भारतीय शेतीमधील ‘ड्रोन क्षण’

    09-Jan-2024
Total Views | 117
Drone Technology in Indian Agriculture


भारतीय शेतीने याआधी पारंपरिक बैलगाडी आधारित होण्यापासून, ट्रॅक्टर आधारित होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. आता शेतीच्या कामांमध्ये होणारा ड्रोनचा वापर हरित क्रांतीची तिसरी लाट ठरणार आहे. कृषी-ड्रोन तंत्रज्ञान आपल्या शेतीच्या पद्धतींना आधुनिक बनवण्यात आणि त्यामध्ये बदल घडवण्यात खर्‍या अर्थाने यशस्वी होत असल्याचे सिद्ध होत आहे.

पंजाबच्या बहरलेल्या शेतांमधल्या हिरव्यागार वातावरणातून चालत असताना, दूरवर घुमणार्‍या एका आवाजाने माझे लक्ष वेधून घेतले. मानवी स्वभावानुसार मनात कुतूहल जागे झाले की, या आवाजाचा स्रोत कोणता आहे. उतरल्याबरोबर दोन शेतकर्‍यांनी माझे स्वागत केले. ते ड्रोनच्या मदतीने युरियाची फवारणी करत होते. देशाच्या एका ग्रामीण भागात शेतकर्‍यांकडून एका नव्या तंत्रज्ञानाचा इतक्या उत्साहाने स्वीकार झाल्याचे पाहून मला सुखद अनुभूती झाली. मला वाटले की, हा भारताच्या कृषी क्षेत्रासाठी ’ड्रोन क्षण’ होता, ज्याने आपल्या देशात ’ड्रोन चळवळ’ सुरू केली. त्या शेतकर्‍यांनी मला सांगितले की, त्यांना कृषी ड्रोनविषयीची माहिती त्यांच्या गावात ’विकसित भारत संकल्प यात्रे’च्या काळात मिळाली आणि हे नवीन तंत्रज्ञान त्यांच्या शेतामध्ये अतिशय कुशलतेने द्रवरूप खते आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी अतिशय उपयुक्त आहे.

भारतीय शेतीने याआधी पारंपरिक बैलगाडी आधारित होण्यापासून, ट्रॅक्टर आधारित होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. मला आता शेतीच्या कामांमध्ये होणारा ड्रोनचा वापर हरित क्रांतीच्या तिसर्‍या लाटेच्या रुपात दिसत आहे. कृषी-ड्रोन तंत्रज्ञान आपल्या शेतीच्या पद्धतींना आधुनिक बनवण्यात आणि त्यामध्ये बदल घडवण्यात खर्‍या अर्थाने यशस्वी होत असल्याचे सिद्ध होत आहे. हातपंपांच्या माध्यमातून कीटकनाशके आणि द्रवरूप खतांच्या थकवून टाकणार्‍या आणि वेळखाऊ फवारणीचे दिवस आता मागे पडले आहेत. आता त्याची जागा ड्रोनच्या माध्यमातून फवारणीचे अधिक कुशल आणि उत्पादक तंत्रज्ञान घेऊ लागले आहे. कृषी क्षेत्राची दक्षता आणि उत्पादकतेत सुधारणेसाठी कृषी पद्धतींमध्ये आधुनिकीकरण आवश्यक आणि अपरिहार्य आहे. जेणेकरून अन्नसुरक्षा सुनिश्चित केली जाऊ शकेल, जे एका विकसित आणि स्वयंपूर्ण भारताचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे.

१९६०च्या दशकात हरित क्रांतीमध्ये नवी कृषी उपकरणे, ’एचवायवी’ (उच्च उत्पादकतेची वाणे) बियाणे, कीटकनाशके आणि रासायनिक खतांच्या वापराचा प्रारंभ पाहायला मिळाला. गेल्या काही वर्षांत आपले पर्यावरण, मृदेचे आरोग्य आणि मृदेची सुपीकता दीर्घकाळ टिकवण्यासाठी, खतांचा अधिक संतुलित वापर सुनिश्चित करण्याची तातडीची गरज जाणवू लागली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी याविषयीचे आवाहन २०१९च्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यादरम्यान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केले होते. यापासून प्रेरणा घेत सरकारने जैव, नॅनो आणि जैविक खतांसारख्या पर्यायी खतांना प्रोत्साहन देण्यासाठी ’पीएम प्रणाम’ आणि ’गोबरधन’ यांसारखे अनेक उपक्रम सुरू केले आहेत. या नव्या उपक्रमांविषयी जागरूकतेत वाढ करण्यासाठी आणि शेतकर्‍यांना एकाच छताखाली एकीकृत तोडगे प्रदान करण्यासाठी ’पंतप्रधान कृषी समृद्धी केंद्रा’ची (पीएमकेएसके) स्थापना करण्यात आली आहे.

