मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Karyakarta Vikas Varg Nagpur) "भारत सत्य, अहिंसेने चालणारा देश आहे. त्यानुसार आपले कोणीही शत्रू नाही. मात्र विश्वात दूष्ट प्रवृत्तीचे लोकही आहेत. त्यामुळे प्रत्येकाने पूर्णतः सजग राहिले पाहिजे. जोवर द्विराष्ट्रवादाचे भूत अस्तित्वात आहे, तोवर दहशतवादाचा धोका कायम राहील", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
गुरुवार, दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजता स्मृति मंदिर परिसर, रेशिमबाग, नागपुर येथे संघाचा 'कार्यकर्ता विकास वर्ग - द्वितीय'चा समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम, वर्गाचे सर्वाधिकारी समीर मोहन्ती, विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामसेटिवार आणि नागपुर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, भारतीय लष्कराची विरता आणि चमक ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमातून उठून दिसली. मात्र आजच्या युगात युद्धाचे प्रकार बदलले आहेत. आतंकवादला सोबत घेऊन लढणे, सायबर वॉर, छद्म युद्ध, प्रॉक्सी वॉर होत आहेत. अगदी घर बसल्या ड्रोन सोडता येऊ शकतायत. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत आपल्याला स्वनिर्भर व्हावे लागेल.
समाजाला सजग राहण्याचे आणि संघटीत होण्याचे आवाहन करत ते म्हणाले, देशाचे खरी ताकद त्याचा समाज आहे. भारतीय समाज विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या समस्याही निरनिराळ्या आहेत. कधी एकाची समस्या दुसऱ्याला समजून येत नाही. अशाने समाजात निश्चितच असंतोष निर्माण होतो. मात्र देशहितापूढे काही नाही. समाजातील दोन वर्गात लढाई न होता आपापसांत सद्भावना असायला हवी. भडकाऊ भाषण करणाऱ्यांना कोणी भूलू नये. एकमेकांसोबत सद्भावना, सदाचार, सद्विचार, सहयोग करण्याची आवश्यकता आहे. कारण आपली मुळे एकतेत आहेत, विविधतेत नव्हे. आपली मुल्यव्यवस्था एक आहे. याच एकतेचे भान साऱ्या विश्वाला द्यायचे आहे.
माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यावेळी म्हणाले, देशाची सेवा, एकता अखंडता आणि सामाजित समरसतेचे ज्या स्तरावरचे कार्य संघाने केले, ते इतर कुठलीही संघटना नाही करू शकली. जनजाती क्षेत्रांमधील धर्मांतरण हा अत्यंत गंभीर विषय झालाय. कुठल्याही राज्य सरकारने याकडे प्रकर्षाने लक्ष्य दिले नाही. संघ ही एकमेव अशी संघटना आहे, जी धर्मांतरणासारख्या समस्येतून समाजाला मुक्त करेल. वाढता नक्षलवादही गंभीर मुद्दा आहे. संघ आणि जनजाती समाजाने एकत्र येऊन नक्षलवाद संपवण्यासाठी कार्य केले पाहिजे. देशातील धर्मांतरणाची प्रकरणे थांबवायची असतील तर धर्मांतरण विरोधी कायदा लवकरात लवकर येणे गरजेचे आहे.
धर्मकोड या विषयाला धरून ते म्हणाले, जनजातींमध्ये धर्मकोडची चर्चा सध्या सुरु आहे. देशात जनजाती समाजाची ओळख हळूहळू संपत चालली आहे, परंतु येणाऱ्या पिढीला या समाजाबाबत माहिती व्हावी यासाठी धर्मकोड स्वरूपात माहिती उपलब्ध असली तर अधिक उपयुक्त ठरेल. राष्ट्रस्तरावर आणि विशेषतः छत्तीसगडच्या दृष्टीने याविषयी विचार करण्याची आवश्यकता आहे.
दि. ११ मे रोजी सुरु झालेल्या वर्गात ४६ प्रांतातील एकूण ८४० शिक्षार्थी आणि ११४ शिक्षक उपस्थित होते. शिक्षार्थींनी यावेळी दंड, नियुद्ध, घोष, इ. चे प्रात्यक्षिक सादर केले.
जबरदस्ती धर्मांतरण हिंसाचारच!
जर एखादी व्यक्ती स्वतःच्या मनाने धर्म परिवर्तन करत असेल, दुसऱ्या देवी-देवतांची पूजा-अर्चा करत असेल, तर त्याला विरोध नाही. कारण मार्ग वेगवेगळे असले तरी सर्वांची दिशा एकच आहे. मात्र लोभ, लालच दाखवून जोर जबरदस्तीने कोणी धर्मांतरण करत असेल तर तो एकप्रकारे हिंसाचारच आहे. ज्यांचे जबरदस्ती धर्मांतरण झाले आणि त्यांना पुन्हा घरवापसी होत असेल तर स्वागतच आहे. जनजाती समाज हा आपल्या समाजाचा अभिन्न अंग आहे.