मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dr. Mohanji Bhagwat on Teachers Role) "शिक्षण हे केवळ पोट भरण्याचे साधन नाही. ते 'माणूस' बनण्याचे एक माध्यम आहे. त्यामुळे मानवी विकास हे शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट आहे. मानवतेचे रक्षण करण्यासाठी, मानवी गुणांचे संगोपन व संवर्धन करण्यात शिक्षक चिरंतन भूमिका बजावत राहतील. त्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांनी केले. नागपुर येथील सोमलवार शैक्षणिक संस्थेच्या ७० व्या संस्थापक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सोमलवार शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष रामदास सोमलवार व सचिव प्रकाश सोमलवार उपस्थित होते.
उपस्थितांशी संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण जगतासमोर अनेक आव्हाने आहेत. आज विद्यार्थ्यांना गुगल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक विषयाची माहिती सहज मिळते. तरीही शिक्षकाशिवाय विद्यार्थ्याचे जीवन अपूर्ण आहे, कारण शिक्षकच विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देतात. विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो.
लोकमान्य टिळकांचे उदाहरण देत सरसंघचालक म्हणाले की, स्वातंत्र्याच्या काळात टिळकांनी केसरीमध्ये एक लेख लिहिला होता, त्याचे शीर्षक होते - 'पुस्तके हेच आमचे गुरु आहेत'. पण आज पुस्तकांची भूमिका जवळपास संपत चालली आहे. गुगल बाबांकडून लोकांना प्रत्येक माहिती मिळू लागली आहे. बुद्धिमत्ताही कृत्रिम झाली आहे, अशा स्थितीत शिक्षकांची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुटुंब, समाज आणि राष्ट्र सेवेची भावना जागृत करण्यासाठी शिक्षकांनी मोठी भूमिका बजावण्याची गरज आहे.