स्वदेशी पद्धतीने विकसित नॅनो खते जास्त चांगली आहेत. कारण, ती पारंपरिक रासायनिक खतांना पर्यावरणस्नेही आणि प्रभावी पर्याय प्रदान करत आहेत. आता पारंपरिक युरियाच्या ४५ किलोग्रॅम वजनाच्या गोणीची जागा युरियाच्या अर्ध्या लीटरच्या बाटलीने घेतली आहे. यामुळे मृदेची गुणवत्ता टिकवण्यात आणि पिकांच्या उत्पादकतेत सुधारणा करण्यात मदत होत आहे. त्याबरोबरच अधिक चांगल्या पोषक तत्त्वांच्या वापराची दक्षता आणि सोप्या पद्धतीच्या व्यवस्थापनासारखे अनेक फायदेदेखील आहेत. त्याची व्यापक स्वीकृती सुनिश्चित करण्यामधील पुढील आव्हान म्हणजे याच्या वापराची एक पद्धती विकसित करणे, सहजतेने अंगीकार करण्यासाठी एका परिसंस्थेची निर्मिती करणे आणि कृषी समुदायाला याचे फायदे प्रभावी पद्धतीने समजावून सांगणे हे होते.

भारताच्या युवा आणि गतिशील स्टार्टअप्सकडून ’किसान ड्रोन’चा विकास द्रवरूप खतांच्या वापरासाठी एक प्रभावी आणि कुशल तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे. काही मिनिटांतच एक एकर शेतजमिनीवर फवारणी करण्याची क्षमता तासन्तास आपल्या शेतात राबणार्‍या, शेतकर्‍यांसाठी एक वरदान ठरली आहे. आता शेतकर्‍यांकडे जास्त मोकळा वेळ उपलब्ध होऊ लागल्याने, आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी, आणखी जास्त उत्पादक कार्यात ते सहभागी होऊ शकतात.देशाच्या विकासात महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांचा सहभाग वाढवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. ’विकसित भारत संकल्प यात्रे’त दि. ३० नोव्हेंबर रोजी लाभार्थ्यांशी संवाद साधताना, त्यांनी स्वतः ‘नमो ड्रोन दीदी योजने’चा शुभारंभ केला. सुलभ आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देऊन, शेतकर्‍यांना शेतीच्या कामांसाठी भाड्याने ड्रोन पुरवणे हा यामागचा उद्देश आहे.

यासाठी देशभरातील १५ हजार निवडक महिला बचत गटांना ( एसएचजी ) ’नमो ड्रोन दीदी’अंतर्गत ड्रोन पुरवले जात आहेत. हा अनोखा उपक्रम शेतकर्‍यांना द्रवरूप खते आणि कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी केवळ ड्रोन सहज उपलब्धच करून देणार नाही, तर महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण समृद्धीला देखील हातभार लावेल. यामुळे भारताच्या ड्रोन वैमानिकीला चालना मिळेल आणि ड्रोन उत्पादक स्टार्टअप्सना उत्पादन सुविधा उभारण्यास मदत होईल.यामुळे देशातील दुर्गम भागात ड्रोन पायलट आणि ड्रोन मॅकेनिकसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊन महिला आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील आणि ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.कोणत्याही नवीन उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रभावी संवाद सर्वात महत्त्वाचा आहे. दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झालेल्या, देशव्यापी ’विकसित भारत संकल्प यात्रे’त ड्रोन हे एक प्रमुख आकर्षण बनले आहे. यात्रेदरम्यान सर्व राज्यांमध्ये ५० हजारांहून अधिक ड्रोन प्रात्यक्षिके झाली आहेत. या प्रात्यक्षिकांमुळे शेतकर्‍यांमध्ये त्यांच्या शेतीमध्ये हे नवीन उच्च दर्जाचे तंत्रज्ञान स्वीकारण्याची आवड निर्माण झाली आहे.

 
डॉ.मनसुख माडवीया

(लेखक केंद्रीय रसायन आणि खते मंत्री आहेत)
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121