उद्धव ठाकरेंची ‘अजमेर शरीफ’कडे मन्नत

पालिका जिंकव रे बाबा...; दर्ग्यावर चढवायची चादर ‘मातोश्री’हून रवाना

    25-Dec-2024
Total Views | 278
UBT

मुंबई : पोपटाचा जीव पिंजर्‍यात असतो, तसा उद्धव ठाकरेंचा ( Uddhav Thackeray ) मुंबई महापालिकेत. त्यामुळे पालिकेची सत्ता हातून जाऊ नये, यासाठी त्यांनी ना-ना तर्‍हेचे प्रयत्न सुरू केले आहेत. हिंदू धर्माशी प्रतारणा केल्यापासून देवा-धर्माला घातलेले साकडे पूर्ण होत नसल्यामुळेच की, काय त्यांनी आता ‘अजमेर शरीफ’कडे मन्नत मागण्यास सुरुवात केली आहे. या दर्ग्यावर चढवायची चादर मंगळवार, दि. २४ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरेंच्या हस्ते ‘मातोश्री’हून रवाना झाली.

विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता मुंबई पालिकाही हातून निसटेल, या भीतीपोटी उद्धव ठाकरेंच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. जुणे-जाणते शिलेदारही पक्षांतराच्या तयारीत आहेत. कित्येकांनी महायुतीच्या नेत्यांशी संपर्क साधल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ‘अजमेर शरीफ’चे दार ठोठावले आहे. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ८१३व्या उरुस निमित्त चादर अर्पण करण्यासाठी मातोश्री येथून रवाना केली. यावेळी माजी खा. विनायक राऊत, ‘उबाठा’ गटाचे उपनेते नितीन नांदगावकर, मुजफ्फर पावसकर, कमलेश नवले, नौमान पावसकर, तसेच उपशाखाप्रमुख गणेश माने आदी उपस्थित होते. खादीम सय्यद झिशान चिश्ती यांच्याकडे ही चादर सुपूर्त करण्यात आली.

‘उबाठा’ची नेमकी भूमिका काय?

राजस्थान येथील अजमेर दर्गा हे शिवमंदिर असून, तेथे दर्गा बांधण्यात आल्याचे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे अजमेर जिल्हा न्यायालयात मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याविरोधात दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे. हे ठिकाण भगवान श्री संकटमोचन महादेव विराजमान मंदिर म्हणून घोषित करावे आणि मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी केंद्राला सूचना द्याव्यात, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्यासोबतच दर्गा समितीला जागेवरील (पान 6 वर) अनधिकृत आणि बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याचे निर्देश द्यावेत, असेही सांगण्यात आले आहे. असे असतानाही उद्धव ठाकरेंनी त्या दर्ग्यावर चढवण्यासाठी चादर पाठवणे, हा हिंदूंच्या भावनांचा अपमान आहे. त्यामुळे यासंदर्भात ‘उबाठा’ची नेमकी भूमिका काय? हे स्पष्ट करण्याची मागणी हिंदू संघटनांकडून होत आहे.

ज्या दिवशी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले, त्याचदिवशी त्यांनी हिंदुत्व सोडले. कोरोनाकाळात त्यांनी मंदिरे बंद केली. पण, विशिष्ट धार्मिक स्थळांना सूट दिली. आता त्यांना हिंदू दैवते महत्त्वाची वाटेनाशी झाली आहेत. आज ‘अजमेर शरीफ’ येथील दर्ग्यावर चढवण्यासाठी त्यांनी मातोश्रीहून चादर पाठवली. त्यामुळे खर्‍या अर्थाने त्यांचे ‘वस्त्रहरण’ झाले आहे.

केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप

‘उबाठा’ने अजमेरला चादर पाठवल्याचे कळले. त्यांना आता विशिष्ट मतांचा आधार उरल्यामुळे बहुधा अशाप्रकारे चादरी पाठवाव्या लागत असतील. पण, त्यांनी कधी कोणत्या मंदिरात देवीला साडी चोळी पाठवली, असे काही ऐकण्यात किंवा पाहण्यात आहे का कुणाच्या? महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनतेसमोर यानिमित्त त्यांचा खरा चेहरा पुन्हा उघड झाला आहे.

शितल म्हात्रे, उपनेत्या, शिवसेना


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121