अविनाश जाधवांचा यू-टर्न! २४ तासांत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मागे
02-Dec-2024
Total Views | 76
मुंबई : (Avinash Jadhav) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे दिला. परंतु, राज ठाकरे यांनी तो स्वीकारलेला नाही. तसेच अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंची भेट घेत राजीनामा मागे घेतला आहे. या भेटीची सविस्तर माहिती अविनाश जाधव यांनी दिली.
भेटीविषयी बोलताना ते म्हणाले, "ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ठाणे आणि पालघर येथे मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. याची नैतिक जबाबदारी म्हणून मी राजीनामा दिला होता. मनसे पक्षाचे नेतेपद, नाविक सेनेचे अध्यक्षपद आहे आणि तिसरे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्षपद आहे. यातील फक्त ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाचा नेता मी होतोच. राजीनामा दिल्यावर राज ठाकरे यांनी बोलावले होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी तुझीच आहे. तूच या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायचे आहे, असे आदेश राज ठाकरे यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
आदरणीय राजसाहेब माझ्या रक्तात आहेत.. राजसाहेबांनी मला ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून असलेली जबाबदारी पाहण्याचा आदेश दिला आहे. आम्हा महाराष्ट्र सैनिकांसाठी राजसाहेबांचा आदेश हा अंतिम असतो आणि त्याचा सन्मान मी नेहमीच आदराने करतो.. मी महाराष्ट्र सैनिक प्रथम, बाकी पद नंतर..🙏🏻
राज ठाकरेंच्या आदेशानंतर अविनाश जाधवांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत "आतापर्यंत राजसाहेबांचा आदेश आणि मार्गदर्शनाखाली काम करत आलो यापुढे काम करत राहीन", अशी प्रतिक्रिया अविनाश जाधवांनी दिली.