावर केल्या जाणार्या संस्कारांविषयी काहीच जाणू शकत नाही. आता या देहावरील होणारा शेवटचा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार! मानवी देहासाठी हा अंत्य म्हणजेच शेवटचा विधी यावेळी मात्र आत्मा साक्षीभूत नाही. आपले जवळचे नातेवाईक, आप्तेष्ट व मित्रवर्ग मात्र इथे उपस्थित असतात. हे सर्व मिळून काही काळ शोक करून दुःख व्यक्त करतात. नंतर या पार्थिव देहाला स्मशानभूमीवर नेऊन अग्नीला समर्पित करतात.वैदिक परंपरेत हा अंतिम संस्कार यालाच अग्निदाह, अग्निकर्म, अंत्येष्टी किंवा अंत्यविधी असेही म्हणतात. महर्षी दयानंद सरस्वती आपल्या ‘संस्कार विधी’ ग्रंथात या संस्कारावर प्रकाश टाकतात - शरीराचा अंत (शेवट) झाल्यानंतर केल्या जाणार्या संस्काराला ‘अंत्येष्टी कर्म’ म्हणतात.अंत्यसंस्कार केल्यानंतर शरीरासाठी आता कोणताही इतर संस्कार उरत नाही. म्हणूनच या अंतिम संस्काराला ‘नरमेध’, ‘नरयाग’, ‘पुरुषयाग’ याही नावांनी संबोधले जाते. ‘अंत्येष्टी’ या शब्दावरून हे स्पष्ट होते की, पार्थिव देहावर केला जाणारा संस्कार हा अग्नीसंस्कारच आहे. मृतदेहाला किंवा प्रेताला पुरणे किंवा उंच बुरुजावर ठेवून त्यास पक्ष्यांना खाऊ घालणे हे पूर्णपणे अयोग्य व अवैदिक आहे. तसेच ते वैज्ञानिक दृष्टिकोनातूनदेखील पूर्णांशाने चुकीचे आहे. शरीराचा शेवट अग्निदहनाने करणे, हे अत्यंत संयुक्तिक ठरते. यासाठी वैदिक प्रमाण म्हणजे यजुर्वेदातील शेवटच्या अध्यायात आलेला ‘भस्मान्तं शरीरम्’ हा मंत्रांश! शरीराचा अंत हा त्याला अग्नीद्वारे भस्म केल्याने होतो. अग्नीचा संबंध शेवटपर्यंत आहे. शहराला निरोप देताना मंत्रोच्चारणपूर्वक अंत्यविधी पार पडणे, म्हणजेच खर्या अर्थाने नरयज्ञ होय. (क्रमशः)
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य