मोठी बातमी! 'या' विभागातील भरतीप्रक्रिया रद्द, लवकरच नवीन वेळापत्रक!
15-Mar-2024
Total Views | 231
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागातील रिक्त पदांकरिता भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर भरतीप्रक्रिया शासनाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी यासंदर्भात 'X'वर पोस्ट केली आहे. भरतीप्रक्रियेतील गैरप्रकार याबाबत पोलीस विभागाचा अहवाल पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्य शासनाने मृद व जलसंधारण विभागामधील दि. २० व २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेतलेली परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे अमरावती येथील परिक्षा केंद्रावरील गैरप्रकार व त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यामधील पोलीस विभागाचा अहवाल पाहता विद्यार्थ्यांचे हित जपणे तसेच शासनाची विश्वासार्हता जपण्यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सदर पदभरती परीक्षेबाबत लवकरच नवीन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असेही मंत्री संजय राठोड यांनी आपल्या 'X'वरील पोस्ट म्हटले आहे. त्यामुळे सुधारित वेळापत्रक जाहीर होईपर्यंत उमेदवारांना वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, परीक्षा घेणाऱ्या टीसीएस या कंपनीतील या परीक्षा केंद्राशी संबंधित काही कर्मचारी या गैरप्रकारात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. यामुळे एकूणच सदरहू परीक्षेची विश्वासार्हता व पारदर्शकता यावर काही अंशी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या परीक्षेविषयी परीक्षार्थीच्या मनात संशय निर्माण होण्यास वाव मिळाला आहे.
सदर प्रकरणी अनेक उमेदवारांकडून दि. २० व २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करावी व सदर परीक्षेची प्रक्रिया पुन्हा नव्याने घ्यावी, अशी विनंती शासनाकडे विविध स्तरावर करण्यात आलेली आहे. यामुळे सदरहू परीक्षा रद्द करून फेर परीक्षा घेण्याची परीक्षार्थीची मागणी याबाबत सांगोपांग विचार होऊन, “जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित” या पदासाठी टी.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील, असे मृद व जलसंधारण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.