राजकोट : भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून तिसरा सामना राजकोट येथे खेळविण्यात आला. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात मिळालेल्या १२६ धावांच्या आघाडीच्या जोरावर इंग्लंडवर ४३४ धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह आजपर्यंतचा मोठा विजय म्हणून या सामन्याची इतिहासात नोंद होणार आहे. भारताने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात शतकी खेळी व दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेणाऱ्या रविंद्र जडेजाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा (१३१ धावा) व फिरकीपटू रविंद्र जडेजा (११२ धावा) यांच्या खेळीमुळे संघाला ४०० धावांचा टप्पा ओलांडता आला. या प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने ३१९ धावाचं करता आल्या. यात सलामीवीर बेन डकेट याने १५३ धावांची तडाखेबाज फंलदाजी केली. तसेच, जयस्वालने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावून नवा विक्रम रचला.
भारताने जागतिक कसोटी अंजिक्यपदांच्या शर्यतीत आगेकूच करत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. प्रथम स्थानी न्यूजीलंड ७५ गुण तर ५९.५२ गुणांसह भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारत व इंग्लंड यांच्यादरम्यान असलेल्या मालिकेतील पुढील कसोटी सामना दि. २३ ते २७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान रांची येथे खेळविण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळविल्यास कसोटी मालिका आपल्या नावे करता येऊ शकते. तिसऱ्या सामन्यातून आपला पहिला कसोटी सामना खेळणारा मुंबईकर सरफराज खान पुढील सामना खेळणार का, याकडे क्रिकेटरसिकांचे लक्ष असणार आहे.