वसई-विरारमध्ये राजकीय परिवर्तन घडविणे हेच आमचे उद्दिष्ट : महेंद्र पाटील
01-Dec-2024
Total Views | 61
खानिवडे : “वसई-विरार जिल्ह्यात राजकीय परिवर्तन घडवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. समाजाला कृतिशील व लोकाभिमुख कारभाराचे परिवर्तन द्यावयाचे असून, त्या दृष्टिकोनातून सातत्यपूर्वक प्रयत्न सुरूच राहतील,” अशी ग्वाही भाजपचे वसई-विरार शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील ( Mahendra Patil ) यांनी दिली.
शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी वसई, नालासोपारा या दोन मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आणण्यात मौलिक योगदान दिले आहे. त्याबद्दल भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांचे प्रदेश भाजप कार्यालयात अभिनंदन केले. दरम्यान, झालेल्या छोटेखाणी कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील बोलत होते.
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजप नेते रविंद्र चव्हाण यांचा पाठिंबा, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांचे मार्गदर्शन व कार्यकर्त्यांच्या चिकाटीच्या जोरावर वसई-विरार भागातील दोन्ही विधानसभा बहुजन विकास आघाडीकडून काबीज करण्यात आम्हा सर्वांना यश आल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पक्ष संघटनेचा अधिक विस्तार करण्याकरिता ज्येष्ठ कार्यकर्त्यांपासून ते बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सातत्याने प्रवास करून शहरी व ग्रामीण भागात अनेक कार्यकर्ते जोडले आहेत. प्रदेश भाजपमधून आलेले विविध आंदोलनांचे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता सातत्याने प्रयत्न केल्याने पक्षाला हे घवघवीत यश मिळाल्याचे महेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध लोकहिताच्या योजनांची सर्व जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याच्या हेतूने सातत्याने शिबीर घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. वसई-विरारमधील युवक, महिला तसेच विविध समाजघटकांना सोबत घेऊन संघटना अधिक मजबूत करण्याकरिता पक्षाने नेहमी बळ दिले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक, पालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक, यात यश मिळविण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संपर्क व समन्वय ठेवण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीत हे संचित मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरल्याचे पाटील शेवटी म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपचे वसई-विरार जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र, त्याचसोबत जबाबदारीचे ओझेही वाहावे लागणार आहे, याचे आपल्याला पूर्ण भान असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.