मगरींसोबत सहजीवन शक्य?

    02-Mar-2024
Total Views | 51
Crocodiles


पृथ्वीवरील उष्णकटिबंधीय प्रदेशातील गोड्या व खार्‍या पाण्यात शिकारी जीवांच्या २३ प्रजाती नांदतात. यापैकी आपल्याशी संबंधित म्हणजे मगर, सुसर आणि गोड्या पाण्यातील मगर. नद्या, गोड्या पाण्याची तळी, तलाव, विहिरी, कॅनॉल, दलदल येथे वास्तव्य करून राहणारा हा प्राणी. महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यांमध्ये विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, नागपूर, पुणे, सोलापूर या भागांतील विविध अधिवासात मगरी अनेक दशके वास्तव्य करून आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये खास करून, सांगली जिल्ह्यामध्ये मानव-मगर संघर्ष वाढलेला आहे.

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीकाठी गेल्या २० वर्षांत मगरीच्या हल्ल्यात १४ व्यक्तींचा मृत्यू आणि १६ लोक जखमी झाले आहेत. या भागात गेली कित्येक वर्षं मगरी वास्तव्य करून आहेत. याची जाणीव नदीकाठच्या लोकांना देखील आहे. त्यामुळे पूर्वी येथे संघर्ष नव्हता. मात्र, शेतीकरिता जमिनीच्या वापरामध्ये झालेल्या बदलामुळे मानव-मगर संघर्षाची ठिणगी पेटली. या भूभागात प्रामुख्याने शेती आणि मासेमारी करणार्‍यांचा वावर आहे. हे लोक पूर्णतः नदीवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत मानव-मगर संघर्षामुळे स्थानिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. या संघर्षात जितकी जीवितहानी झाली नाही, त्याच्या कैक पटीने मगरी मारल्या गेल्या आहेत. त्यापुढेही जाऊन मगरींच्या पिल्लांची छुप्या मार्गाने तस्करीदेखील झाली आहे.

सांगलीतील मानव-मगर संघर्षाच्या कारणांमध्ये अधिवास नष्टता हे मुख्य कारण आहे. नदी, तळी यांच्या पात्रातील वाळू आणि माती उपसा हा मगरींचा अधिवास नष्ट होण्याचे मोठे कारण आहे. पूर्वी हे प्रमाण नगण्य होते. अलीकडील बांधकाम क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे आणि यांत्रिक बोटींच्या बेफाम वापरामुळे हा समृद्ध काठ अक्षरशः ओरबाडला जात आहे. सोबतच काठावरील शेतीमधील रासायनिक खते, साखर कारखान्यांमधील सांडपाणी यांमुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे मासे आणि इतर जलचर मरत असल्याने, मगरींसाठी आवश्यक असणार्‍या अन्नाचे दुर्भिक्ष वाढत आहे. नदीकाठचा भाग अगदी नदीपात्र आत दाबून अतिक्रमण करून, शेतीखाली आणला जात आहे. तेथील झाडे-झुडपे तोडल्याने, प्रत्येक वर्षी पुरामध्ये हा मळीचा भाग वाहून जातो. हा भाग मगरींना अंडी घालण्यासाठी आणि सूर्यस्नानासाठी आवश्यक आहे. मात्र, याच अधिवासाचा आता र्‍हास झाला आहे. अशा नष्ट झालेल्या अधिवासामुळे मगरी नवीन अधिवासाच्या शोधात इतरत्र फिरू लागल्या आहेत.

शेतामधील बांध, कॅनॉल, शेततळी, विहिरी या ठिकाणी त्या वावरू लागल्या आहेत. मासेमारीचे प्रमाण वाढत आहे. परिणामी बर्‍याच मगरी जाळ्यांमध्ये अडकून बुडल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. मगरीच्या अधिवासाजवळ लोक मद्यप्राशनासारखे बेजबाबदार वर्तन करत असल्यामुळे सरहद्दनिष्ठा, स्वसंरक्षण आणि अंड्यांच्या व पिल्लांच्या रक्षणासाठी मगरींकडून लोकांवर होणार्‍या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे.मानव-मगर संघर्षामधून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून काही प्राथमिक स्वरुपाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतीसाठी वीज दिवसा उपलब्ध करून देणे, पाण्यामध्ये कमी मेंटेनन्स असलेले सबमर्सिबल पंप वापरणे, जीवितहानी झालेल्या पीडितांना त्वरित नुकसान भरपाई देणे अशा प्राथमिक स्वरुपाच्या उपाययोजना अमलात आणणे गरजेच्या आहेत.

मगरींच्या अधिवासामध्ये कोणतेही उत्खनन आणि अतिक्रमण होणार नाही याची काळजी प्रशासन आणि स्थानिकांनी घेणे अतिमहत्त्वाचे आहे. मगर प्रवणक्षेत्रात वावरण्यासंदर्भातील नियमांविषयी स्थानिकांमध्ये जनजागृती, प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक आहे. स्थानिकांसाठी पोहण्याचे तलाव बांधले किंवा नदीतील पाणी उपसून पात्रापासून दूर गावातच ते वापरासाठी उपलब्ध करून दिले, तर स्थानिकांचे नदीवरील अवलंबित्व काही अंशी कमी होईल. या सर्व उपाययोजनांचा विचार केल्यास, मानव-मगर सहजीवन हा एकमेव सर्व हिताचा मार्ग आहे.



अमोल जाधव
वन्यजीव अभ्यासक, सांगली

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121